बुधवार, १४ मे, २०१४

मोदींची यशाच्या दृष्टीने वाटचाल

  •   


  • लोकसभा निवडणूक मतदानाचा शेवटचा टप्पा सोमवारी पार पडला. प्रचारपूर्व काळापासून झालेली विविध सर्वेक्षणे, प्रचाराचा एकूण नूर आणि मीडियाचे वृत्तांकन यांचा विचार करता निवडणुकीच्या अंतिम निकालांमध्ये नरेंद्र मोदींचा भाजप हा या लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष राहील असे चित्र स्पष्ट झालेले आहे. 272चा आकडा आपण सहज पार करू, असे मोदी आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत. अब की बार मोदी सरकारने देशाला अगदी झपाटून टाकलेले आहे. जी प्रचारयंत्रणा राबवली होती ती अत्यंत प्रभावीपणे राबवली गेली. त्याचा नेमका परिणाम कसा होतो आहे, झाला आहे हे 16 तारखेला समजणार आहे. पण भाजप आणि मोदी समर्थकांना हा जादुई आकडा पार करून मोदी सरकार सत्तेवर येईल याचा पूर्ण विश्‍वास आहे. सर्वात मोठा पक्ष असला तर स्पष्ट बहुमतापासून भाजप एकटा दूर राहिल. त्यामुळे त्यांना तीस-चाळीस जागा कमी पडू शकतील अशी धाकधूक भाजपच्याच अनेकांना वाटत आहे. खरे काय ते सोळा मे रोजी कळेलच. पण एक नक्की की निवडणुकीचा हा सर्व सामना मोदी यांनी एकहाती खेळला आणि आपल्या बाजूने फिरवला. आता विजय मिळाला, तर तो निव्वळ त्यांचाच असेल.  
  •  मोदी यांच्या कल्पनेतला विजय झाला, तर ती स्वतंत्र भारतातील एक अभूतपूर्व घटना असेल. आजवरचे आपले पंतप्रधान हे स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले होते. स्वतंत्र भारतात जन्मलेले मोदी हे पहिलेच पंतप्रधान असतील. एखाद्या राज्यस्तरीय नेत्याने इतक्या अल्पावधीत देशभर आपल्या नावाचा झंझावात निर्माण करावा आणि एकट्याच्या बळावर निवडणूक जिंकून देण्याचा पराक्रम करावा हे या देशात प्रथमच घडेल. यापूर्वी एकेका राज्यांमध्ये असा प्रकार घडला आहे.  आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव आणि नंतर चंद्राबाबू नायडू यांनी आपला एक हाती कारभार सांभाळला होता. ओडिशात नवीन पटनाईक आणि पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी एकहाती सत्ता काबीज केली होती. मोदींचे कौतुक यासाठीच आहे की शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे दिग्गज नेते महाराष्ट्रात झाले. पण एक हाती सत्ता अजूनपर्यंत त्यांना आणता आलेली नाही. महाराष्ट्राचा कायापालट होण्यासाठी एकविचाराने काम करणारे एकत्र येणे गरजेचे आहे. या स्थितीत पूर्ण देशातील चित्रविचित्र राजकीय समीकरणांवर मात करून स्वत:चे प्रभुत्व निर्माण करणे ही नरेंद्र मोदींची जबरदस्त कामगिरी ठरेल.  
  •     हे प्रभुत्व निर्माण करण्याच्या कामी त्यांना प्रसारमाध्यमांचा मोठा उपयोग झाला आहे. अर्थात मीडियाचा वापर करून एखाद्या नेत्याची देशव्यापी प्रतिमा तयार करणे आणि त्या बळावर निवडणूक जिंकणे हे खरोखरच घडू शकते का याचे उत्तर आपल्याला सोळा तारखेला मिळणार आहे. या दृष्टीनेदेखील स्वतंत्र भारतातील ही एक अभूतपूर्व निवडणूक ठरणार आहे. 
  • नरेंद्र मोदी यांचा विजय झाला, तर ते आपल्या राजकीय व्यवस्थेत मीडिया नावाच्या एक घटकाच्या प्रचंड शक्तीचे प्रकटीकरण असेल. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, आज वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्स किंवा इंटरनेटवरील सोशल मीडिया यांनी मिळून मोदी यांचे दैवतीकरण केले असले, तरीही ती मीडियाची स्वत:ची भूमिका आहे, असे नव्हे. लोकांवर प्रभाव टाकण्याची किंवा अधिक तीव्र भाषेत बोलायचे, तर जनमत उलटेपालटे करण्याची एक फार मोठी अशी शक्ती मीडियाकडे आहे. याच प्रभावाने 2011 मध्ये अण्णा हजारेेंचे आंदोलन उभे राहिले होते. संपूर्ण देशभरातूनच नव्हे तर अण्णा हजारेंचे जंतरमंतरवरील उपोषण, त्यासाठी जमलेली गर्दी देशभरातून निघणारे मोर्चे यामुळे देश ढवळून निघाला होता. त्याचे फलित अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष असला तरी वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या शक्तीचा योग्य वापर अण्णांना करता आला नाही. ते नंंतर काँग्रेसच्या हातातले बाहुले बनले. म्हणूनच मिडीयाची ही शक्ती कोण कशा रीतीने वापरून घेतो यावर सर्व काही अवलंबून आहे. दोन वर्षांपूर्वी अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी ही शक्ती वापरली. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले तेव्हा राहुल गांधी आणि मोदी यांना मीडियाची ही शक्ती वापरण्याची जवळपास समसमान संधी होती, पण प्रचारात तरी असे दिसले की मोदींनी या लढाईत राहुल गांधी यांना साफ झोपवले. आता जर निवडणुकीचे निकालही मोदींच्या बाजूने आले तर मीडिया वापरण्याच्या मोदींच्या शक्तींवर शिक्कामोर्तब तर होईल.  या निवडणुकीत कोणता एक पक्ष नव्हे, भाजप नव्हे, मोदी नव्हे तर प्रसारमाध्यमे, मिडीया जिंकला असे म्हणावे लागेल. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने लोकसभेचे चित्र रंगवण्याचा तो यशस्वी प्रकार म्हणावा लागेल.
  • आणखी एक  महत्त्वाचे म्हणजे हजारो वर्षांपासून आधुनिक नागरी समाजाच्या प्रभावांना सहजपणे दूर ठेवणार्‍या आमच्या खेड्यापाड्यांतील हिंदुस्थानी समाजाला एक निर्णायक खिंडार पडल्याचेही या निमित्ताने दिसून येईल. विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की, मोदी ज्या संस्कारातून येतात त्या विचारसरणीला अशी कल्पना करणे आवडते की हिंदू संस्कृती ही एक बंदिस्त, चिवट आणि प्राचीन संस्कृती आहे, जिचे रक्षण करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मीडिया नावाच्या अतिआधुनिक घटकाचा वापर करून या हिंदुत्ववाद्यांनीच आपल्या कथित प्राचीन, बंदिस्त संस्कृतीला कायमचे भगदाड पाडलेले कदाचित सोळा तारखेला दिसेल. हिंदुस्थानी समाजाच्या या आधुनिकीकरणाचे दूरगामी परिणाम होतील. टीव्हीवरच्या बातम्या किंवा चर्चा किंवा वृत्तपत्रांमधील लेख यांचा प्रभाव शहरातील काही थोड्या लोकांवर आणि किरकोळ प्रमाणात पडतो असे आजवर मानले जात असे. मोदी विजयी झाले तर या ठोकताळ्याला जबरदस्त हादरा बसेल. माध्यमांमधला सुप्त-उघड प्रचार पाहून वा ऐकून लोक आता आपले मत ठरवतात, अशी एक नवी वस्तुस्थिती उभी राहील.  
  •     मोदी यांचा विजय इतरही अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरेल. मोदी हे काँग्रेसी विचारसरणीचे कट्टर शत्रू आहेत. वाजपेयींवरदेखील पंडित नेहरूंचा प्रभाव होता आणि त्या अर्थाने ते काँग्रेसीच होते, असे आता खुद्द भाजपचेच नेते सांगत आहेत. त्या अर्थाने मोदी हे पहिले खरे काँग्रेसविरोधी पंतप्रधान ठरतील. म्हणजे यापूर्वी झालेेल्या बिगरकाँग्रेस पंतप्रधानांमध्ये बहुतेक जण मूळचे काँग्रेसचे होते. मोरारजीभाई देसाई जनता पक्षात पंतप्रधान झाले असले तरी नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते होते, इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात ते होते. व्ही पी सिंग हेही काँग्रेसच्या मंत्रिमंडळात होते. त्यामुळे काँग्रेस विरोधी मताचे पहिले पंतप्रधान अशी ख्याती नरेंद्र मोदी यांची होईल. पण याचा व्यापक अर्थ अधिक गंभीर आहे. काँग्रेस हे लेबल जाऊन भाजप हे लेबल आले इतका हा साधा बदल नसेल. हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे, हिंदू येथे बहुसंख्याक आहेत आणि येथील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिसरावर पूर्णपणे हिंदूंचेच स्वामित्व असले पाहिजे, असे ठामपणे मानणार्‍यांपैकी मोदी हे प्रमुख आहेत. त्यामुळे बहुसंख्य हिंदू समाज मोदींसारख्यांच्या मागे जाऊ शकतो हे या निवडणुकीत दिसून येऊ शकते.  
  •   आजवर भाजपला इतके मोठे यश न मिळाल्याने भाजपचे समर्थक जोशात असतील. यावरून मोदी किंवा भाजप विरोधकांनी हे लक्षात ठेवायला हवे की, मोदींना अपेक्षित असलेले हिंदूंचे प्रभुत्व ही भविष्यात काही खूप अशक्य गोष्ट असेल असे नव्हे.  एकेकाळी महात्मा गांधी नावाच्या पोरबंदरच्या एका बनियाने या देशातील लोकमानसावर मोठा प्रभाव टाकला होता. मोदी विजयी  झालेच तर गांधींच्याच गुजरातमधला पण विचाराने पूर्णत: त्यांचा विरोधी असलेला एक नेता देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येईल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: