महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे यांना भारत सरकारचा सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार साधारण साठ वर्षांपूर्वी म्हणजे १९६३ साली मिळाला. कोकणातील पेढे परशुराम, तालुका चिपळुण, जिल्हा रत्नागिरी इथे त्यांचा ७ मे, १८८० ला जन्म झाला होता, तर आजच्या दिवशी १८ एप्रिल, १९७२ ला त्यांचे निधन झाले. आजवर दिलेल्या भारतरत्न पुरस्कारप्राप्त मान्यवरांपैकी अनेकांची माहिती नव्या पिढीला नाही. कोकणातील या व्यक्तिमत्वाला तो पुरस्कार मिळाला होता त्याची माहिती नव्या पिढीला असणे आवश्यक आहे. पां. वा. काणे हे भारतीय कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक होते.
कोकणातील वेदशास्त्रपारंगत व विद्वत्तेची मोठी परंपरा असलेल्या अशा मध्यमवर्गीय कुटुंबात काणे यांचा जन्म झाला. त्यांचे पणजोबा उत्तम ज्योतिषी आणि पंचांगकर्ते, तर आजोबा वैदिक पंडित, ज्योतिषी आणि उत्तम वैद्य होते. वडील वामनरावांना वेद, उपनिषदे, भगवद्गीता यांचे सखोल ज्ञान होते. महत्त्वाचा असा ऋग्वेद तर त्यांचा तोंडपाठ होता. वामनराव पुढे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन, न्यायालयात इंग्रजीतून कामकाज करणारे पहिलेच वकील ठरले, म्हणजे परंपरागत भारतीय ज्ञान आणि आधुनिक इंग्रजी भाषेतील कायद्याचे ज्ञान असा मिलाफ असलेले असे त्यांचे वडील वामनराव! डॉ. पां. वा. काणे यांचे आजोबा म्हणजे आईचे वडीलही वैदिक पंडित आणि वैद्यकीचे उत्तम ज्ञान असलेले असे होते.
पां. वा. काणे यांना अमरकोशातील सर्व श्लोक लहानपणीच तोंडपाठ होते. लहान वयातच त्यांनी विविध नियतकालिकांतून आधी मराठीतून आणि नंतर इंग्रजीतून लेखन सुरू केले. त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्तेचा आलेख सतत वरच चढत गेला. बी. ए. आणि संस्कृतमधून एम. ए. करतानाच त्यांनी अनेक विषयांमध्ये संशोधन सुरू केले. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांबरोबरच त्यांनी फ्रेंच आणि जर्मनसह अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. अशा रितीने त्यांनी अतिशय मेहनतीने स्कॉलरशीप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, त्यामुळे बी. ए.ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम आले. त्याबद्दल त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले होते. मग एल्ा.एल.बी. झाले. नंतर वेदांत पारितोषिकासह ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालय येथून एम. ए. झाले. त्यानंतर हिंदू-मुसलमान कायदा घेऊन एल्ा.एल.एम. झाले. या परीक्षेत त्यांना व्ही. एन. मंडलिक सुवर्ण पदक मिळाले.
काणेंनी १९०४ साली रत्नागिरी जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली. नंतर ते एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबई येथे नोकरीवर होते. मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येसुद्धा त्यांनी शिकवले होते. मुंबई विद्यापीठाचे ते १९४७ ते १९४९ दरम्यान कुलगुरू होते.
प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास, सामाजिक अभिसरणाचे भान या दोन अगदी वेगळ्या वाटणाºया गोष्टींमधून काणे यांनी धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. १९४१ साली त्यांनी प्राच्यविद्येवरचा ग्रंथ लिहिला. १९४२ साली त्यांना 'महामहोपाध्याय' ही पदवी मिळाली. 'हिस्ट्री आॅफ संस्कृत पोएटिक्स' हासुद्धा त्यांचा अजून एक महत्त्वाचा ग्रंथ. भारत रामायणकालीन समाजस्थिति (१९११) आणि धर्मशास्त्रविचार (१९३५) हे ग्रंथ त्यांच्या महत्त्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत. प्राचीन भाषा, वाङ्मय, काव्य महाकाव्य, अलंकारशास्त्र यांचे प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरांचा कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि अशा शेकडो पैलूंचे एक विस्मयकारी मिश्रण पांडुरंगशास्त्रींच्या लेखनात झाले. खगोलविद्या, सांख्य, योग, तंत्र, पुराणे आणि मिमांसा या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्यावर भाष्य लिहिले. त्यांचे हे प्रकांड पांडित्य, हा साक्षेपी व्यासंग ही तैलबुद्धी आणि सखोल संशोधनाची आस पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत झिरपली गेली.
प्राचीन ज्योतिषशास्त्र, खगोलविद्या, योगशास्त्र, पुराणे, टीका आणि मिमांसा, सांख्य तत्त्वज्ञान, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, कौटिल्याचे अर्थशास्त्र, गणित, धर्मशास्त्र, मराठी भाषेचा सर्वांगीण अभ्यास, काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र, अशा असंख्य विषयांवर त्यांनी सुमारे ४० ग्रंथ, ११५ लेख, ४४ पुस्तक परिचय/परीक्षणे लिहिली आहेत. यावरून त्यांच्या ज्ञानाचा आवाका आणि प्रचंड विस्तार लक्षात येतो.
ब्रिटिशांनी येथे आपले बस्तान बळकट करतानाच इथल्या संस्कृती, विद्या, ग्रंथ, प्रथा, समाज, रूढी यांची कुचेष्टा सुरू केली. मिशनºयांनी हिंदू धर्माची विविधांगी टिंगल सुरू केली. त्यामध्ये त्यांनी इथल्या काही तथाकथित विद्वानांनाही सामील करून घेतले. इंग्रजीतील एखादी कविता ही संपूर्ण संस्कृत काव्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असे अत्यंत उर्मट उद्गार मेकॉलेसारख्या अधिकाºयाने काढले होते. लॉर्ड कर्झनने, तर भारतीयांना सत्य म्हणजे काय याची कल्पनाच नसल्याची दर्पोक्ती केली होती. डॉ. काणे या सर्व गोष्टींनी व्यथित झाले होते. १९२६ मध्ये त्यांनी व्यवहारमयुख हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यावेळी केलेला अभ्यास, जमविलेली कागदपत्रे आणि अन्य साधने, आजवरचे धर्म आणि कायदा यांचे ज्ञान अशा भक्कम तयारीनिशी त्यांनी भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. इंग्रज आणि इतर युरोपीय देशांना कळावे म्हणून त्यांनी हा परिपूर्ण इतिहास इंग्रजीत लिहिला. सुमारे ७००० पाने आणि ५ खंडांमध्ये त्यांनी लिहिलेला हा इतिहास आजही जागतिक पातळीवर अचूक आणि प्रमाण म्हणून मानला जातो.
समाजसुधारणा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार हे सुद्धा डॉ. काणेंची वैशिष्ट्ये होती. भारतीय कायदे आणि रुढींचा अभ्यास असलेल्या डॉ. काणेंनी तत्कालीन अनिष्ट चालींविरुद्ध आवाज उठवला होता. विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणे, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचे वकीलपत्र घेतले होते. आंतरजातीय विवाह, विधवा विवाह, तसेच घटस्फोटाचा अधिकार याचाही त्यांनी पुरस्कार केला; पण वकिली आणि शिक्षणक्षेत्रात सक्रिय असणाºया काणेंनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला नाही. सन १९५३ ते १९५९ या काळात पां. वा. काणे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. पां. वा. काणे यांना १९४६ साली अलाहाबाद विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली, तसेच १९६० साली पुणे विद्यापीठाने सुद्धा सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली. काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास मराठीत लिहून काढला. या कामाबद्दल त्यांना १९५२ साली नॅशनल प्रोफेसर हा पुरस्कार देण्यात आला. ते राष्ट्रपतींनी निवडलेले असे राज्यसभेचे खासदार झाले.
काणे यांना १९६३ साली भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'हिस्ट्री आॅफ धर्मशास्त्र'च्या पाच खंडांपैकी चौथ्या खंडाला १९६५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. डॉ. काणे मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे फेलो होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळावर त्यांनी काम केले. 'महाराष्ट्र साहित्य परिषदेचे' उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले. 'लंडन स्कूल आॅफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज' या संस्थेने त्यांना फेलोशिप दिली.
महामहोपाध्याय पां. वा. काणे यांना सन १९६३मध्ये भारताचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब देण्यात आला. भारतात २०१९ सालापर्यंत ४५ व्यक्तींना भारतरत्न हा सन्मान देण्यात आला.
प्रफुल्ल फडके/संस्कृती
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा