मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

महागाईवर कोणी बोलणार आहे की नाही?


देशातले राज्यातले सगळे प्रश्न संपले आहेत, कोणीही चिंतेत नाही, त्यामुळे काही तरी उचापती करायच्या म्हणून निरनिराळे वाद उकरून काढायचे, असा सध्या राजकारणाचा प्रवाह संपूर्ण देशात चाललेला दिसतो आहे; पण यामध्ये सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत असलेल्या महागाईवर कोणीही काहीही बोलताना दिसत नाही.


खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जर हनुमान चालिसा या विषयापेक्षा महागाईचा मुद्दा हातात घेतला असता आणि त्यासाठी रस्त्यावर उतरले असते, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना प्रतिसाद मिळाला असता. आज जीवनावश्यक वस्तूंच्या किमती इतक्या भयानक वाढल्या आहेत की, सामान्यांचे जगणे कठीण झालेले आहे. भाजीपाल्याचे भाव तर इतके वाढले आहेत की, गृहिणींना आपल्या नवºयाला टिफीनमध्ये काय द्यायचे हा प्रश्न पडलेला आहे. यावर कोणीच बोलत नाही. रोटी कपडा और मकान या चित्रपटातील महंगाई मार गयी या गाण्याची प्रचिती आता येताना दिसत आहे. ‘पहले मुठ्ठी में पैसे जाते थे, थैलाभर शक्कर आती थी, अब थैले में पैसे जाते हैं, मुठ्ठी में शक्कर आती हैं,’ या त्या गाण्यातील ओळीप्रमाणे आजची परिस्थिती आहे. त्यावर कोणीही बोलत नाही.

महागाई का झाली, तर राज्याने केंद्राकडे बोट दाखवायचे, केंद्राने राज्याकडे बोट दाखवयाचे. या प्रकाराला सामान्य माणूस वैतागला आहे. सामान्यांच्या प्रश्नावर बोलणारा कोणीच नाही, त्यामुळे फक्त वाचाळवीरांचे राजकारण होताना दिसत आहे. दुधाची दरवाढ मागच्या आठवड्यात झालेली आहे. खाद्यतेलाच्या किमती तर इतक्या वाढल्या आहेत की, त्याची दरवाढ का तर म्हणे रशिया-युक्रेन युद्धामुळेही दरवाढ झालेली आहे. स्थानिक बाजारात तयार होणाºया तेलाचा आणि रशियाच्या युद्धाचा काय संबंध आहे, याचे उत्तर सामान्य माणसाला मिळत नाही. आता १ तारखेपासून म्हणे सलूनचे दर ३० टक्क्यांनी वाढणार आहेत. खरंतर लॉकडाऊन उठल्यानंतर त्यांनी सगळे दर दुप्पट केले होते. निर्बंध उठल्यावर ते पुन्हा कमी केलेले नाहीत, तरी ही दरवाढ होणार आहे. ओला-उबेर आणि टॅक्सी-रिक्षांचे दर आता वाढणार आहेत. त्यामुळे कोणतीच गोष्ट आता स्वस्त राहिलेली नाही. रस्त्यावरचा चहा महागला, वडापाव महागला. यावर कोणीही काहीही बोलत नाही. फक्त राजकारण आणि टाईमपास चालला आहे. चिखलफेक करण्याची चढाओढ लागली आहे. हे प्रकार कधी बंद होणार आणि जगणे कसे सुखकर होईल, म्हणून सामान्य माणूस चिंतेत आहे.


एक काळ असा होता की मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर अशा रणरागिणी महागाई, टंचाई, दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरायच्या आणि जनतेला न्याय मिळवून द्यायच्या. सत्ता हालवायची ताकद त्यांनी निर्माण केलेली होती; पण आजकाल स्टंटबाजी करण्यात राजकारण चालले आहे. महिलांच्या प्रश्नावर, सामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरले पाहिजे, असे महिला असूनही नवनीत राणांना का वाटले नाही?, कोणा आमदाराची किती लग्न झाली, कुणाला फसवले, कुणी महिलांवर अत्याचार केले, पिडीतेला कसे फसवले यावर महिला नेत्या आक्रमक होताना दिसतात. त्यासाठी पत्रकार परिषदा घेतात; पण सामान्य गृहिणींना भेडसावणाºया महागाईविरोधात महिला नेत्याच उतरत नाहीत, ही शोकांतिका आहे. आम्ही महिलांच्या प्रश्नावर लढा देतो, असे सगळ्या पक्षातील नेत्या म्हणतात. यामध्ये भाजपच्या चित्रा वाघ असतील, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण असतील आणि अन्य पक्षातील महिला नेत्या असतील; पण महिलांचे प्रश्न म्हणजे फक्त त्यांच्यावर होणारे बलात्कार आणि फसवून शरीरसंबंध हेच आहेत का?, सामान्य महिलांना घर कसं चालवायचं हा प्रश्न पडतो, त्यासाठी महागाईविरोधात लढा देण्याची जबाबदारी का कोणी घेत नाही?, पण तसे केले तर फारशी प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे सगळ्यांनाच महागाईचा विसर पडल्याचे दिसते. त्यामुळे सामान्य माणसांचा सवाल आहे की, महागाईवर कोणी बोलणार आहे की नाही?

महागाईच नाही, तर सर्वसामान्यांचे खूप प्रश्न आहेत. शिक्षणाचा प्रश्न आहे. शिक्षणाचे लॉकडाऊनमुळे तीन तेरा वाजले आहेत. अजून पूर्वपदावर त्याची घडी आलेली नाही. दहावी- बारावी परीक्षांचे पेपर तपासण्यास काही शिक्षक संघटनांनी नकार दिला आहे. त्यामुळे दहावी-बारावीचे निकाल वेळेत लागतील याची शक्यता नाही. भावी पिढीचे किती नुकसान होताना दिसत आहे. यावर कोणीही राजकीय नेता बोलायला पुढे येत नाही. कोणीही त्यावर आंदोलन करत नाही. अनेकांना एसटी संपाचा फटका बसल्यामुळे शाळेत जाता आले नाही. एसटी संपामुळे अतोनात नुकसान झाले. त्यावर कोणी वाच्यता करत नाही; पण जिथे फुकट प्रसिद्धी मिळते, अशा प्रकारांवर चर्चा करायला, रस्त्यावर उतरायला सगळे तयार असतात. कुणाचा अवमान झाला, कुणाच्या भावना दुखावल्या, कसली स्टंटबाजी झाली की, सगळे रस्त्यावर येतात; पण महागाई आणि सर्वसामान्यांसाठी कोणीच कसे काय रस्त्यावर येत नाहीत?, अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. अवकाळीने शेतकरी हवालदिल झालेला आहे. पाऊस भरपूर पडला, तरी पाण्याचे नियोजन न केल्यामुळे अनेक भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर कोणी का बोलत नाही?, हनुमान चालिसा, भोंगे इतके महत्त्वाचे आहेत की, त्यापुढे सामान्यांचे प्रश्न तुच्छ वाटावेत?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: