शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

शास्त्रीय संगीताला वेगळी उंची देणारे कुमार गंधर्व


शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा आज जन्मदिवस. कुमार गंधर्व हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. तत्कालीन हिंदुस्तानी संगीत पद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वत:ची आगळ्या ढंगाची गायकी घडवली. त्यामुळे त्यांचे शास्त्रीय संगीतात वेगळे नाव तयार झाले. किंबहुना शास्त्रीय संगीत ज्याला समजत नाही, अशा कानसेनांनाही कुमार गंधर्वांचा गोड आवाज आकर्षित करत होता हे त्यांचे वैशिष्ट्य होते.


कुमार गंधर्व यांचे वडील गायक होते. घरातच गायकी असल्याने तिचा प्रभाव पडून कुमार वयाच्या सहाव्या वर्षीच गाऊ लागले. त्यांचे गाणे ऐकून गुरुकुल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी कुमार गंधर्व हे नाव ठेवले. हेच पुढे त्यांचे अधिकृत नाव झाले.

अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून कुमार गंधर्व यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. त्यांनी १९३६ पासून पुढे अकरा वर्षे मुंबई येथे बा. र. देवधर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. १९४७ साली त्यांचे मराठी गायिका भानुमती कंस यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर कुमारांना क्षयाची बाधा झाल्याने त्यांचे एक फुप्फुस काढावे लागले. मोकळ्या स्वच्छ हवेसाठी त्यांनी मुंबई सोडली आणि ते मध्य प्रदेशातील देवास येथे राहू लागले.


भानुमती कोमकली यांनी त्यांची शुश्रूषा करून त्यांना बरे केले. १९६१मध्ये भानुमती वारल्या आणि कुमार गंधर्वांनी १९६२ मध्ये वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी लग्न केले. त्यांना जी मुलगी झाली तिचे नाव त्यांनी प्रख्यात पेटीवादक विठ्ठलराव सरदेशमुख यांनी सुचवल्याप्रमाणे ‘कलापिनी’ ठेवले.

कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे गीत वर्षा, गीत हेमंत, गीत वसंत हे कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९६५ साली अनुपरागविलास हा नव्या जुन्या रागांत स्वत: बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली यांसारखे नवनवीन यशस्वी प्रयोग त्यांच्या सर्जनतेची साक्ष देतात. त्यांचे प्रयोगशील मन सतत काही तरी नवीन करण्याच्या उद्योगात असे.


कुमार गंधर्व हे शेवटपर्यंत नवी मुंबई येथील वाशीतल्या पं. विष्णू दिगंबर स्मारक योजनेचे अध्यक्ष होते. त्यांचा पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही हिंदुस्तानी गायक आहेत. कर्नाटकातून येऊन महाराष्ट्रात ख्याती प्राप्त करणारे कुमार गंधर्वांचा आवाज सर्वसीमा रेषा पुसून एकजूट निर्माण करणारा आहे.

जेव्हा माणसाचे जीवन हे सकाळी रेडीओवर चालत होते त्या काळात सकाळी लागलेली त्यांची भूपाळी उठी उठी गोपाळा प्रत्येक माणसाचा संपूर्ण दिवस आनंदात घालवण्यास मदत करत होता. उड जायेगा हंस अकेला सारखी कबीरांची भजने असोत वा नाट्यगीते कुमार गंधर्वांच्या आवाजाची आगळीक ही स्वर्गिय होती आणि आहे. अजुनी रुसून आहे या गीताने तर असंख्य भाव मनात निर्माण होतात. त्या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर कुमार गंधर्वांनी नेऊन ठेवले आहे. हा आजरामर ठेवा भारतीय संगीतात त्यांच्या नावावर कायम आहे.


खरेतर मागच्या शतकातील तो एक सुवर्णकाळच होता. या काळात फक्त कुमार गंधर्वच नाही तर अनेक सारस्वत आणि गंधर्व एकमेकांचे कौतुक करण्यास सज्ज असायचे. एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी आतूर असायचे. भारतरत्न भिमसेन जोशी, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे, बहारदार आवाजाचा जादूगार वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यांच्या मैफिली म्हणजे महाराष्ट्रातील ते सुवर्णयुग होते. रंगभूमी, आकाषवाणी आणि तबकडीतून येणारे त्यांचे सूर हे सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारे होते. तो काळ ज्यांनी पाहिला ते खºया अर्थाने भाग्यवान. गंधर्व हे स्वर्गलोकीचे वैभव असते. भूतलावरचे हे गंधर्व आपल्या गायकीतून भूतलावर स्वर्ग निर्माण करत होते. स्वर गाता गाता स्वरगात गेलेले असे अनेक गंधर्व हे या देशाचे वैभव होऊन गेले. त्या वैभवातील एक तारा म्हणजे कुमार गंधर्व.

प्रफुल्ल फडके/ संस्कृती


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: