मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

चित्रकथी


लोककला आणि संस्कृतीमधील अनेक फॉर्म आपल्याकडे आजपर्यंत नाटकासाठी वापरले गेले आहेत. जांभुळआख्यान या नाटकासाठी गोंधळाचा फॉर्म वापरला होता. महानिर्वाणसाठी सतीश आळेकरांनी किर्तनाचा फॉर्म वापरला होता. अनेक नाटकांसाठी पथनाट्याचा वापर केला होता. पारंपरिक नटी सूत्रधाराचे फॉर्म वगळून ज्या मार्गाने कथा सांगितली जाते असे अनेक फॉर्म हे नाटकासाठी वापरले जातात. तसाच एक फॉर्म १९८० च्या दशकात एकांकीका आणि नाटकासाठी वापरला गेला होता. तो म्हणजे चित्रकथी.

चित्रकथी म्हणजे चित्रांच्या सहाय्याने सादर केलेली कथा. त्याप्रमाणे पडद्यावर पालखी आणल्याप्रमाणे रंगीत चित्रांचे फळे आणले गेले होते आणि त्यामागे खरे कलाकार. चित्र पुसल्याप्रमाणे, चित्रातील माणसांप्रमाणेच त्याची रंगभूषा वापरून बाहुल्या वाटाव्यात अशाप्रकारे कलाकारांचा वापर करून एक उत्तम नाट्य उभे केले होते. त्यासाठी हा चित्रकथीचा फॉर्म वापरला होता.


आदिवासी जीवनात चित्रकलेची फार मोठी परंपरा आहे. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींचा चित्रकथी हा कलाप्रकार खूप नावाजलेला आहे. एका वेगळ्या चित्रशैलीतील परंपरा पिंगुळीच्या ठाकर आदिवासींनी जोपासली आहे; मात्र ही कला वारली कलेसारखी फक्त भिंतीचित्रांपुरतीच मर्यादित नसून, ती एक प्रयोगशील कला आहे. चित्रांच्या सहाय्याने कथा सांगण्याची कला म्हणजेच चित्रकथी.

‘वर्णकै: सह ये वक्तिस चित्रकथको वर: गायका यत्र गयन्ति विना तालेर्मनोहरम’, असा चित्रकथी कलेचा उल्लेख सोमेश्वराच्या मानसोल्लासमध्ये आढळतो. यावरून लक्षात येईल की, ही कला किती प्राचीन आहे ते. ठाकर आदिवासी १५ इंच लांब आणि १२ इंच रुंद आकाराच्या कागदावर एका विशिष्ट्य शैलीत चित्रे काढतात. वनस्पती आणि मातीच्या रंगाने ही चित्रे रंगवितात. रामायण, महाभारतातील एखादे आख्यान निवडून प्रसंगानुरूप चित्रे काढतात. कथानकाच्या घटनाक्रमानुसार त्यांचा क्रम ठरलेला असतो. कागदाच्या दोन्ही बाजूस ही चित्रे काढली जातात. एका कथानकाच्या चित्रांची एक पोथीच तयार होते.


चित्रकथी म्हणजे चित्रांद्वारे सादर केलेली कथा. या कथा सादरीकरणाला ठाकर कलावंत पोथी सोडणे म्हणतात. हे आदिवासी कलावंत गावातील मंदिरात चित्रकथीचा खेळ करतात. कलाकार मंदिरात घोंगडीवर मांडी घालून बसतात. सूत्रधार सर्वप्रथम पोथीची पूजा करतो. सूत्रधाराच्या समोर एक लाकडी फळी उभी केली जाते. सूत्रधाराच्या उजव्या हातात तीन तारी वीणा, तर डाव्या हाताच्या अंगठा आणि करंगळीमध्ये टाळ गुंतविलेला असतो. तर साथीदारांकडे डमरू आणि तुणतुणे ही वाद्ये असतात. सूत्रधार रिद्धीसिद्धीसह गणपतीचे चित्र फळीच्या आधाराने उभे करतो आणि गाऊ लागतो.

विघ्नहरासी गायो एकदंता देवागौरीहराचिया सुता सकट सरसी गुण गाता तुझे चरणी नमन माझे।। असे पद म्हणून गणपतीचे स्तवन करतो. त्यानंतर पान पलटून सरस्वतीचे चित्र समोर ठेवतो आणि सरस्वतीची आराधना करतो. रसिकांची मने जिंकू शकेन, अशी रसाळ वाणी मला दे अशी सरस्वतीकडे मागणी करतो आणि मग आख्यानाला सुरुवात करतो. रामायण, महाभारत आणि पौराणिक कथांवर आधारित आख्याने सूत्रधार सादर करतो. आख्यान सादर करताना प्रथम त्या प्रसंगाला अनुरूप असे चित्र फळीवर लावतात आणि त्याविषयी वर्णनपर ओवी गायली जाते आणि त्यानंतर त्या ओवीचे निरूपण सूत्रधार करतो, तसेच आख्यानातील पात्रांचे संवाद सूत्रधार आणि साथीदार बोलतात आणि कथानक पुढे नेतात, कथानकाच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगाची चित्रे फळीवर लावली जातात. आख्यानाचे निरूपण करताना सूत्रधार मराठी भाषेसोबतच स्थानिक भाषेचा वापर विनोदासाठी करतो, तसेच काही दाखले देण्यासाठी विद्यमान घटनांचा आधार घेतात. सूत्रधाराचे निरूपण कौशल्य आणि गायनातील गोडवा रसिकांना खिळवून ठेवतो. पिंगुळीतील ठाकर आदिवासींकडे असलेल्या पोथ्यात रामायण, महाभारतातील अनेक आख्याने तसेच डांगीपुराण, नंदीपुराण, जालंदर वध, कपिलासूर अशी अनेक आख्याने आहेत. या आख्यानातील पदे, कवने आणि संवाद एका पिढीकडून दुसºया पिढीकडे मौखिक परंपरेने चालत असतात.


ही आपल्याकडे फार सुंदर लोककला आहे. पण कोणताही फॉर्म असला, कोणतीही लोककला, असली तरी त्यात रामायण आणि महाभारताशिवाय ती अपुरी आहे. दशावतार असोत व आणखी कोणत्याही प्रादेशिक नाटकांचा प्रकार त्याचप्रमाणे चित्रकथीतही अशा कथांचा वापर होतो, हे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे. त्यामुळेच या फॉर्मची भुरळ रंगकर्मींना पडली.

प्रफुल्ल फडके/संस्कृती


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: