मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

साहित्य संमेलनातील अस्वस्थता



शनिवारपासून उदगीरमध्ये सुरू झालेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये संमेलनाध्यक्ष भारत सासणे, उद्घाटक शरद पवार आणि प्रमुख पाहुणे व ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ कोकणी लेखक दामोदर मावजो या तिघांच्याही भाषणांमध्ये लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा प्रकर्षाने चर्चिला गेला, परंतु त्यानिमित्ताने एकूण तिघांचाही रोख देशातील सध्याच्या राजवटीवरच असल्याचे दिसले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय भाष्य करण्याची संधी साधली गेली. अर्थात गेल्या काही वर्षांत हेच चित्र पाहायला मिळत आहे; पण किमान संमेलनाध्यक्ष सासणे यांनी, तरी साहित्यावरच बोलायला हवे होते; पण त्यांचे बरेचसे भाषण हे शेजारी बसलेल्या शरद पवारांना खूश करणारे ठरले. त्यांचे अध्यक्षीय भाषण बोचºया टोमण्यांनी ठासून भरलेले होते.

भाषणामधून अशा प्रकारची प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्धची मते प्रकट करणे हे प्रतिष्ठेचे ठरू लागले आहे. आपणही राजकीय भाषण चांगले करू शकतो, हे दाखवण्याची जणू अहमहमिका लागल्याचे दिसत होते. निवडणुकीची प्रचाराची व्यासपीठे कमी पडली म्हणून की काय, साहित्य संमेलनातही विरोधकांवर टीका करण्याचा प्रकार केला जात आहे, असे वाटते. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसताना उगाचच भीतीचा बागुलबुवा निर्माण केला जात आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर साहित्यिक भूमिकेच्या आडून आपली विशिष्ट राजकीय भूमिका आणि विचारधारा मांडण्यासाठीच सर्रास होत आलेला आहे, असे गेली काही वर्षे प्रकर्षाने दिसत आहे.


दोन वर्षांपूर्वी बडोद्याच्या संमेलनात तत्कालीन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी राजा, तू चुकतो आहेसचा इशारा दिला होता. या संमेलनामध्ये सासणेंनी यंत्रयुग आणि तंत्रयुगानंतर आपण भ्रमयुगात येऊन पोहोचलो आहोत, सामान्य माणूस भ्रमित, संमोहित झालेला आहे, त्याची वाचा हरवलेली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून व्यापून राहिलेली आहे आणि या भीतीबद्दल साहित्याने बोलणे, सांगणे अपेक्षित आहे, असे ठासून सांगितले; पण बाकी कोणापासून सुरुवात होण्यापेक्षा सासणे यांनीच अगोदर लिहावे आणि व्यक्त व्हावे. ते लिहिले तर अशी कोणतीही परिस्थिती नाही हे दिसून येईल. त्यामुळे हा भ्रम राहणेच चांगले, असे वातावरण साहित्य संमेलनातून निर्माण केले जात आहे.

सासणे आपल्या भाषणात म्हणतात, आपण सध्या छद्मबुद्धी विध्वंसकांच्या ताब्यामध्ये जातो आहोत, ही काळरात्रीची सुरुवात आहे. एका पुंगीवाल्यामागून समाज फरफटत चाललेला आहे वगैरे वगैरे कोरडे ओढत त्यांनी आपली विशिष्ट राजकीय भूमिकाच आपल्या अध्यक्षीय भाषणामधून मांडण्याचा प्रयत्न केला. पण, पुंगीवाल्यामागे माणसे जात असतील, तर त्या अगोदर उंदीरही गेले आहेत, हे समग्र भा. रा. तांब्यांच्या कवितेतील पूर्वाध विसरलेला दिसतो.


संमेलनाचे उद्घाटक शरद पवार तर स्वत: राजकारणी नेतेच आहेत. त्यामुळे त्यांनीही देशातील विद्यमान राजकीय नेतृत्वावर ताशेरे ओढणे स्वाभाविक होते. त्यात भरीस भर म्हणून आपले ज्ञानपीठकार दामोदर मावजो यांनी आज साहित्यात सत्ताधाºयांना चिअर्स करणारे चिअर लीडर्स तयार झाले आहेत, असे म्हणत आपलेही हात धुवून घेतले. सत्ताधाºयांना चिअर्स करणारे चिअर लीडर्स आजच तयार झालेले आहेत काय? प्रत्येक राजवटीमध्ये, प्रत्येक विचारधारेच्या राजवटीमध्ये असे सत्तेपुढे नांगी टाकणारे होते. किंबहुना केव्हा नव्हते हे पण सांगता येणार नाही.

विशिष्ट विचारधारेचाच साहित्यिक हा ताठ कण्याचा असतो, असे कसे काय म्हणता येईल? आणीबाणीच्या काळ्या कालखंडामध्ये कोणी कोणी साहित्यीकांना वेठीस धरले हे सगळ्यांना माहिती आहे. अगदी कराडच्या साहित्य संमेलनापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कराडमध्ये लाडक्या व्यक्तिमत्वाची अंत्ययात्राही काढली होती. याचा शरद पवारांना विसर पडलेला असेल का?


साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे जरूर असावे, परंतु ते त्याच्या आडून आपल्या राजकीय भूमिका मांडण्याचा मंच बनू नये, एवढीच सामान्य वाचकाची अपेक्षा आहे. सामान्य वाचक आपली साहित्यिक भूक भागविण्यासाठी मोठ्या अपेक्षेने आलेला असतो. पण अशा व्यासपीठावरून राजकीय नेतृत्वाला जेव्हा विदूषक, थाळीवाला आणि पुंगीवाला संबोधून खिल्ली उडविली जाते, तेव्हा एका परीने देशातील लोकशाही प्रक्रियेप्रतीच यातून अविश्वास प्रकट होतो. त्यामुळे त्यांनी भाषणांतून मांडली गेलेली अस्वस्थता ही खरोखर लेखकाची अस्वस्थता आहे की, सत्तेपासून दूर राहिलेल्या विचारांची अस्वस्थता आहे, याचा विचार केला पाहिजे.

साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे राजकीय झाल्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांची हुजरेगिरी करण्याची वेळ जर संमेलनाध्यक्षांवर येत असेल, तर लेखक स्वत:ची मते कशी काय मांडणार? स्पष्ट मते मांडणारे, व्यक्त होणारे लेखक या महाराष्ट्रात नाहीत का?, कसल्या भीतीपोटी लेखक, साहित्यिक ही हुजरेगिरी करत आहेत?, सत्ताधाºयांवर टीका करण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांच्या दबावापोटी आणि त्यांना खूश करणारी मते व्यक्त करण्याचे ते व्यासपीठ आहे का?, म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा कोल्हापुरात संकल्प सभा आहे, त्या संकल्पाची सुरुवात साहित्य संमेलनातून केली काय, असा प्रश्न पडतो. साहित्य संमेलनापासून खरे साहित्यिक, वाचक लांब जात आहेत आणि राजकीय नेत्यांचे शक्तीप्रदर्शनाचे ते स्थान होत आहे, हे चांगले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: