- मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे नेमके काय? त्याचे दर्शन आजच्या प्रकारावरून घडते. महाडमधल्या सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला आणि त्यामुळे अनेकजण संकटात सापडले. यावरून त्यांना मदतीला जायचे सोडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अजित पवार आणि विरोधी पक्षांनी सुरू केला. हा प्रकार म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्याचा आहे. या परिस्थितीत मदतीला धावून जायचे की सत्ताधार्यांच्या विरोधात दंड थोपडून आपल्याला काय फायदा होतो आहे हे पहायचे? दादांच्या राजवटीत कधी पाऊस पडला नाही म्हणून त्यांनी धरणात मुतायची भाषा केली होती. त्यामुळे पूल वाहून जाणे शक्यच नव्हते हे त्यांना कसे समजले नाही?
- म्हणजे महाड पोलादपूर येथील एक जुना पुल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे मंगळवारी रात्री दोन बसेस व काही गाड्या पुराच्या पाण्यात सापडून बेपत्ता झाल्या आहेत. कित्येक तास उलटून गेल्यावरही त्यांचा पत्ता लागला नव्हता. आपत्ती व्यवस्थापन व नौदलालाही पाचारण करण्यात आले. पुरात जुना पुल वाहून गेला, असे त्याचे कारण दिले जात आहे. यावर कोणी चर्चाही करत नाही. पुल कशासाठी असतो, त्याचा खुलासा कोणालाच करावासा वाटलेला नाही. हीच खरी समस्या आहे.
- नदी ओढ्यावर पुल कशाला बांधलेले असतात? तिथून माणसाला पलिकडे जाणे अशक्य आहे, म्हणून पुल उभारले जातात ना? ब्रिटीशांच्या कारकिर्दीत हा पुल बांधला गेला आणि आता तो खुप जुना झाला होता. सहाजिकच मोठ्या पुराच्या लोंढ्यासमोर तो टिकला नाही. पण सवाल पुराचा नसून, पुल नावाच्या संकल्पनेचा आहे. पुर नसता म्हणून जुना पुल किती काळ टिकणार होता? त्याची कुवत तरी किती होती? महामार्गावरून धावणार्या वाहनांचे ओझे उचलण्याची क्षमता त्यात होती काय? ब्रिटीशांनी कधीकाळी त्याची उभारणी केली, तेव्हा आजच्यासारखी हजारो वाहने त्यावरून पळतील अशी अपेक्षा तरी केली होती काय? पण याचा विचार न करता काही तरी बोलायचे म्हणून अजित पवार म्हणतात चंद्रकांत दादांवर ३०२ चा गुन्हा नोंद करावा. काय हा पोरकटपणा?
- हा पुल साध्या वाहतुकीला नालायक असताना त्यावरूनच महामार्गाची अवजड वाहतुक चालू देणे हाच गुन्हा आहे. तो वर्षानुवर्षे सुरू आहे. अगदी दादा म्हणजे अजित पवार सत्तेत होते तेव्हाही वाहतुक सुरूच होती. याचे भान अजित पवारांना का नाही? इथे मदतीला धावून जायचे सोडून कसले घाणेरडे राजकारण करत आहात?
- ब्रिटीश कालखंडात सत्तर वर्षापुर्वी हा पुल उभारला गेला, तेव्हा देशातली वहाने किती होती आणि हमरस्त्यावरून येजा करणार्या वहानांचे एकूण वजन किती होते? अशा पुलावरून किती वहाने जाऊ शकतील व त्याला किती ओझे पेलवू शकेल, याचे काही गणित मांडूनच त्याची उभारणी होत असते. किंबहूना पुल वा इमारत उभी केली जाते, तेव्हा तिच्या रचनेला किती वजन पेलवू शकेल याचे गणित मांडले जाते. त्यातच किती वजनाखाली ती इमारत कोसळू शकेल, त्याचेही समिकरण मांडलेले असते. त्याचप्रमाणे अमूक एक रचना बांधकाम उभारल्यापासून तिचे आयुष्य किती, त्याचाही काही अंदाज केलेला असतो.
- हा पूल सर्वार्थाने कालबाह्य झालेला पुल होता. त्यावरून कुठलीही वाहतुक करणेच गैरलागू होते. असा पुल महामार्गावरच्या अवजड वर्दळीसाठी वापरणे म्हणूनच जाणिवपुर्वक अपघाताला आमंत्रण देणेच होते. किंबहूना अपघाताच्या प्रतिक्षेत तिथून वाहतुक चालू ठेवली गेली. ती काही आज नाही तर अनेक वर्षांपासून सुरू होती. पूल काही एकाएकी जुना आणि निकामी झाला नाही. त्याची सुरूवात अजितदादा सरकारमध्ये असतानाच झाली होती. तेंव्हा त्यांनी काय केले?
- म्हणूनच महाड पोलादपूर येथील सावित्री नदीवरील पुल कोसळून घडलेली दुर्घटना हा अपघात नाही, तर घातपात मानला पाहिजे. कारण ज्या कुवतीचा पुल बांधला गेला होता, त्याच्या कित्येकपट वजनाची वहाने त्यावरून आज पळत होती आणि अपेक्षेच्या अनेकपटीने जास्त संख्येने वहाने त्यावरून हाकली जात होती. ब्रिटीशकालीन असे शेकडो पुल महाराष्ट्रात आणि देशाच्या कानाकोपर्यात आजही वाहतुकीसाठी खुले असलेले दिसतील. त्यावरून दोन मोठी वहाने म्हणजे बसेस किंवा मालवाहू ट्रक आले, तर परस्परांना पार करून जाऊ शकत नाहीत. मग एका बाजूची वाहतुक थांबवून दोघांना पुल ओलांडावा लागतो. हे मध्यम आकाराचे ट्रक किंवा बस असतात. पण मालवाहतुक करणारी शेकड्यांनी मोठी अवजड वहाने आज महामार्गावरून पळत असतात. त्यात शेकडो टन वजनाचा माल भरलेला असतो. अशा वहानाचे ओझे कुठल्या पुलाला सोसू शकते आणि कुठल्या पुलावरून असे ओझे जाऊ शकत नाही, इतकेही रस्तेवाहतुक विभागातल्या जाणकारांना माहित नसेल काय? मुंबई गोवा मार्ग खुला होऊन आता पन्नास वर्षे होत आली. त्याला महामार्ग ठरवणार्यांनी महामार्गासाठी आवश्यक अशा सुविधा तिथे उभारण्याची काळजी घेतली नसेल, तर वाहनचालक वा प्रवाश्यांची दिशाभूल केली असाच अर्थ होतो. त्यामुळे आत्ता जे दु:ख व्यक्त होत आहे ते मगरींचे अश्रू आहेत तर जे टिका करत आहेत ते टाळूवरचे लोणी खात आहेत. आज मदतीला धावून जाण्याची गरज आहे, टिका करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही हे दोन्ही दादांनी लक्षात घेतले पाहिजे.
गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६
दोन्ही दादांनी लक्षात घ्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा