२००४ पर्यंत काँग्रेसला कधीही आघाडी सरकारमध्ये रस नव्हता. आणले तर स्वबळावर सरकार नाहीतर नाही. त्यामुळे केंद्रात आघाडीचे असे आलेले काँग्रेसचे पहिले सरकार म्हणजे यूपीएचे. पण त्यापूर्वी बिगर काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देऊन नंतर पाठिंबा काढून घ्यायचा हा चमत्कार काँग्रेसने अनेकवेळा केलेला आहे. किंबहुना वर्ष-दीड वर्ष झाले की, पाठिंबा काढून घ्यायचा आणि सरकार कोसळवायचे हा काँग्रेसचा आवडीचा भाग. त्यामुळेच आज महाराष्ट्र सरकारला असलेला पाठिंबा आणि सरकारमधला वाटा हा कार्यकाल काँग्रेसच्या इतिहासात विक्रमी पाठिंबा देणारा आहे. काँग्रेसला पुरक वातावरण तयार होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने आहे त्यात समाधान मानत, दुय्यम अशी खाती घेत आपले सरकार आहे याचा आनंद काँग्रेस घेत आहे.
केंद्रातील राजकारणात काँग्रेसने सर्वात प्रथम पाठिंबा दिला तो चरणसिंग सरकारला. मोरारजी भाई देसाई यांचे जनता पक्षाचे सरकार कोसळवल्यानंतर त्यातून बाहेर पडलेल्या गटाचे नेते चरणसिंग यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आणि चरणसिंगांना पंतप्रधान केले. पण हे सरकार जेमतेम सहा महिने टिकले. २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० एवढाच या सरकारचा कालावधी होता. इंदिरा गांधींनी आपल्याला पोषक वातावरण तयार झाल्यावर हे सरकार कोसळवले आणि पुन्हा सत्तेवर आल्या.
काँग्रेसने केंद्रीय पातळीवर दुसºयांदा बिगर काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला तो चंद्रशेखर यांना. व्ही. पी. सिंग यांचे सरकार भाजपने पाठिंबा काढून घेतल्यावर कोसळल्यावर जनता दलातून एक गट फोडून त्याचे नेतृत्व चंद्रशेखर यांच्याकडे दिले आणि काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला. चंद्रशेखर हे १० नोव्हेंबर ९० ते २१ जून ९१ या कालावधीत पंतप्रधान राहिले. पण आपल्याला पोषक वातावरण तयार झाल्यावर राजीव गांधींनी चंद्रशेखर यांचा पाठिंबा काढून घेतला.
भाजपला सत्ता मिळू नये म्हणून बिगर भाजप पक्षांनी केलेल्या आघाडीचे नेतृत्व एच. डी. देवेगौडांकडे सोपवले आणि त्याला काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला. एच. डी. देवेगौडा १ जून ९६ ते २९ एप्रिल ९७ या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते, पण काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार कोसळवले. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान झाले. २९ एप्रिल ९७ ते १९ मार्च ९८ या काळात ते पंतप्रधान झाले ते काँग्रेसच्या पाठिंब्यावरच. पण कोणीही काँग्रेसचा भरवसा देत नव्हते. प्रत्येकाला माहिती होते की काँग्रेस आपल्याला पुरक वातावरण तयार झाले की, हा पाठिंबा काढून घेणार. पहिलेच विक्रमी सरकार
कर्नाटकात अलीकडेच कुमारस्वामी यांचे जनता दलाचे सरकार आले होते. या सरकारला काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला होता. २३ मे २०१८ ते २३ जुलै २०१९ या काळात त्यांनी सरकार चालवले, पण काँग्रेसने त्यांना अक्षरश: रडवले. नंतर पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे कोणत्याही केंद्रातील अथवा राज्यातील सरकारला काँग्रेसने सव्वा वर्षापेक्षा जास्त टिकू दिलेले नाही. पण हा विक्रम आता महाराष्ट्रातील काँग्रेसने मोडला आहे. या सरकारला दोन वर्ष आणि चार महिने पूर्ण झाले तरी हे सरकार काँग्रेसने पडू दिले नाही. याचे कारण महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व संपत आले आहे. त्यामुळे पदरात जे काही पडले आहे त्याच्या जोरावर पुढच्या निवडणुकीचे वातावरण करण्याची संधी ते साधत आहेत. जनतेची नाराजी पडणारी खाती त्यांच्या वाट्याला आली आहेत. पण तरीही आपल्या हातात एक सरकार आहे या भावनेने ते चिकटून आहेत. काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद होते. जवळपास सव्वा वर्ष हे पद रिकामे आहे. ते पद काँग्रेसकडे सोपवण्याची कोणतीही प्रक्रिया सरकार करत नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. एक गट संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली सोनिया गांधींना भेटणारही आहे. पण तरीही जे काही पदरात आहे ते टिकवून सरकारला चिकटून राहण्याचा त्यांचा बाणा अत्यंत कौतुकास्पद आहे. इतका दीर्घकाळ पाठिंबा देणारे आणि सत्तेचे वाटेकरी झालेले हे काँग्रेसचे पहिलेच विक्रमी सरकार आहे.
आपल्याला पोषक वातावरण तयार करण्यासाठी एखाद्या सरकारला पाठिंबा देणे यासाठी काँग्रेसने बाकीच्या पक्षांचा आजवर वापर करून घेतला आहे, पण आज गेल्या दोन वर्षांत राज्यात काँग्रेसला आपली छबी तयार करण्यात, एकजूट दाखवण्यात यश आलेले नाही. तसे राज्यात १९९९ ते २०१४ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर होते. या पंधरा वर्षांत विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे चार मुख्यमंत्री त्यांनी दिले. पण सरकारवर त्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे आघाडी सरकारपेक्षा ते काँग्रेस सरकार म्हणूनच ओळखले जात होते. आज मात्र महाविकास आघाडीत असूनही काँग्रेस अस्तित्व शून्यच आहे. जनतेचा रोष पत्करावा लागेल अशीच सगळी खाती त्यांच्याकडे आहेत. उर्जा खात्याच्या कारभाराने आणि घोषणांनी तर जनता हैराण झाली आहे. कोरोनाच्या काळात १०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार अशी घोषणा काँग्रेस मंत्र्यांनी केली. ती सरकारमधील अन्य पक्षांनी हाणून पाडली. त्याचा रोष पत्करावा लागला. तोच प्रकार शिक्षण खात्याबाबत. आज शिक्षण खात्यात प्रचंड अनागोंदी आहे. त्यामुळे सामान्य माणूस अस्वस्थ आहे. हा सगळा रोष काँग्रेस मंत्र्यांना ओढवून घ्यावा लागत आहे. तरीही त्यांनी आपल्याला कसलाच आधार नसल्याने पाठिंबा ठेवला आहे, तो विक्रमाकडे नोंद करणारा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा