आज देशात काय किंवा राज्यात काय संवादाचा अभाव आहे. संवाद झाला नाही की, वाद होतात आणि गैरसमज पसरतात. पण संवादातून म्हणजेच चर्चेतून सगळे प्रश्न सुटतात. हनुमानाने कायम संवादाची भूमिका चोख बजावली. त्यामुळे तो सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तीमान आहे. हनुमानाच्या चरित्रात ते जागोजागी दिसून येते.
‘मनोजवं मारुततुल्यवेगमं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम/ वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।। साक्षात रामरक्षेत हनुमानाची ही स्तुती बुधकौशिक ऋषींनी केलेली आहे. कारण सर्व समस्येवर रामबाण उपाय शोधायचा असेल, रामाच्या भात्यातील महत्त्वाचा बाण हा हनुमान होता. या हनुमानाने प्रत्येक कठीण प्रसंगात उत्तम संवाद साधला आहे, चर्चेतून मार्ग काढला आहे. म्हणून आज राज्यकर्त्यांनी हनुमानाला समजून घेतले, तर आज सगळ्या समस्यांवर चर्चेतून मार्ग निघू शकतो. हनुमान रावणाविरोधात किंवा कोणत्याही वाईट प्रवृत्तींवर चिखलफेक करत बसला नाही, पत्रकार परिषदा घेत बसला नाही तर त्याने थेट संवाद साधून प्रश्न सोडवले.
सुग्रीव आणि रामाची मैत्री झाल्यानंतर, वाली वधानंतर रामाने पावसाचे चार महिने शांत राहण्याचा व त्यानंतर सीतेचा शोध घेण्याचा सल्ला दिला होता. चार महिने उलटल्यावर सुग्रीवाला थोडा विसर पडला होता, राजभोग घेण्यात तो गुंतला होता. अशा परिस्थितीत लक्ष्मण संतप्त झाला. आपली मदत घेतली पण परतफेड करायची वेळ आल्यावर सुग्रीवाला विसर पडला. म्हणून त्याला जाब विचारण्यासाठी संतप्त लक्ष्मण गेला. त्यावेळी सुग्रीवाचा मंत्री असलेल्या हनुमानाने हा प्रश्न चिघळू न देता, सुग्रीव आणि राम लक्ष्मण दोघांना मोठ्या चातुर्याने सांभाळले. सुग्रीवाला समज दिलीच पण हनुमानाने लक्ष्मणाला थेट सामोरे जाण्यासाठी सुग्रीवाला न पाठवता तारेला पाठवले. तारा ही उत्तम प्रशासक होती. सुग्रीव सीतेच्या शोधासाठी मंत्र्यांची बैठक घेत आहेत, तोपर्यंत मी तुमचे स्वागत करते हे तारेने सांगितल्यावर लक्ष्मण शांत झाला. पण आजकाल तसे होत नाही. राज्यकर्त्यांशी चर्चा करायला आंदोलक आले तर त्यांच्याशी चर्चा केली जात नाही. मार्ग काढला जात नाही. पण हनुमानाने प्रत्येक कठीण प्रसंगात योग्य संवाद साधला आहे.
रामाचा निरोप सीतेपर्यंत नेताना राम आणि सीता दोघांच्यात लवकर भेटीचा प्रसंग यावा यासाठी तो सीतेचा पुत्र झाला. भरतभेटीपूर्वी भरताने काही अघटीत करू नये म्हणून राम येण्यापूर्वीच तिथे पोहोचून वर्दी दिली आणि अग्निकाष्ट भक्षण करण्यापासून भरताला रोखले. उत्तर रामायणात लव-कुश आणि सीतेचा शोध लागल्यावर रामाला त्याची कुणकुण न लागू देता या बालकांना आपल्या पित्यापर्यंत पोहोचवण्यात आणि अश्वमेघ यज्ञाचा घोडा अडवल्यावर दोघांचे युद्ध शांत करण्यातही हनुमानाची भूमिका महत्त्वाची होती. संवादातून प्रश्न सुटले, तरच रामराज्य येते, हा संदेश हनुमानाने दिलेला आहे.
उत्तम संवाद साधणारा आणि वाद दूर करणारा असल्यामुळेच त्याला रामदूत असे म्हटले आहे. अशा या श्रीरामदूताला शरण गेल्यावर सगळे प्रश्न चर्चेतून सुटतात. पण आज सगळे प्रश्न हे संवादाअभावी निर्माण झालेले आहेत. एसटी कर्मचाºयांशी सरकारचा नीट संवाद नाही, शिक्षकांशी नाही, विद्यार्थ्यांशी नाही. शेतकºयांशी संवाद नाही. फक्त टीका करण्यात वेळ जातो. हनुमान कधी रावणावर टीका करत बसला नाही, इंद्रजीतावर टीका केली नाही, कोणत्याही विरोधकावर टीका केली नाही. संवादातून प्रश्न सोडवण्याचा मंत्र दिला. हे आज प्रत्येकाला समजले तर प्रत्येकजण सुखी होईल. अगदी कौटुंबिक प्रश्नही संवादाअभावी चिघळतात. पण संवाद साधा आणि वाद टाळा हे हनुमानाने दाखवून दिले आहे, त्या हनुमानाला समजून घेतले, तर रामराज्य निर्माण होईल.
हनुमान हा चिरंजीव असल्याने त्याचा वावर महाभारत काळातही होता. त्यावेळीही मार्गावरून भरकटणाºया अर्जुन आणि भीम या दोघांना संवाद साधून त्यांचे गर्वहरण करण्याचे काम हनुमानाने केले होते. आपल्या शक्तीचा गर्व झालेला भीम जेव्हा जंगलातील झाडे, मोठमोठे वृक्ष उपटून टाकत होता. तेव्हा ही वृक्षतोड करण्यासाठी तुला शक्ती दिलेली नाही हे सांगण्यासाठी वृद्ध वानराच्या रूपात हनुमानाने त्याला दर्शन दिले. शेपटी उचलायला सांगितले. तर ती शेपटी उचलता आली नाही. यातून त्याने भीमाचे गर्वहरण केले होते. त्याच्याशी चांगला संवाद साधून त्याची चूक लक्षात आणून दिली. आज मेट्रोसाठी वृक्ष तोड झाल्यावर मेट्रोचे काम बंद केले गेले, रखडवले गेले, आरेमध्ये कारशेड नको म्हणून आंदोलन केले, चार वर्षे वाया घालवली. पण सरकारशी संवाद साधला असता तर मेट्रोचे काम रखडले नसते. पण आदर्शापासून राजकर्ते आणि राजकीय पक्ष भरकटले की असे होते.
अर्जुनालाही आपल्या धनुर्धर विद्येचा गर्व झाला होता. आपण रामापेक्षाही श्रेष्ठ आहोत असा भ्रम झाला. राम जर सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता तर त्याने समुद्रावर बाणांचा सेतु का उभारला नाही? वानरांच्या मदतीने सेतू का उभारला, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. तेव्हा रामाचे महत्त्व आणि संघटन कौशल्य काय असते हे योग्य संवादातून समजावून सांगितले. राम हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा होता. कणभर मातीचा कण आणणाºया खारीलाही त्या सेतुच्या कामाचे श्रेय रामाने दिले. तसे श्रेय सर्व वानरांना मिळावे हा त्याचा हेतू होता. नाही तर आजकाल कोणता महामार्ग कोण तयार करते आणि त्याला दुसºयाचेच नाव दिले जाते. श्रेय हिसकावून घेतले जाते, ती अर्जुनाची गर्विष्ठ प्रवृत्ती असते. रामाने कोणाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही हे संवादातून हनुमानाने दाखवून दिले. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा