बुधवार, १३ एप्रिल, २०२२

खरे देशभक्त दत्ताजी ताम्हाणे


दत्ताजी ताम्हाणे हे एक थोर देशभक्त स्वातंत्र्यसैनिक होते. अतिशय ध्येयवादी आणि स्पष्ट विचारांचे, खºया मनाचे नेते म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांचा आज जन्मदिवस. खरेतर कोणत्याही नेत्याचा जन्मदिवस, स्मृतीदिन किंवा हयातीत असताना साजरा केला जाणारा वाढदिवस हा एक सोहळा असतो, पण दत्ताजी ताम्हाणे यांनी मात्र आपला वाढदिवस कधीच साजरा केला नाही. याचे कारण कोणालाही भावूक करेल. १३ एप्रिल १९१३ हा त्यांचा जन्मदिवस. पण त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे १३ एप्रिल १९१९ या दिवशी जालियनवाला हत्याकांड झाले होते.तेव्हा ते अवघे सहा वर्षांचे होते, पण त्या वयातही त्यांच्या जाणिवा प्रखर होत्या. जालियनवाला हत्याकांडामुळे पुढे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दत्ताजींनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. म्हणजे देशप्रेम त्यांच्या रक्तात किती लहानपणापासून होते याची साक्ष मिळते. अशा नेत्यांचा आदर्श समोर ठेवणे आवश्यक आहे.


दत्ताजी ताम्हाणे यांचे वडील पोस्ट मास्टर होते. शालेय वयात असताना दत्ताजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीपर कविता म्हणत. अशी एक कविता ऐकून एका पोलीस अधिकाºयाने पोस्ट मास्टरची मुले देशद्रोही आहेत, असा रिपोर्ट दिला. तेव्हा एका रात्रीत त्या कवितेच्याच चालीवर राजा पंचम जॉर्जची स्तुती करणारी कविता रचून दत्ताजींच्या वडिलांनी कुटुंबावरील संकट टाळले. ही फार मोठी गोष्ट आहे. देश आणि कुटुंब, कर्तव्य आणि देशनिष्ठा सांभाळणे आणि साप भी मरे और लाठी भी ना तुटे असे वागणे होते ते.

विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्यप्रेम उफाळून आल्यामुळे १९२८ साली सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याच्या घटनेने त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी १९३० साली सविनय कायदेभंगाच्या चळवळीत मिठाच्या सत्याग्रहासाठी दत्ताजींनी बाल वयात आंदोलन केले होते.


१९३२ मध्ये दत्ताजींनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कॉलेजात प्रवेश घेतला, पण कॉलेजला रामराम ठोकून त्यांनी १९३४ सालापासून काँग्रेसचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य करण्यास प्रारंभ केला. १९३६मध्ये फैजपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनास दत्ताजींची उपस्थिती होती. त्यानंतर, स्वामी आनंद यांच्या आश्रमात जवळ जवळ दोन वर्षे दत्ताजींचे वास्तव्य होते. १९४०साली ठाणे जिल्‍ह्यामध्ये वैयक्तिक सत्याग्रह करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

छोडो भारत आंदोलनात सहभागी झाल्यामुळे १९४२ साली दत्ताजींना सव्वा दोन वर्षांचा कारावास भोगावा लागला. या आंदोलनात ठाण्याच्या तुरुंगात आणले गेलेले ते पहिले राजबंदी होते.


स्वातंत्र्यानंतर सन १९४८मध्ये दत्ताजींनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. १९५० ते १९५३पर्यंत समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र कार्यालयाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. १९५२ साली दत्ताजी ताम्हाणे यांनी विधानसभेची निवडणूक लढविली, परंतु ते निवडणूक जिंकू शकले नाहीत. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे १९५७ साली विधानसभेवर त्यांची निवड झाली. १९६८ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या काळात, १९७५मध्ये १८ महिने तुरुंगात राहण्याची पाळी दत्ताजींवर आली होती. दत्ताजी ताम्हाणे यांनी ‘लोकमित्र’ हे साप्ताहिक संपादित केले. कुळ कायद्यावर त्यांनी कळीचा घोडा हे पुस्तक लिहिले. त्यास महाराष्ट्र शासनाचा १५०० रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. १९६८ साली ताम्हाणे लोकसभेसाठी उभे राहिले, परंतु त्यांचा पराभव झाला.


१९७६मध्ये दत्ताजी ताम्हाणे यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये जनता पक्षाची स्थापना केली. १९८३ साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. यानंतर त्यांनी त्यांचा लेखन, वाचन व चिंतन हा छंद आणि समाजकारण व मार्गदर्शन हेच व्रत सांभाळले. ते १०० वर्षांचे झाले, तरी त्यांच्या घरी सकाळी १०-१५ माणसे केवळ विविध पुस्तकांचे वाचन करण्यासाठी नित्यनेमाने जमत असत. दत्ताजी ताम्हाणे यांनी लग्न न करता आयुष्यभर देशकारण आणि समाजकारण केले. वयाच्या १०१व्या वर्षी दीड महिन्याच्या आजारपणानंतर त्यांचे मुंबईतील मुलुंडच्या रुग्णालयात निधन झाले, पण अतिशय तत्वनिष्ठ आणि निस्पृह असे ते नेते होते. आज अशा लोकांचा आदर्श ठेवला, त्यांचे चरित्र जरी आठवले, तरी सध्याच्या बोकाळालेल्या परिस्थितीत कुठेतरी दिलासा मिळेल असे वाटते. आज देशभक्तीचा बाजार मांडला जात असताना खरी देशभक्ती काय असते हे दत्ताजींच्या जीवनावर नजर मारली तर समजते.

- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: