- गेल्या दोन दिवसांपासून वैद्यक व्यवसायातील गैरप्रकार असलेल्या अवयव प्रत्यार्पण आणि अवयव चोरी यावर जोरदार चर्चा सुरू आहेत. पण कैदी, गुन्हेगार यांच्याबाबत जो मानवी हक्क कायदा म्हणून मानवी हक्कचे लोक पाठराखण करण्यासाठी येतात त्यांना या अवयव दान करण्याच्या प्रकाराबाबत काही मतप्रदर्शन का करावेेसे वाटत नाही असा प्रश्न पडतो. कोणताही माणूस आपला अवय स्वखुषीने दान करत नसतो. तर त्याला जगण्यासाठी काहीतरी हवे असते. त्यापोटी आमिषापोटी तो हे करतो. अशावेळी अवयव दानच्या नावावर विक्री करणार्यांना संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- हा विषय निघाला तो मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयातून मूत्रपिंडचोरीचे जे काही प्रकार समोर आले त्यावरून. आज दोषींना शासन करण्याचेही आपल्या हातात राहिलेले नाही. दोन-पाच लाख रुपयांसाठी डॉक्टरांनी अवयवांच्या चोरटया व्यापारात सहभागी व्हावे ही खेदाची बाब आहे. पण प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे आम्ही काय वेगळे करतो का? पेशंटच्या आणि विकणार्यांच्या संमतीने करतो असे म्हणून यातून सुटण्याची कला प्राप्त होईल. पण हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे गेल्या पाच सात वर्षात गर्भलिंग परिक्षेला बर्यापैकी विरोध होत आहे. लिंगनिदान करून गर्भपात करण्यास वैद्यक क्षेत्रानेही पुढाकार घेतला आहे. तसाच पुढाकार याबाबतही घेण्याची गरज आहे.
- एकाच प्रकारचे गुन्हे आपल्याकडे सतत घडत असतात हेे ऐतिहासिक सत्य आहे. कठोर कायदे करूनही आणि दिल्लीच्या निर्भयाचा प्रकार देशाला हादरवून सोडणारा असला तरीही बलात्काराच्या घटना वाढतच आहेत. तसेच हे प्रकारही वाढणारच. पण हिरानंदानी रुग्णालयात वा अन्यत्रही हे असले अवयवचोरीचे प्रकार का घडतात त्याचे कारण शोधता येईल का याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. ती कारणे, असे प्रकार कसे थांबवायचे याचा मार्ग शोधता आला पाहिजे. नव्हे तो शोधायची गरज आहे.
- अशा प्रकरणांत अवयव चोरून विकणारेच फक्त दोषी आहेत, असे मानून चालणार नाही. तो निव्वळ ढोंगीपणा ठरेल. पण विकण्यास तयार होणारे कोण आहेत? ते कुठून आले? त्यांना हे कसे माहित झाले? त्यांना अशी गरज का निर्माण झाली? या सगळ्याचा अभ्यास, तपास होणे गरजेचे आहे. अवयवांची चोरी करून विकणारे दोषी आहेतच. पण ते विकत घेणार्यांचे काय? कोणतीही वस्तू बाजारात विकत घेणारा असल्याखेरीज विकली जातच नाही. तेव्हा हे चोरटे अवयव विकत घेणारे आहेत म्हणून अवयव चोरून विकणारे आहेत ही बाब लक्षात घ्यायला हवी. प्रत्यारोपणासाठी अवयव कसे मिळवले जावेत, याची एक नियमावली आहे. कोणत्याही अन्य नियमांप्रमाणे प्रथम येणार्यास प्रथम या तत्त्वावर ती आधारित आहे. म्हणजे ज्यांना कोणास काही आजार वा अपंगत्वामुळे अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे त्याने या संदर्भातील मध्यवर्ती व्यवस्थेत आपली मागणी नोंदवावयाची असते. जसजसे अवयव उपलब्ध होतील तसतसे या यादीतील मागणीधारकांना ते पुरवले जातात.
- अवयव हे काही कारखान्यात वा अन्यत्र तयार होणारे उत्पादन नाही. त्याची उपलब्धता पूर्णपणे ऐच्छिक आहे. म्हणजे एखाद्याने स्वत:च्या मृत्यूनंतर आपले अवयव दान केले जावेत अशी इच्छा व्यक्त केली नसेल तर किंवा त्याच्या निकटवर्तीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला नाही तर, किंवा अपघातात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांनी अवयवदान केले नाहीत तर कोणा तरी गरजूस प्रत्यारोपणासाठी हे अवयव मिळू शकत नाहीत. त्यामुळे त्याच्या उपलब्धतेबाबत अर्थातच अनिश्चितता आहे.
- मात्र अधिक दाम मोजले तर अवयवांची रांग बाजूला ठेवून आपणास हवे ते पदरात पाडून घेण्याचीही सुविधा आहे. यातून काळा बाजार, चौर्यकर्म सुरू झाले. म्हणजे मरणोत्तर अवयवदानाचीही जागृकता निर्माण करण्याची गरज आहे. अवयवदान, देहदान, नेत्रदान करणारांची संख्या वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत अवयव दान करून पैसे कमावण्याचा मार्ग निर्माण झाला नाही पाहिजे. जेव्हा तुटवटा असतो, टंचाई असते तेंव्हाच काळा बाजार होतो, गैरमार्गांला उत येतो. म्हणून अवयव दान करणारांसाठी जनजागृती करणार्या संस्था निर्माण होण्याची गरज आहे. पैसे फेकले की हवा तो अवयव मिळवण्याची क्षमता असलेले आणि काही तरी पैसे मिळावेत यासाठी अवयव विकायची वेळ आलेले यांच्यातील व्यवहार हा या अवयवचोरी घोटाळ्याच्या मुळाशी आहे. डॉक्टरांसारखा सुशिक्षित अशा व्यवहारातील मध्यस्थ आहे. असे मध्यस्थ गरजू आणि गरज पुरवणारे या दोघांनाही हवे असतात. हिरानंदानी रुग्णालयातील घटनेने तेच तर सिद्ध केले. कोणालाही अवयव विकण्याचा किंवा विकत घेण्याचा अधिकार नाही. तो फक्त दान करता येतो. हिरानंदानी रुग्णालयात ज्यास मूत्रपिंडारोपण केले जाणार होते ती व्यक्ती आणि मूत्रपिंड देणारी व्यक्ती एकमेकांच्या पती-पत्नी आहेत, असे दाखवले गेले. वस्तुत: हा बनाव होता आणि त्यांचे एकमेकांशी काहीही संबंध नव्हते. मूत्रपिंडदानाच्या बदल्यात त्या महिलेला जी रक्कम दिली जाणे अपेक्षित होते ती दिली न गेल्याने हा बनाव उघड झाला. पकडला तर चोर नाही तर देवाहून थोर अशी परिस्थिती असते. त्यामुळे असे प्रकार थांबणे तेंव्हाच शक्य होईल जेव्हा दाते वाढतील.
शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६
दानकर्त्यांची संख्या वाढली पाहिजे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा