सध्या पीके म्हणजे प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा आहे. २९ एप्रिलला ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसला अच्छे दिन येतील, असे वाटत आहे. प्रवेशापूर्वीच पक्षाच्या पुनरुत्थानासाठी ६०० पानांचे प्रझेंटेशन पीकेंनी केले; पण त्याला कोणा काँग्रेस नेत्याने फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे पीके जरी भाजप, तृणमूल आणि आपल्याला फायदेशीर ठरले, तरी त्यांचा काँग्रेसला कसलाही फायदा होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असेल.
काँग्रेसमध्ये मुळातच गांधी कुटुंबाला काय हवे ते चालते. गांधी कुटुंबांशिवाय कोणाच्याही मताला तिथे अजिबातच महत्त्व नसते. त्यामुळे बाहेरून नव्याने अनेक पक्ष फिरून आलेल्यांची मते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मानणार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला प्रशांत किशोर यांचा काहीही फायदा होणार नाही. मुळात काँग्रेसच्या पुनर्रुजीवनासाठी नेतृत्व बदलाची गरज आहे; पण गांधी परिवाराशिवाय कोणाकडे नेतृत्व देण्याची कुटुंबाची इच्छा नाही. तीन-तीन वर्षे बिन अध्यक्षाचा पक्ष चालवला जातो. त्याला बिगर गांधी परिवार अध्यक्ष आणण्याची हिंमत प्रशांत किशोर यांच्यात असेल, तर त्यांना यश येईल. नाही तर यशस्वी रणनीतीकारांनाही अपयशाचा सामना करावा लागेल.
सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार अशी ख्याती मिळवलेले प्रशांत किशोर (पीके) यांनी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी तब्बल ६०० स्लाइड्सचे एक प्रझेंटेशन तयार केले आहे. पण, कोणत्याही नेत्याने अद्याप ते सविस्तर पाहिले नाही. किशोर यांनी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी ज्या सूचना केल्या आहेत, त्या आता हळूहळू उजेडात येत आहेत. पण, त्या सूचना कोणी मनावर घेत नाही. बाहेरून आलेला आम्हाला काय शिकवणार ही भावना जोपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि गांधी परिवार हे प्रमाण मानले जात आहे, तोपर्यंत प्रशांत किशोर यांना यश मिळणार नाही, हे वास्तव आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या ब्ल्यू प्रिंटमध्ये काँग्रेसला आपल्या जुन्या सिद्धांतांकडे वळण्याची, तळागाळातील कार्यकर्त्यांना मजबूत करण्याची व पक्षाचा पूर्णवेळ अध्यक्ष नेमण्याची सूचना केली आहे. पण, गेल्या तीन वर्षांत त्यांना हे करता आलेले नाही. निष्ठावंत अशा जी २३ नेत्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना अडगळीत टाकण्याचा प्रकार परिवाराने केला. त्यामुळे नुकताच प्रवेश करणाºया प्रशांत किशोर यांचे गांधी कुटुंबीय काय करतात, हे पाहावे लागेल.
प्रशांत किशोर यांनी आघाडीशी संबंधित मुद्दे सोडवण्यासाठी पक्षाच्या कम्युनिकेशन सिस्टममध्ये बदल करण्यावरही जोर दिला आहे. त्यांनी आपल्या प्रझेंटेशनची सुरुवात महात्मा गांधी यांच्या विधानाने केलेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला केव्हाही मरण्याची परवानगी देता येत नाही. हा पक्ष केवळ राष्ट्रासोबतच मरू शकतो. हा गांधींचा विचार त्यांनी काँग्रेसला आठवण करून दिला आहे. याचा अर्थ मी बरोबर आलो, तरच काँग्रेस जगेल अन्यथा मरेल, असा संदेश पीकेंनी दिला आहे. त्यामुळे फक्त नंदीबैलासारखे मुंड्या हलवणारे अन्य नेते याचा काय अर्थ घेतील?
किशोर यांनी सादर केलेले प्रझेंटेशन सोनिया गांधींपुढे गतवर्षी जून महिन्यात सादर करण्यात आले होते. त्यात भारताची लोकसंख्या, मतदार, विधानसभा व लोकसभेच्या जागा आदींची आकडेवारी आहे. एवढेच नाही तर त्यात महिला, तरुण, शेतकरी व छोट्या व्यापाºयांच्या आकडेवारीचाही उल्लेख आहे. त्यात २०२४ मधील १३ कोटी फर्स्ट टाइम मतदारांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पण, वर्षभरात सोनिया गांधी, राहुल गांधींना याचे महत्त्व कळले नाही. ते प्रशांत किशोर यांना कुजवल्याशिवाय राहणार नाहीत. प्रशांत किशोर यांना काँग्रेस घेईल ते फक्त त्यांनी दुसरीकडे जाऊ नये म्हणून. त्यांचा विचार ऐकण्यासाठी नाही.
पीकेंनी आपल्या सादरीकरणात सांगितले की, काँग्रेसचे आता राज्यसभा व लोकसभेत ९० खासदार आहेत. विविध विधानसभांत ८०० आमदार आहेत. काँग्रेसचे ३ राज्यांत सरकार आहे. ३ राज्यांत ते आघाडी सरकारमध्ये आहेत. दुसरीकडे, १३ राज्यांत काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष आहे. ३ राज्यांत सहकारी पक्षांसोबत मुख्य विरोधी पक्ष आहे. आपल्या प्रझेंटेशनमध्ये किशोर यांनी १९८४नंतर काँग्रेसच्या मतांत कशी घसरण झाली याची सविस्तर माहिती दिली आहे; पण याकडे लक्ष देण्यास काँग्रेस नेतृत्वाला वेळ नाही. काँग्रेसमध्ये कोणा सल्लागाराची आवश्यकता नसते. त्यामुळे रणनीतीकार म्हणून त्यांना तिथे बिल्कुल वाव असणार नाही. आज जरी प्रवेश केला, तरी २०२४च्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर नवीन घर शोधतील, नव्या पक्षाचा विचार करतील.
काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रशांत किशोर यांनी ३ फॉर्म्युले सांगितलेत. त्यामध्ये काँग्रेसने संपूर्ण देशात स्वबळावर निवडणूक लढवावी, तसेच भाजप व मोदींचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने विविध विरोधी पक्षांची मोट बांधून यूपीएला मजबूत करावे आणि काही ठिकाणी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, तर काही ठिकाणी सहकाºयांसोबत मिळून लढवावी. पण, असे करताना पक्षाच्या राष्ट्रीय प्रतिमेला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी. पण हे सल्ले काँग्रेस विचारात घेणार का? त्यामुळे भाजप, तृणमूल आणि आपला मोठे करण्यात यश आले, तरी पीकेंचे कर्तृत्व काँग्रेसमध्ये सिद्ध होणार नाही. काँग्रेसमध्ये विचारांची मोकळीक असणार नाही.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा