दहा बारा दिवस झाले तरी सावित्री नदीवरील पूलामुळे झालेल्या अपघाताचा शोध लागलेला नाही. अजून सर्व मृतदेह सापडले नाहीत किंवा एसटी बस, अन्य वाहने व वाहून गेलेल्या काही प्रवाशांचा शोध लागलेला नाही. पण याकडे दुर्लक्ष करून प्रसारमाध्यमांनी मेहता पुराण सध्या चर्चेला घेतले आहे. रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहतांना नको इतकी वाईट प्रसिद्धी दिली जात आहे. हे सर्व निरूद्योगीपणाचे लक्षण म्हणावे लागेल. पण यातून माध्यमांची संकुचित वृत्ती दिसून आली आहे.मेहता यांच्या घटनेनंतर नितीन गडकरी यांनी मात्र सरळ कबूली देऊन मनाचा मोठेपणा दाखवला. केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय संयमाने महाड घटनेबद्दल दिलेली प्रतिक्रीया कौतुकास्पद अशीच आहे. आजकाल कुठल्याही सत्ताधारी वा राजकीय नेत्याकडून इतक्या समजूतदार प्रतिक्रीयेची अपेक्षा करता येत नाही. किंबहुना वादग्रस्त वक्तव्ये करण्यात पटाईत असलेल्या गडकरींनी अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे तर आश्चर्याचा धक्काच बसला. म्हणजे, कुठलाही गुन्हा वा दुर्घटना घडली, मग त्याचे खापर दुसर्या कुणाच्या तरी डोक्यावर फ़ोडायला सर्वजण उत्सुक असतात. मात्र त्याविषयी दुरगामी विचार करून उपाय शोधण्याचा विचारही कुणाच्या मनाला शिवत नाही. खापर फ़ोडले, की विषय निकालात निघाला असेच मानले जाते. विरोधक तेच करत असतात. यामध्ये सरकारला अपयश आले आहे. सरकारने, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा वगैरे कांगावा सुरू होतो. पण अशा संकट प्रसंगी सरकार आणि विरोधकांनी एकत्र होऊन मुकाबला केला पाहिजे असा विचार कोणाच्या मनात येत नाही. अगदी सत्तेतले विरोधात होते तेव्हाही. ही परिपक्वता येण्याची आज गरज आहे. तरच लोकशाही अधिक सुदृढ होईल. अगदी माध्यमेही याला अपवाद राहिलेली नाहीत. महाडचा तो जिर्ण पुल ब्रिटिशकालीन होता. वापरासाठी कमकुवत झाला होता. म्हणजेच तिथे अपघाताची शक्यता होती. इतके समजल्यावर माध्यमांनी देशाच्या कानाकोपर्या कुठे कुठे ब्रिटीश राजवटीत पुल बांधले गेले आणि अजून वापरात आहेत; त्याचा शोध सुरू केला. आठवडाभरात इतके असे पुल व त्यांची जिर्णावस्था दाखवली गेली, की साध्या जुन्या पादचारी पुलावरून चालण्याचेही सामान्य नागरिकला भय वाटावे. हे शहाणपण आधी का नव्हते सुचले? असे शेकड्यांनी मृत्यूचे सापळे आपल्या देशात पसरलेले आहेत. तिकडे दुर्लक्ष होत असून त्याचे खापर कुणाच्या तरी डोक्यावर फ़ोडण्याची स्पर्धा जोरात चालू असते. पण त्यात हकनाक बळी पडणार्यांविषयी कुणाला कुठली सहानुभूती उरलेली नाही. उलट त्यातून नवे वाद उकरून काढण्याचे नाटक सुरू होते. कुणा मंत्र्याने पत्रकाराला दुरूत्तर दिले, म्हटल्यावर त्याचेही भांडवल झाले. त्यानंतर त्या मंत्री वा राजकीय नेत्याला कोंडीत पकडण्यासाठी झुंबड उडाली. पण तितक्याच हिरीरीने जबाबदारी पत्करणार्या गडकरींची पाठ थोपटायला कोणी पुढे आले नाही. रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी पत्रकाराला दुरूत्तरे दिली हे उघड आहे. पण त्यापुर्वी तोच पत्रकार ज्या पद्धतीचे बेछूट सवाल मंत्र्याला करत होता. इतकी मोठी दुर्घटना घडली असताना, बुडालेल्या व्यक्तींचा शोध महत्वाचा असतो आणि सर्व शक्ती त्यासाठी लावायला हवी. की तिथे येणार्यांची बददास्त ठेवण्याला प्राधान्य असू शकते काय? याचे भान त्या पत्रकाराला राहिले नव्हते. वेगळे काही तरी दाखवण्याची नशा डोक्यात गेली होती. संकटकाळात व्यग्र माणसाला विचलीत करणारे प्रश्न विचारण्याला सभ्यपणा म्हणत नाहीत, की पत्रकारिता म्हणता येत नाही. कुणा मृत्ताच्या नातलगाला ‘कसे वाटते’ हा प्रश्न मृतदेहही हाती आलेला नसताना विचारण्याला काय म्हणायचे? संकटकाळ वा आपत्तीनिवारण चालू असते, अशा जागी जगाला घटनेचा तपशील मिळण्यापेक्षा धोक्यात असलेल्या व्यक्ती वा पिडीताला मदत मिळण्याला प्राधान्य असते. म्हणूनच संबंधितांपासून दूर राहून वार्तांकन करण्याचे भान आधी पत्रकारांना येण्याची गरज आहे. इथे प्रकाश मेहता हा भले पालकमंत्री असेल, पण तो नेता आहे. प्रशासकीय अधिकारी नाही. म्हणूनच त्याला प्रसंगाची माहिती व निवारण कार्याची जाण असू शकत नाही. सहाजिकच त्यासंबंधीचे प्रश्न त्याला विचारायला जाणेच मुर्खपणाचे आहे. ही काही पत्रकार परिषद नव्हती तर एका भीषण अपघातातून लोकांना सोडवण्याचे काम तिथे चालू होते. तिथे कॅमेरा घेऊन घुसणे व कामात व्यत्यय आणणेच चुकीचे होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर गडकरींनी छान प्रतिक्रीया दिली होती. आधीच्या सरकारला गुन्हेगार ठरवण्यापेक्षा आपल्या सरकारची जबाबदारी त्यांनी घेतली. मात्र त्यांचे स्वागत करायला कोणी पत्रकार पुढे आलेला नाही. याची दखल घेतली गेली नाही. माध्यमांची ही संकुचित वृत्तीच म्हणावी लागेल.
शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६
माध्यमांची संकुचित वृत्ती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा