गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

सातार्‍यातील वैद्यक क्षेत्र पोळले


  •   दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही घटना ताजी असतानाच सातारा जिल्ह्यातील खुनांना वाचा फुटली आहे. महाबळेश्‍वरच्या पायथ्याशी असूनही पेशवाईचा थाट आणि सात घाट अशा नखर्‍यातील वाई आज चांगलीच पोळली आहे. याचे कारण येथील वैद्यक क्षेत्रात त्या क्रूरकर्मा पोळने दिलेले चटके.
  •    डॉक्टरकीचे सोंग घेऊन स्वैरपणे हुंदडणार्‍या संतोष पोळ नामक नराधमाने गेल्या तेरा वर्षांत सहा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. अजूनही काही खून केले असावेत असा संशय आहे. रोज नवनवीन माहिती समोर येते आहे. यामुळे नामांकीत डॉक्टरांकडेही संशयाने पाहिले जात आहे. पोळने हे कशासाठी केले त्याचा तपास होण्यापूर्वीच हे किडणी रॅकेट आहे काय वगैरे तर्कांनी संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यक क्षेत्र केवळ पोळले नाही तर संशयाच्या भोवर्‍यात सापडल्यासारखे झाले आहे.
  •   वाईतील अंगणवाडी सेविका मंगला जेधे यांच्या हत्येच्या तपासात पोलिसांनी पोळचा बुरखा फाडला. त्याच्या फार्म हाऊस आवारातून पोलिसांनी पाच मृतदेह हस्तगत केले. सहा खुनांत पाच महिला पोळची शिकार ठरल्या. एका पुरुषाचा मृतदेह त्याने कृष्णा नदीत सोडला होता. एखाद्या रहस्यमय चित्रपटात शोभावा किंवा सध्या गाजत असलेल्या रात्रीस खेळ चालेमधील नाईकवाड्यात सापडलेल्या हाडांच्या सापळ्यामुळे निर्माण झालेली उत्सुकता याही प्रकारात सर्वत्र निर्माण झालेली आहे.
  •    २००३ सालापासून सुरू असलेले खून सत्र इतके दिवस पडद्याआड का राहिले? याबाबत संशयाचे वातावरण आहे. पोलीस त्याबाबत अनभिज्ञ कसे होते? याचा उलगडा होणे आवश्यकच आहे. डॉक्टरला लोक देव मानतात. परंतु कोणतेही वैद्यकीय शिक्षण घेतले नसताना डॉक्टर म्हणून मिरवणार्‍या पोळने या पवित्र पेशाला काळिमा फासला. संपूर्ण वैद्यक क्षेत्र हे पोळून काढले. विशेष म्हणजे बोगस डॉक्टर पकडण्याची मोहिम इतके दिवस इथे कशी थंडावली याबाबत आश्‍चर्य वाटते. इंडियन मेडिकल असोसिएशनला याची माहिती कशी नव्हती? याचाही उलगडा होणे आता गरजेचे आहे.
  •    ‘पोळ’ या शब्दाचा अर्थ धष्टपुष्ट, मस्तवाल माजलेला बैल. पूर्वी गावोगावी असे पोळ मुक्तपणे हिंडत. त्यापैकी बहुतेक देवाच्या नावे सोडले जात. काही भागात ते अजूनही दिसतात. खाऊन-खाऊन पोसलेल्या पोळापुढे जाण्याची वा त्याला डिवचण्याची कोणाची छाती होत नसे. पोळ बिथरला तर मात्र कोणाची धडगत नसे. वाईच्या संतोष पोळने एकापाठोपाठ एक असे खून पाडून आपले आडनाव सार्थ ठरवले आहे. पूर्वी बैलाच्या रूपाने पोळ हिंडत. आता गावोगावी असे ‘मानवी बोगस डॉक्टरांचे पोळ’ मोकाट सुटले आहेत. समाजाला हानी पोहोचवत आहेत. 
  •   सातारा पोलिसांच्या कसून तपासामुळेच पोळचा पर्दाफाश झाला. अन्यथा त्याने आणखी किती बळी घेतले असते याची कल्पना करणे कठीण आहे. भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ असल्याचा आभास निर्माण करून पोळने अनेक अधिकार्‍यांविरुद्ध एसीबीकडे तक्रारी केल्याचे सांगितले जाते. कदाचित त्यामुळेच त्याच्या वाटेला जाण्याचे धाडस कोणी करत नसावे. म्हणून त्याची कृष्णकृत्ये पडद्याआड राहिली. अखेर पोळच्या पापांचा घडा भरला. भारतीय संस्कृतीच्या उदात्तेचे गोडवे नेहमी गायले जातात. त्याच संस्कृतीत माणुसकीचे मारेकरी ठरणारे ‘पोळ’ कसे जन्मास येतात? समाज त्यांना का अडवत नाही? अद्दल का घडवत नाही? स्त्रियांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना पाहता महाराष्ट्र कुठे निघाला आहे? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे संस्कृती रक्षकांकडून अपेक्षित आहेत. ती कधी तरी मिळतील का?
  • त्याहीपेक्षा भयानक प्रश्‍न असा आहे की आपल्याकडे अनेक एनजीओ, दक्षात समित्या कार्यरत असतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या नामांकीत संस्था आहेत. या संस्था भोंदू बाबा, साधू यांच्यामागे हात धुवून लागतात. त्यांचा बुरखा टराटरा फाडतात. पण असे पांढर्‍या वेषातील भोंदू बोगस डॉक्टर पकडावेत असे का त्यांना कधी वाटत नाही? आजवर जिल्ह्यात बोगस डॉक्टर पकडण्याची मोहिम कोणी आणि कितीवेळा राबवली? त्यात कोणावर कारवाई झाली? या डिग्र्या, बनावट सर्टिफिकेट ते आणतात कुठून? असे शिक्षण नसतानाही ते उपचार कसे करतात? केस हाताबाहेर गेल्यावर दुसरीकडे शिफ्ट करण्याचा सल्ला दिला जात असणार. त्यामुळे त्यांचे मोठ्या डॉक्टरांशीही संबंध असणार. हे लागेबांधे कोणी कसे तपासले नाहीत आजवर? पण यामुळे एकूणच वैद्यक क्षेत्र चांगलेच पोळून निघाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: