आज गुढीपाडवा. आजपासून शुभकृतनाम संवत्सर हे वर्ष सुरू होत आहे. शालिवाहन शकाचे वर्ष (इ. स. सु. ७८ वर्षांनंतर) या दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात तसेच भारताच्या इतर भागांत नूतन वर्षारंभ याच दिवशी मानतात. शालिवाहन सातवाहनचा अपभ्रंश असावा असे म्हणतात. सातवाहनांपैकी कोणी व कोणत्या प्रसंगी हा शक सुरू केला, हे निश्चितपणे सांगता येत नाही, पण शक हे परकीय असून, त्यांच्यावर सातवाहनांनी मिळविलेल्या एखाद्या महत्त्वाच्या विजय दिनापासून या शकाची सुरुवात झाली असावी, असे काही विद्वानांचे मत आहे. पण हिंदूंच्या नववर्षारंभाचा हा महत्त्वाचा दिवस आहे.
आपली संस्कृती ही कृषीप्रधान असल्याने सर्वच सण हे कृषी आधारित आहेत. त्यातील हा नववर्षाचा पहिला सण. या दिवशी गुढी उभारण्याचे महत्त्व फार शास्त्रीय आहे. गुढी उभारणे म्हणजे त्या गुढीसाठी असलेल्या वस्तूंना मानाचे स्थान देणे. या काळात नुकतेच नवीन पीक आलेले असते. त्यामुळे पहिले पीक आल्यानंतर पुढच्या हंगामासाठी जमीन स्वच्छ करण्याचा हा प्रारंभ असतो. नुकतेच काढलेले धान्य असते. धान्य आले की उंदीर येणार. या उंदरांपासून धान्याचे आणि जमिनीचे रक्षण होण्यासाठी उंदरांचे संहारक त्याठिकाणी जाणे आवश्यक असते. ते म्हणजे साप. सापांचा निवास मोठ्या प्रमाणात बांबूच्या बनात असतो. ही बांबूची बने मोकळी केली की साप जमिनीच्या शेताच्या दिशेने जातात आणि शेतातील उंदरांवर मात करतात. त्यासाठी बांबू किंवा कनक तोडण्याचे निमित्त हे गुढीपाडव्याचे असते. कडुलिंबाचा पाला हे कीटकनाशक आहे. धान्याची साठवणूक करताना अजूनही आपण कडुलिंबाचा पाला त्यात टाकतो. त्याचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आता रणरणते उन पडणार असते. त्वचाविकार आणि विविध विकार निर्माण होतात त्यासाठी हा कडुलिंबाचा पाला महत्त्वाचा असतो. गुढीसाठी वापरले जाणारे आणखी एक घटक म्हणजे गाठी किंवा साखरेची माळ. या दिवसात अशक्तपणा येतो. त्यासाठी हे सलाईन आहे, ग्लुकोज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. याशिवाय गुढीला कलश, ग्लास, भांडे असते ते जलसंचय करण्याचा संदेश देत असते. आपण बाहेर पडताना जशी पाण्याची बाटली बरोबर ठेवतो ते पूर्वापार आपल्याकडे सांगितलेले आहे. आज मिनरल वॉटरच्या बाटल्या आहेत पूर्वी प्रवासाला जाताना फिरकीचे तांबे असायचे. त्यामुळे हे सगळे सण कृषीप्रधान आणि शास्त्रीय आधारावर आहेत. म्हणून तो साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत करायचे असते.
प्रत्येक धर्मात वर्षारंभाचा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. त्यादृष्टीने चैत्रारंभ हा वर्षारंभाचा दिवस हिंदू लोक मानतात. नूतन वर्षाच्या उदयाबरोबर अंत:करणात नवीन आशांकुर उत्पन्न होऊन नवीन वर्ष आनंदात जावो, अशी सदिच्छा उत्पन्न होत असते. त्यामुळे एकमेकांची प्रेमाने भेट घेऊन सदिच्छा देण्याबरोबरच आपल्या अंत:करणात सत्कर्माबद्दल उमेद व दुष्कर्माबद्दल पश्चात्ताप उद्भवून आपले वर्तन सुधारण्यासाठी प्रेरणा देणारा हा सण महत्त्वाचा मानला जातो.
प्राचीन आणि मध्ययुगीन काळात वर्षाचा आरंभ निरनिराळ्या देशांत भिन्नभिन्न महिन्यात होत असे. साधारण ८०० वर्षांपूर्वी काश्मीर प्रांतात चैत्र हाच महिना प्रथममास मानीत. चैत्र शुद्ध १ हा दिवस तेथील लोक मोठ्या उत्साहाने पाळीत व हा परशत्रूस राजाने मागे हटविल्याचा दिवस आहे, असे ते समजत. गुप्तराजांची सत्ता एकेकाळी उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र पसरली होती, तेव्हा चैत्रारंभी वर्षारंभ होत असे.
वसंत ऋतूचा आरंभ याच दिवशी होतो. अनेक उत्सव या ऋतूस योग्य असल्याचे रूढ आहे. या तिथीला युगादितिथी असेही म्हणतात. या दिवशी शक्य असेल तर पाणपोई घालावी. चैत्रापासून चार महिन्यांपर्यंत प्राणिमात्रास जलदान करावे, असे सांगितले जाते. हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त असून, कोणत्याही नवीन कार्यारंभास हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
पुराणात गुढीपाडव्यादिवशी काही धार्मिक विधीही सांगितले आहेत. त्यात ब्रह्मपूजा हा महत्त्वाचा विधी असतो. महाराष्ट्रासारख्या ज्या काही प्रांतांत वर्षाचा आरंभ चैत्र महिन्यापासून होतो तेथे त्या महिन्याची पहिली तिथी समारंभाने आणि धार्मिक विधी करून साजरी करण्यात येते.
श्रीरामचंद्र चौदा वर्षे वनवास करून सीतेसह आपल्या नगरीत परत आले तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा होता, यासाठी हा दिवस वर्षाचा पहिला दिवस मानतात. वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व त्याला स्वर्गातील अमरेंद्राने या दिवशी वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला. ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली, अशा कारणांनी हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस ठरला. अशा अनेक धार्मिक समजुती या सणामागे आहेत.
या दिवशी मंगलस्नान करून स्त्री-पुरुष, मुले नवीन वस्त्रे परिधान करतात. घरासमोर गुढ्या-तोरणे उभारतात. बांबूच्या किंवा कनकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे वा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ व साखरेची माळ बांधतात आणि पूजापूर्वक ती सजवलेली गुढी दारात उभारतात. गुढी उभारण्यावरूनच या दिवसास गुढीपाडवा म्हटले जाते. शिवाय दरवाजासमोर चौरंग ठेवून त्याच्यावर ठेवलेल्या कलशाची पूजा करण्याचाही प्रघात काही ठिकाणी आहे. कलश व पताकायुक्त गुढी ही आनंदोत्सवाची दर्शक आहे. या सणाच्या निमित्ताने होणारे जलदान, निंबभक्षण हे निसर्गप्रेमाचे निदर्शक आहे. कडुलिंबाची पाने, मिरे, हिंग, लवण, जिरे व ओवा यांसह खाल्ली असता आरोग्य, बल, बुद्धी व तेजस्विता प्राप्त होते.
प्रफुल्ल फडके/ नैमित्तिक
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा