उद्गीर येथे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. खरेतर आता साहित्य संमेलन मराठी भाषेचे आहे हे सांगावे लागते आहे. या संमेलनाच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे शुक्रवारी ग्रंथदिंडी काढली होती. त्या ग्रंथदिंडीतील युवतींच्या प्रतिक्रिया काही वृत्तवाहिन्यांवरून दाखवल्या गेल्या आणि त्याची अत्यंत कीव करावीशी वाटली. या युवती स्कुटी घेऊन आल्या होत्या आणि आमच्या उद्गीरमध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम होत असल्याचा आनंद आहे हे सांगताना, किती छान मुव्हमेंट आहे, काय छान इव्हेंट आहे, हिस्टॉरीकल मुव्हमेंट अशा प्रतिक्रिया देत होत्या. मराठी सारस्वतांचा मेळा असा टोकाचा शब्दप्रयोग एकीकडे केला जात होता, तर दुसरीकडे इंग्रजीतून प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. म्हणजे आपल्या आयुष्यात या मुलींनी एखादे तरी पुस्तक वाचले आहे का?, असा प्रश्न पडतो. साहित्य संमेलन म्हणजे काय असते याची कसलीही माहिती या मुलींना नसावी, इतकी दयनीय अवस्था आहे.
दुसरीकडे आज म्हणे २३ एप्रिल हा पुस्तक दिन म्हणून साजरा केला जात आहे. अरे पुस्तक हे काय एक दिवसच वाचायचे आहे का? कधी तरी बघायला ते काय पासबुक आहे का? पुस्तक दिन कसा काय साजरा केला जाऊ शकतो? तो रोजच वाचायचा दिवस असला पाहिजे. जशी पोटाची भूक तशी मेंदूची भूक आहे. त्यासाठी वाचनाचा खुराक दिला पाहिजे. पण तो दिला जात नसल्यामुळे डोक्यात चुकीचे विचार घुसतात.
खरेतर गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनात राजकारण्यांचा धुडघूस पाहायला मिळतो. त्यामुळे साहित्यिकांचे विचार ऐकायलाच मिळत नाहीत. राजकारण्यांनी साहित्य संमेलनात लूडबूड करू नये, यासाठी दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे यांनी प्रयत्न केले होते. दुर्गा भागवत यांनी तर आणीबाणीच्या निषेधार्थ त्यांना मिळालेली पद्मश्री आणि ज्ञानपीठ पुरस्कारही नाकारला होता. हे धाडस आजच्या साहित्यिकांमध्ये नाही. आजकाल एक पुस्तकी साहित्यिक झालेले आहेत. अखंड लिखाण करणारे लेखक, विचारवंत कुठे लुप्त झाले आहेत? वर्षातील चार दिवस तरी किमान सारस्वतांच्या चर्चा, गप्पा-गोष्टी ऐकायला मिळाव्यात अशी रसिकांची अपेक्षा असते. पण तिथेही राजकारणी मंडळी जात असल्यामुळे असाहित्यिकांचे साहित्य संमेलन होताना दिसते.
चांगले विचार मांडणारे, हसवणारे, करमणूक करणारे, ज्ञानात भर घालणारे भाषण आजकाल साहित्य संमेलनातून पाहायला मिळत नाही, हे दुर्दैव आहे. साहित्य संमेलनातून कसले चांगले ठराव मांडल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अत्यंत वाईट अवस्था गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनाची झालेली आहे. साहित्य संमेलनात त्या वर्षभरात किती पुस्तके प्रकाशित झाली, कोणती पुस्तके सर्वाधिक खपली, कोणत्या लेखकाची पुस्तके विकली गेली, याचा उहापोह कधी होताना दिसत नाही. त्यामुळे साहित्य संमेलनाचे गेल्या दहा-बारा वर्षांतील बदललेले स्वरूप पुसून टाकून त्याची पुनर्रचना करण्याची गरज आहे.
साहित्य संमेलन हे वाचकाभिमुख असले पाहिजे. साहित्याच्या प्रक्रियेतील अंतिम बिंदू किंवा उपभोक्ता हा वाचक आहे. वाचणारे कोणी असेल, तर लिहिण्याला अर्थ आहे, वाचणाराच नसेल तर सगळे लिहिलेले व्यर्थ आहे. पण वाचकांचा विचार होतो का? वाचकांना कमी किमतीत पुस्तके कशी मिळतील? त्याला वाचायला हवे ते पुस्तक कसे मिळेल यावर चर्चा झाली पाहिजे. विविध वाचनालयातून वाचल्या जाणाºया पुस्तकांचे सर्वेक्षण झाले पाहिजे. कोणती पुस्तके वाचली जातात याचे अहवाल वाचनालयांकडून मागवले पाहिजेत, त्याचा एकत्रित अहवाल तयार करून वाचकांचा नेमका कल आहे कुठे यावर माहिती संमेलनात मिळाली पाहिजे. प्रत्येक ग्रंथालयात वर्षभरात सर्वाधिक पुस्तके वाचणाºया वाचकाची नावे या संमेलनात दिसली पाहिजेत. वाचक हा घटक या प्रवाहातील सर्वात महत्त्वाचा आहे याचा विसरच सर्वांना पडला आहे. त्यामुळे कसलेही वाचन नसलेले लोक येथे मिरवायला येतात. त्यामुळे वाचकांना त्यांचे श्रेय मिळाले पाहिजे.
साहित्य संमेलनात प्रकाशकांचा सन्मान झाला पाहिजे. अनेक प्रकाशन संस्था वर्षानुवर्षे परंपरेने पुस्तके प्रकाशित करत असतात. प्रकाशकांची पुस्तके प्रकाशनामागची भूमिका, त्यांचे आर्थिक गणित ते कसे काय मांडतात यावर कुठे तरी चर्चा झाली पाहिजे. नवोदित लेखकांना त्यातून चांगले मार्गदर्शन मिळू शकते.
पुस्तक प्रकाशित होण्यात अनेक कलाकारांचा समावेश असतो. अनेक जण मुखपृष्ठ करणारे कलाकार असतात. अशा मुखपृष्ठ तयार करणाºयांना एखादे व्यासपीठ मिळाले पाहिजे. मुखपृष्ठ तयार करताना, त्याचे चित्र रेखाटताना तो कलाकार काय मेहनत घेतो, कसा विचार करतो यावर कुठे तरी भाष्य झाले पाहिजे.
साहित्य संमेलनाची दिंडी म्हणजे फक्त एक पालखी काढायची, त्यात ज्ञानेश्वरी आणि काही ग्रंथ ठेवायचे आणि मिरवत आणायची असे नाही. या दिंडीत साहित्यसेवेतील प्रत्येक घटक सामील झाला पाहिजे. वाचक असला पाहिजे. ग्रंथपाल असले पाहिजेत. प्रकाशक असले पाहिजेत. लेखक असले पाहिजेत. मुखपृष्ठ तयार करणारे, डीटीपी करणारे, छपाई काम करणारे कर्मचारी यांनाही कुठे तरी त्यात स्थान असले पाहिजे. पुस्तक काही आभाळातून पडत नाही. लेखकाने लिहिले की त्यावर अनेकांचे हात फिरत असतात आणि मग ते वाचकांपर्यंत पोहोचते, या प्रवाहातील प्रत्येकाला यात सामील केले, तर पुस्तके वाचली जातील. एक दिवस पुस्तक दिन साजरा करण्याची नामुष्की येणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा