- बॉलीवूडचा सुलतान सलमान खान याची हरिण शिकारप्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्याने त्याला दिलासा मिळाला असला तरी या निवाड्याबाबतची लोकभावना मात्र उलट सुलट अशीच आहे. निकालावरील सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आणि सोशल मीडियाचा नूर पाहिल्यास मोठ्या सेलिब्रिटींना आपल्याकडे नेहमीच मोकळे रान मिळत असल्याचा सूर त्यातून प्रामुख्याने व्यक्त होतो आहे. पण संशयाचा फायदा घेऊन म्हणा किंवा सबळ पुरावा नाही म्हणून सलमान सुटला असला तरी घडलेल्या घटनेतील काळविटांचे नेमके शिकारी कोण? हिट अँड रन प्रकरणातील दोषी कोण? याची उत्तरे मात्र मिळत नाहीत.
- कायद्यापुढे सर्वच समान हे घटनेतील एक प्रमुख तत्त्व आहे. मात्र प्रत्यक्षात अनेकदा बड्या मंडळींना मिळणारी खास वागणूक पाहून सर्वसामान्यांमध्ये आपपरभाव जागृत होतो. त्यातूनच मग अशा निवाड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. तथापि, न्यायालयीन प्रक्रिया लोकभावनेवर चालत नाही तर साक्षी-पुरावे, तपास यंत्रणांचे अहवाल, दोषारोपपत्रातील तपशील आदी बाबी तेथे महत्त्वाच्या ठरतात. किंबहुना त्याच्या आधारेच न्यायालयाला निकाल द्यावा लागतो. त्यामुळे अशा प्रसंगी मतप्रदर्शन करतेवेळी भावनेचा मुद्दा बाजूला ठेवून या सगळ्या बाबी जाणून घ्यायला हव्यात.
- साधारण वीस वर्षांपूर्वी केलेल्या काळवीट शिकारप्रकरणी सलमानची राजस्थान उच्च न्यायालयात झालेली सुटका म्हणजे जणू ‘मुंबई हिट अँड रन’ खटल्याची पुनरावृत्ती ठरावी. फिल्मी भाषेत ज्याला ‘सिक्वेल’ म्हणतात तोच प्रकार इथे झाल्याच्या सर्वत्र भावना आहेत. कारण या दोन्ही वादग्रस्त खटल्यांत मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या सलमानच्या सुटकेचा प्रवासही एकाच मार्गाने झाला आहे. मुंबई प्रकरणात सलमानला खालच्या न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. पण मुंबई उच्च न्यायालयात त्याची निर्दोष मुक्तता झाली. हरिण शिकार प्रकरणाचा घटनाक्रमसुद्धा अगदी असाच आहे. १९९८ मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या सूरज बडजात्या यांच्या ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये जोधपूरनजीक सुरू होते. यावेळी सलमान सहकलाकारांना घेऊन दोन दिवस शिकारीला गेला आणि तेथे त्याने एकूण तीन हरणांची का काळविटांची शिकार केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
- सलमानसारखा सेलिब्रिटी खटल्यात गोवला गेल्याचे पाहून माध्यमांनी मुद्दा खूपच उचलून धरला. देशभरात त्यावर गदारोळ उडून सलमानला प्रथम तुरुंगवारी घडली आणि नंतर न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले. कनिष्ठ न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत एका प्रकरणी एक तर दुसर्या प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यावर सलमानने उच्च न्यायालयात दाद मागितली असता सुनावणीअंती त्याची निर्दोष मुक्तता झाली.
- मुंबईपाठोपाठ राजस्थान उच्च न्यायालयानेही सलमानला आरोपमुक्त केले आणि लोकभावना लक्षात घेता महाराष्ट्र शासनाप्रमाणेच राजस्थान सरकारनेही आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे सूतोवाच केले आहे. साहजिकच सलमानच्या डोक्यावरील टांगती तलवार या दोन्ही प्रकरणांमध्ये तूर्तास तशीच राहणार आहे.
- मात्र, दुसरीकडे सर्वसामान्यांमध्ये या निकालावर उमटत असलेल्या प्रतिक्रिया या संबंधित यंत्रणा आणि प्रक्रियेलाच संशयाच्या भोवर्यात लपेटणार्या आहेत.यातील वास्तव मात्र लोकभावनेपासून काहीसे दूर आहे. कारण न्यायालयीन प्रक्रियेत कुणाला काय वाटते यापेक्षा साक्षी-पुरावे काय सांगतात त्याला महत्त्व असते. सलमान का सुटला त्याची कारणे पाहिल्यास ज्यांनी तक्रार दाखल केली त्यांची साक्षीप्रसंगी गैरहजेरी, वन विभाग आणि पोलिसांच्या तपास अहवालात असलेली तफावत, १२ पैकी १० आरोपी अगोदर निर्दोष ठरत असतील तर सलमानच दोषी कसा हा प्रश्नही महत्वाचा ठरतो. अन्य आरोपींविरोधात काही म्हणणे नाही, मग सलमानच्याच बाबतीत शिक्षा वाढवण्याचा खटाटोप का, यासारख्या प्रश्नांना सरकार पक्षाकडे समाधानकारक उत्तरे नसल्याचे दिसते. हे लक्षात घेतल्यास सलमानच्या सुटकेबाबतचा संभ्रम बर्याच अंशी दूर होतो.
- परंतु सलमान दोषी नाही तर मग दोषी कोण, तेदेखील स्पष्ट होत नसल्याने संशयही कायम राहतो. हरणे तर मेली. ती सलमानने मारली नसतील तर कुणी मारली ? मुंबई प्रकरणात सलमान निर्दोष असेल तर झोपलेल्यांच्या अंगावर गाडी घातली कुणी? या प्रश्नांची उत्तरेही मिळायला हवीत. ती मिळत नसल्याने सलमानचा बचावाबाबत संशय वाढवतो. त्यातून एक प्रकारची लोकभावना निर्माण होते. म्हणून प्रशासन, पोलिस व संबंधित यंत्रणांनी आरोपीला संशयाचा फायदा मिळणार नाही याची तजवीज प्राथमिक टप्प्यापासूनच करायला हवी. पूर्वी यावर फारशी चर्चा होत नव्हती. पण आता सोशल मिडीया म्हणजे फेसबुक आणि व्हॉटसअप च्या माध्यमातून त्यावर राळ उठवली जात आहे. जे उघडपणे बोलता येत नाही ते बिनधास्तपणे बोलून लोकभावना तयार केल्या जात आहेत. त्यामुळे पैशाच्या जोरावर न्याय विकत घेतला जातो की काय? अशी भावना वाढीस लावण्यास प्रोत्साहन मिळते आहे. संजय दत्त आपली शिक्षा पूर्ण करून आला पण सलमान सुटला याचेही दु:ख अनेकांना आहे. परंतु जोपर्यंत खरे आरोपी समोर येत नाहीत तोपर्यंत सोशल मिडीयातून सलमान निर्दोष सुटलेला नाही हे नक्की.
- 26.7.2016
सोमवार, १ ऑगस्ट, २०१६
मग खरे आरोपी कोण?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा