मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

महाराष्ट्राला शांतता हवी आहे


गेले काही दिवस सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्राचे इतके वातावरण गढूळ केले आहे की, सगळीकडे अशांतता माजली आहे. महाराष्ट्रात असे वातावरण अभिप्रेत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे भंग पावणारी अशांतता थांबवण्याची गरज आहे. सर्वच पक्षांत असे लोक आहेत, त्यांना आवर घालण्याचे काम सर्व पक्षांच्या नेत्यांनी केले पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वच वृत्त वाहिन्यांनी अशा नेत्यांना थोडे डावलले पाहिजे. काही तरी करमणूकप्रधान वक्तव्य मिळतात, म्हणून त्यांचे कोट घेणे, प्रतिक्रिया घेणे हे प्रकार थांबवले पाहिजेत, कारण महाराष्ट्राला शांतता हवी आहे.


वृत्त वाहिन्यांनी काही दिवस किरीट सोमय्या, संजय राऊत, अमोल मेटकरी या नेत्यांची वक्तव्ये दाखवणे थांबवले पाहिजे. आता शुक्रवार, शनिवार संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईला वेठीस धरण्याचा प्रकार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांनी केला. त्यामुळे शिवसैनिक भडकले आणि दोन दिवस दुसरा कोणताही विषय टीव्हीवर दिसत नव्हता. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक झाल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले. त्यानंतर तेथून परतत असताना सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. किरीट सोमय्या कशासाठी गेले होते खार पोलीस ठाण्यात?, प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया दिली पाहिजे, असे का सोमय्यांना वाटते?, तुम्हाला काय भ्रष्टाचाराची प्रकरणे काढायची आहेत ती काढा; पण वातावरण गरम असताना पोलीस ठाण्यात जाण्याची काय गरज होती?, तिथं ठिय्या देऊन शिवसैनिक दोन दिवसांपासून आहेत, हे सर्वांना माहिती होते. असे असताना आक्रमक शिवसैनिक अंगावर येणार हे गृहीत होते. असे असताना किरीट सोमय्या तिथे गेलेच कशासाठी?, राणा पती-पत्नी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेली होती. काँग्रेस पुरस्कृत ते उमेदवार होते. ते भाजपचे नेते, कार्यकर्ते नव्हते. मग त्यांना अटक केली, म्हणून तिथे बघायला सोमय्या कशासाठी गेले? त्यांनी भाजप प्रवेश केला असेलच, तर भाजपचे चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे जातील ना पाहायला. ते कोणीही गेलेले नसताना किरीट सोमय्या तिथले वातावरण बिघडवायला कशासाठी गेले, हा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे.

कधीकधी आपलं बरोबर असलं तरी गप्प बसण्यातच शहाणपणा असतो. आधीच मुंबई पोलिसांवर दोन दिवसांपासून इतका ताण पडलेला आहे. तहान-भूक विसरून या कडक उन्हाळ्यात, काही दंगा होऊ नये, म्हणून त्यांना अहोरात्र काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत किरीट सोमय्यांचे काय कारण होते तिथे जाण्याचे?, तुमची यंत्रणा इतकी प्रभावी आहे, तर पाहिजे ती माहिती फोनवरून सोमय्यांना मिळाली असती; पण वातावरणात तणाव निर्माण करण्यासाठी तिथे जाणे टाळायला हवे होते. महाराष्ट्राला शांतता हवी आहे, यासाठी अशा नेत्यांना पक्षप्रमुखांनी आवर घातला पाहिजे.


किरीट सोमय्या यांना झेड प्लस सिक्युरिटी असतानाही हल्ला कसा झाला, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. यावर आता सोमय्यांनी भाष्य केले आहे. किरीट सोमय्या म्हणाले, झेड सिक्युरिटीचा अर्थ असा आहे की, जे प्रोटेक्टी आहेत त्यांची सुरक्षा करणे. झेड सिक्युरिटी कायद्यात लिहिले आहे की, लोकल बंदोबस्त हा स्थानिक पोलिसांनी करायचा आहे. हजारोंची संख्या तिथे असताना, वातावरण तणावपूर्ण असताना पोलिसांवर ताण टाकायला ते बाहेरच का पडले?, पोलिसांना तेवढीच कामे आहेत का?, यापूर्वीही शिवसैनिकांकडून सोमय्यांवर हल्ले झालेले आहेत. असे असताना सोमय्यांनी अशा परिस्थितीत जाणे चुकीचे होते. त्यांना भाजपच्या नेत्यांनी का अडवले नाही?

कोणत्याही पक्षाचे मोठे नेते बोलत नाहीत. या संपूर्ण प्रकरणात भाजपचे केंद्रीय नेते बोलले नाहीत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शांत होते. हा संयम महत्त्वाचा होता; पण प्रसिद्धीच्या सतत झोतात राहण्याची सवय लागल्याप्रमाणे किरीट सोमय्या, संजय राऊत हे मात्र सतत प्रतिक्रिया देत होते. त्यामुळे वातावरण बिघडत होते. महाराष्ट्रात अशा प्रकारे वातावरण तापवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. अतिपरिचयात अवज्ञा होते, त्याप्रमाणे सतत कॅमेºयापुढे आल्याने जनतेच्या मनातून तुम्ही उतरत आहात, हे अशा नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. वाहिन्यांनीही प्रत्येक गोष्टीवर, घटनेवर याच नेत्यांची प्रतिक्रिया घेण्याची गरज नाही. जरा नवे चेहरे दाखवा. नाही तर वाहिन्यांचाही टीआरपी खाली येईल. एकाही वाहिनीला आपण कोणा वेगळ्या नेत्याची प्रतिक्रिया घ्यावी असे वाटत नाही.


प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाइन्स

9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: