इस्लामपूर येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण व पुरोहितांबाबत भाषणात अपमानास्पद उल्लेख केला. त्यामुळे अनेक ब्राह्मण संघटनांनी निषेध व्यक्त केला, आंदोलन केले. पुणे, नाशिक, पंढरपुरात काही ब्राह्मण संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या, पण याची काहीच गरज नव्हती. अमोल मिटकरी यांना स्वत:चे महत्त्व वाढवायचे असल्यामुळे त्यांनी हे दुष्कृत्य केले होते, पण त्यांच्याविरोधात आंदोलन करावे इतके ते काही मोठे नाहीत. किमान आपल्या हातात मतदानाचा रिमोट आहे, त्याचा योग्य वेळी वापर करून चाणक्याने ज्याप्रमाणे नंदकुळाचा नाश करून त्यांना सत्तेवरून हटवले तसे बाणेदारपणे कृत्य ब्राह्मणांनी करायला पाहिजे. आजवर राज्यात इतकी विविध समाजाची आंदोलने झाली त्यातली किती यशस्वी झाली? आंदोलनाने प्रश्न सुटत नाहीत, तर प्रत्येक समाजाने आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या हातातील मतदानाचा रिमोट योग्यप्रकारे वापरला पाहिजे आणि त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडूनही निषेध झालेला आहे, ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे, असे सांगून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे प्रकरण जास्त ताणून धरायची गरज नाही. काय ताकद आहे ती मिटकरींना तिथल्या लोकांनी निवडणुकीत मतदानाचा रिमोट वापरून दाखवावी. रस्त्यावर उतरायची गरज नाही.
अमोल मिटकरींना हिंदू धर्मातील कन्यादान या प्रकाराचा खेद वाटतो. त्यावर त्यांचा आक्षेप आहे. असूदे असला तर आक्षेप. त्यांचा राक्षस विवाहावर विश्वास असेल, मुलींना पळवून नेणाºया प्रवृत्तीचा ते पुरस्कार करणारे असतील, तर सुसंस्कृतपणाने होणारे विवाह त्यांना रुचणार कसे? आपल्याकडे म्हण आहे की, कुठल्या तरी प्राण्याला म्हणे गुळाची चव काय? तसाच तो प्रकार आहे. त्यामुळे त्यांना इतके महत्त्व देण्याची काहीच गरज नाही.
मुळात अमोल मिटकरींना एक मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्या सभेला बोलावले होते. त्यांना काही विचारवंत म्हणून आणले नव्हते. विचारवंत असतात ते अभ्यास करून बोलतात. वाचाळविरांची गरज प्रत्येक पक्षांना वाटतेच. राष्ट्रवादीची ती ख्याती आहे. दहा वर्षांपूर्वी अजितदादांनी धरणात नको तिथले पाणी सोडले होते. तेच पाणी प्राशन केलेले हे मिटकरी, चांगले बोलतील अशी अपेक्षा ब्राह्मण समाज कशी काय करू शकतो? पण अशा प्रकारचे पाणी पाजणाºया अजित पवारांनाही आत्मक्लेश करून घ्यावा लागला होता, तिथे या अमोल मिटकरींची काय बात? ब्राह्मण समाजावर टीका केल्याने काही फरक पडत नाही, म्हणून ती टीका केली जाते. ना त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होत ना कोणी दंगल करायला उतरत. त्यामुळे दुर्बलांवर, जेमतेम एक ते दीड टक्का असलेल्या लोकांवर बलप्रयोग करणाºयांच्या या पुरुषार्थाला काय म्हणावे? त्यांना जर ज्ञान असते तर ते हजारोंच्या सभेपुढे चुकीचे बरळले असते का?
मिटकरी भाषणात म्हणाले, आपण एका लग्नात गेलो होतो, तिथला महाराज मम भार्या समर्पयामी म्हणाला. असा लग्नात कुठेच मंत्र नाही. कन्यादान हे काही भटजी करत नाही, कन्यादान मुलीचा पिता करत असतो. त्यामुळे तो मम कन्या म्हणेल फारतर. पण काहीही बोलून विनोद निर्मिती करण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. त्यातून हिंदू लग्न विधीवर टीका केली. अशी टीका अन्य धर्मीयांबाबत करण्याची त्यांची हिंमत झाली असती का? हिंदू विभागलेला आहे, दुबळा आहे, त्यामुळे त्याच्यावर टीका केली तरी चालते म्हणून त्यांनी टीका केली.
पण याला कसलेही जातीय वळण न देता बोलघेवड्या माणसाने केलेली पोपटपंची म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात ब्राह्मण सेवा संघाने सुरू केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचेच आमदार संग्राम जगताप ही सहभागी झाले होते, त्यामुळे तो राष्ट्रवादीचा विचार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आंदोलने, निषेध असले प्रकार न करता आपल्या हातातील रिमोटचा वापर करून आगामी निवडणुकांत अमोल मिटकरींसारख्या सर्वच जातीयवादी प्रवृत्तींना दूर लोटले पाहिजे. अगदी एखादा ब्राह्मण जरी जातीयवादी विधाने करत असेल, तरी त्याला दूर केले पाहिजे. आज गेल्या काही वर्षांत इतकी आंदोलने, मोर्चे झाले. त्यातून कुणाला यश मिळाले आहे? शांततेच्या मार्गाने ५५ मोर्चे काढून आणि २८८ मध्ये १५० पेक्षा जास्त मराठा आमदार असूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. एसटी कर्मचाºयांनी पाच महिने आंदोलन केले, पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे या सर्वांनीच आपल्या हातातील रिमोटचा वापर केला पाहिजे आणि ज्यांच्या हातात आहे, पण ते आपल्याला न्याय देत नाहीत त्या राजकीय नेत्यांना मतदानाच्या रिमोटमधून धडा शिकवण्याचे ध्येय ठेवावे. या लोकांची खुर्ची खेचून घेतली की, आपोआप सर्वांना न्याय मिळेल.
बिटवीन द लाईन्स/ प्रफुल्ल फडके
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा