शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

रडून उपयोग नाही, कठोर व्हा


  •  मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना? असं एक वाक्य एका ऐतिहासिक मराठी नाटकात आहे. छत्रपतीर संभाजी राजांपुढे साक्षात मृत्यूचे तांडव सुरू असताना, संकटांची मालिकाच असतानाही धीर न सोडता ते संकटाला हसत हसत सामोर जात होते. आपल्या दु:खाने खचलेल्या सहकार्यांना ते समजावताना म्हणतात की हे संकट काय फार मोठे नाही. मोठे संकट किंवा अघटीत कशाला म्हणता येईल? जेव्हा मुंगीसारखा इवलासा किटक मेरू पर्वत खाऊन फस्त होईल. आज असाच सवाल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारावा लागेल. कारण गेल्या काही दिवसांतील त्यांची हतबलता ही सुन्न करणारी आहे.
  • मला मारून टाका, गोळ्या घाला असे म्हणण्याची वेळ पंतप्रधानांवर यावी हे क्लेशदायक आहे. तेही नरेंद्र मोदींच्या तोडून अशी वाक्ये आल्यावर आश्‍चर्य वाटते. भारतात काही पाकीस्तानी प्रवृत्ती तर शिरल्या नाहीत ना? पाकीस्तानात राष्ट्रपती, पंतप्रधानांना मारण्याची पद्धत आहे. हटवण्याची पद्धत आहे. तसे तर भारतात काही घडले नाही ना? मग ते इतके अगतीक का झाले?
  •   सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी घायकुतीला आलेले आहेत. एखाद्या माणसाचे त्याच्या घरात जेव्हा काही चालत नाही, तेव्हा तो चिडचिडा होतो. स्वत:च्या हाताने तोंडात मारून घेतो. कारण त्याची चिडचीड त्यालाच सहन होत नाही. तशीच मोदींची अवस्था सध्या झालेली दिसते. त्यांना काही सुचत नाही आणि त्यांचे कोणी ऐकत नाही. दोन वर्षापूर्वीचा त्यांचा करिष्मा संपून गेलेला आहे.
  •     जेव्हा माणूस ‘मला मारा’ची भाषा करतो तेव्हा त्याच्या हातातली सगळी परिस्थिती सुटुन गेलेली असते. मोदींचे तसे झाले आहे काय?  मोदी आज त्याच अवस्थेत आहेत. त्यांचे सरकार सत्तेत आल्यामुळे ‘जय हिंदुराष्ट्रवाले’ बेफाम झाले आहेत. चारीबाजूंनी हिंदुत्ववाले देशाच्या अंगावर येत चालले आहेत. जे कोणी शंकराचार्य म्हणून म्हणवून घेताहेत, भाजपामधले खासदार असलेली साधुकंपनी, हीसुद्धा आता बेफाम निघालेली आहे. मोदींना संघवादी कचाटयात पकडत आहेत.  तिकडे दलितांच्या विरोधात गुजरात असेल किंवा अन्य राज्य असतील, सगळे भाजपावाले तुटून पडलेले आहेत. जिथे जिथे दलित आणि दलितांचे प्रश्न आहेत, हे या देशात आता पूर्ण असुरक्षित आहेत, असे वातावरण तयार केलं जातयं. कोण करतंय हे सगळं?
  •  जेव्हा पंतप्रधान स्वत: रडकुंडीला येतो आणि हतबल झालेला दिसतो त्याची सुरुवात मोदी सत्तेवर आल्यापासून झाली. मोदींना न जुमानणारे धटिंगण त्यांच्याच पक्षात आहेत. रोहित वेमुलाची आत्महत्या आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्यानिमित्ताने घातलेला धुमाकूळ पाहता, अनेक भाऊबंद यांची मानसिकता आणि तालिबान्यांची मानसिकता यात काही फार फरक आहे, असे मानायची गरज नाही.  हा देश गुण्यागोविंदाने नांदणारा देश आहे, सर्व जाती-धर्माना बरोबर घेऊन जाणारा देश आहे, कोणत्याही एका धर्माचे राज्य या देशावर कदापि येऊ शकणार नाही. 
  •  मुस्लीम समाज या देशात गुण्यागोविंदाने राहतो. मात्र त्यातील काही अतिरेकी गट बाबरी मशिदीच्या पतनानंतर खवळले आहेत. त्या मुस्लीम अतिरेकी संघटनांचे समर्थन कोणलाही करता येणार नाही. त्या अतिरेक्यांचे समर्थन कोणी करणारही नाही. परंतु त्याला उत्तर देण्यासाठी चाललेला काही संघटनांचा आटापिटा हा घातक आहे. याचीच चिंता मोदींना वाटते.
  •   आज मोदी मोठा गळा काढून रडत आहेत. ‘मला मारा, पण त्यांना मारू नका’ असा कांगावा करत आहेत. मोदींच्या गुजरातमध्येच दलितांनी गाय ठार मारल्याच्या संशयावरून दलित तरुणांच्या एका गटाला जोरदार मारहाण करण्यात आली. त्यातील काही दलितांच्या तोंडात गाईचे शेण घालण्यात आले. या संतापजनक प्रकारात संपूर्ण गुजरात बंद झाला होता. मोदींच्या गुजरातमध्ये जेव्हा दलितांवर इतके भयानक अत्याचार झाले तेव्हा मोदी गप्प का बसले होते? याचे कारण आता परिस्थिती मोदींच्या हातात राहिलेली नाही. अवघी दोन वर्षेच झालेली आहेत. असेच सुरू झाले तर राहिलेल्या तीन वर्षात मोदींना पळ काढायची वेळ या देशात येईल. म्हणजे पाकीस्तानप्रमाणे भारतीय लोकशाहीची वाताहात लागणार का असा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही.
  •   सरकार चालवता येत नाही, निर्णय घेता येत नाही, दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नाहीत. महागाईने लोक हैराण झालेले आहेत, निवडणुकीत दिलेल्या एकही आश्वासनाला पंतप्रधान झालेले मोदी जागलेले नाहीत. सर्व बाजूंनी जेव्हा असंतोष ज्वालामुखीसारखा भडकू लागला आहे तेव्हा मोदींना चक्कर यायला सुरुवात झाली. अशा या विचित्र अराजकाच्या परिस्थितीत त्यांना मदत करायला ना जगातले कोणी पंतप्रधान धावून आले, ना त्यांच्या पक्षाचे कोणीही नेते त्यांच्या मदतीला येत आहेत. संघही मजा बघतोय. या सगळ्या घटना गेल्या ६ महिन्यांतल्या आहेत. त्यामुळे मोदींना स्पष्ट सांगितले पाहिजे, तुमचे साधू-खासदार, तुमचे शंकराचार्य, आणि तुमचे जवळचे वाटणारेच तुमचे खरे शत्रू आहेत. मला गोळया घाला म्हणणारे तुम्ही, तुम्हाला मरण्याची भीती वाटत असेल तर ते तुमचे शत्रू तुमच्याच घरात आहेत. ज्या लोकांनी तुम्हाला पंतप्रधान केले तेच लोक लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला फेकून देतील, याची खूणगाठ बांधून ठेवा. जो या देशाची समतेची चौकट विस्कटू पाहतो आहे, तो तुमच्या रडण्याने सरळ होईल एवढे भाबडे राहू नका. रडकुंडीला येऊन काही होणार नाही. तुम्हाला कठोर व्हावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: