- सोळाव्या लोकसभा निवडणुकीत देशाप्रमाणेच राज्यात काँग्रेस आघाडीची धूळधाण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभांच्या निवडणुकीत काय होते हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. मोदी लाटेत धुवून निघालेले आजचे सत्ताधीश आपला मस्तवालपणा सोडतात का, यावर या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत हीच लाट उपयोगाला येईल असेही समजण्याचे कारण नाही.
- मोदीलाटेत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुतीला 42 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात सत्तेच्या धुंदीत असलेल्या काँगेसच्या नेत्यांसाठी हा निकाल म्हणजे जबरदस्त झटका आहे. टाटांच्या नॅनो कारमधून संसदेत जातील, इतकेच आघाडीचे खासदार जनतेने निवडून दिले, असे गमतीने लोक बोलत आहेत. नांदेड आणि हिंगोली या मराठवाड्यातील दोनच जागा काँगेसने जिंकल्या. नांदेडला अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. तसे झाले असते तर तीही जागा गेली असती. हिंगोलीची जागा राहुल गांधी यांचे समर्थक राजीव सातव यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून काँगेसने घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ असल्याने चव्हाण यांच्या प्रयत्नांनी ती काठावर आली. अन्यथा राज्यात काँगेसला भोपळा मिळाला असता.
- राष्ट्रवादी काँगेसने ज्या चार जागा जिंकल्या त्यात बारामती, सातारा, कोल्हापूर आणि माढा आहे. परंतु सातारा वगळून या जागा कमी मताधिक्याने आल्या. यातील बारामती, सातारा आणि माढा या तीन जागा शिवसेना-भाजपने त्यांच्या छोटया मित्रपक्षांना दिल्याने त्या निसटल्या. सातारची जागा जर शिवसेनेने रिपाइंला न सोडता शिवसेनेकडे ठेवली असती तर निकाल बदलला असता. मागच्यावेळी ज्या पुरूषोत्तम जाधव यांनी शिवसेनेच्या तिकीटावर अडीच लाख मते मिळवली होती त्यांनी या निवडणुकीत शिवसेनेचे तिकीट नसल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवली, त्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. रिपाइंच्या उमेदवाराची तीच अवस्था झाली. शिवसेनेने अवघड ठिकाणी रिपाइंला जागा सोडली त्याचा परिणाम युतीला सातार्यात बदल घडवता आला नाही. बारामतीतही विजय शिवतारे यांना डावलले गेले. शिवतारे यांनी चांगली तयारी केली होती. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून शिवसेनेला आघाडी दिलेली आहे. सुप्रिया सुळेंचे यश हे काठावर पास असेच आहे. अन्यथा, राज्यात आघाडी साफ झाली असती.
- या महायुतीच्या अनपेक्षित यशामागे नेमके काय दडले आहे? विधानसभेत 90 जागांचे संख्याबळ असलेली महायुती एका रात्रीत विधानसभेच्या 240 जागांवर मताधिक्क्य घेते. इतके बळ महायुतीत आहे का? देशात कितीही लाटा आल्या तरी महाराष्ट्रात मतदार हा समतोल विचार करतो. तो कोणाच्या मागे वाहून जात नाही. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघापैकी 240 मतदारसंघांवर सेना भाजप युतीचा प्रभाव या निवडणुकीत राहिला. उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघ वगळता महाराष्ट्रात सर्वत्र युतीचे प्राबल्य राहिले. उरण आणि पनवेलमध्ये आपल्या विकासकामांच्या आणि विश्वासाच्या जोरावर आपले अस्तित्व दाखवून दिले. गत विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून इथले मोदी आम्ही आहोत हे शाबीत केले.
- महाराष्ट्रातील मतदारांनी याखेपेला जो कौल दिला तो अत्यंत विचारपूर्वक असा दिला असेच यातून दिसते. यूपीएवरचा मतदारांचा राग होताच. महागाई, बेरोजगारी हेही विषय होते. परंतु आघाडीच्या सत्ताधीशांचा मस्तवालपणा मोडून काढण्याचे मतदारांनी ठरविले होते. जाती-धर्माच्या पॉकेटपलीकडे यावेळी मतदान झाले. दिग्गजांचे गड, बुरुज, बालेकिल्ले मतदारांनी भुईसपाट केले. दहशतीवर जास्त दिवस राज्य करता येत नाही, हे काँग्रेसला या निवडणुकीत दाखवून दिले. न बोलता लोक सगळ्यांना त्यांची जागा कशी दाखवितात, हे राज्यात दिसले. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत हे या निवडणुकीत काँग्रेसला मतदारांनी दाखवून दिले. प्रसारमाध्यमे आणि वर्तमानपत्रे यांना मॅनेज करून, पेड न्यूज देवून जिंकता येते हा भ्रम मतदारांनी खोटा ठरविला आहे.
- सलग तीनदा राज्यात काँगेस-राष्ट्रवादी सरकार सत्तेवर आले. त्यामुळे साहजिक आता सत्ता दिसणार नाही, अशी भावना युतीच्या नेत्यांमध्ये होती. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधार्यांना सळो की पळो केले आहे, असेही चित्र नव्हते. सत्तेचा माज दोन्ही काँगेसच्या नेत्यांमध्ये बोकाळला होता. लोकांची कामे केराच्या टोपलीत पडत होती. कार्यकर्त्यांची हेळसांड चालली होती. दोन-दोन टर्म खासदारकी मिळाल्यावरही मतदारांना गृहित धरण्याची बेफिकिरी काँग्रेसला नडली. लोकांच्या समस्यांकडे ढुंकून बघायचे नाही. त्यातच सेना-भाजपचा घसरता आलेख बघून आता आपण तहहयात सत्तेत असणार, या तोर्यात ही मंडळी वागू लागली. अशा मस्तवाल काँग्रेसला मतदारांनी चांगला धडा शिकवला. भाजपमुळे एकदा काँग्रेसची सत्ता गेली की त्याठिकाणी काँग्रेसला पुन्हा येता येत नाही असे अनेक ठिकाणी दिसून आलेले आहे. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यांनी काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. तीथे त्यांना दीर्घकाळ परतता आलेले नाही. गेली पंधरा वर्ष गुजरात, पंचवीस वर्ष उत्तर प्रदेश, बारा वर्ष मध्यप्रदेश काँग्रेसमुक्त केले आहे. तिथे काँग्रेसला शिरकाव करताही येणे शक्य झालेले नाही. आज महाराष्ट्रात तीच गत होण्याची चिन्हे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून राज्याची सत्ता काढून घेतली तर पुन्हा काँग्रेसला किमान दहा वर्ष महाराष्ट्राचे स्वप्न पाहता येणार नाही.
- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्षपद माणिकराव ठाकरे यांच्याकडे अनेक वर्षे सत्ता आहे. परंतु या दोन्ही नेत्यांच्या नाकावरची माशी हलत नाही. दोघेही परस्परांच्या विरोधात. पक्षातील आपले विरोधक कसे नेस्तनाबूत होतील, याकडेच मुख्यमंत्र्यांनी अधिक लक्ष दिले. विरोधकांशी संधान साधून केवळ आपल्यावर कुठला डाग पडणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. त्यांचा कुठे ठसा उमटला नाही. ना धड वक्तृत्व, ना धड निवडणुकांची रणनीती. राज्यात मोदी यांची लाट असल्याचे प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते खासगीत आमदार व मंत्र्यांना सांगत होते. मग पक्षाच्या उमेदवारांमध्ये जिंकण्याची ऊर्मी येणार कुठून? राज्य कारभारात जी निष्क्रियता होती तीच निष्क्रियता निवडणुकीत काँग्रेस नेत्यांना दाखवली होती. आपल्याच आघाडीतील मित्र पक्षांना पराभूत करण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी केले. नीलेश राणे यांचा पराभव राष्ट्रवादीने घेतलेल्या विरोधी भूमिकेने झाला. राहुल नार्वेकरांचा पराभव हा काँग्रेसच्या नेेत्यांनी मतदान करायचे नाही आणि शिवसेनेला मतदान करा असा आदेश दिल्यामुळे झाला. तटकरेंच्या पराभवालाही मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने विरोधी भूमिका घेतली. असे प्रकार सगळीकडे होत गेले. त्याचा योग्य फायदा युतीने उठवला.
- मोदीलाटेला उत्तर देण्याची ताकद काँग्रेसच्या नेतृत्वात नव्हती. गुजरात मॉडेलच्या विरोधात महाराष्ट्रात केलेली कामे त्यांना ठासून सांगता आली नाहीत. इतकी कच नेतृत्वाने खाल्ली. मुस्लिम-दलित या व्होटबँकेला नेहेमीप्रमाणे गृहित धरले गेले. त्यांना मोदींची भीती दाखविण्याचे प्रयत्न झाले. तरीही त्यांनी काँगेसकडे पाठ फिरविली. नंदुरबारसारख्या आदिवासी भागात वर्षानुवर्षे येणारी जागाही काँगेसला राखता आली नाही. मुख्यमंत्र्यांच्या पश्चिम महाराष्ट्रात काँगेसला एकही जागा मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांनी कॅप्टन म्हणून लढायचे असते. पण कप्तानच गोंधळात असल्याने मंत्रीही काँग्रेसला जिंकून आणण्यापेक्षा विरोधकांचे हिशेब चुकते करण्यात मश्गुल होते. त्यामुळे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. लोकसभेत राज्यात काँग्रेसचा बाजार उठला. परंतु आता विधानसभेतही हेच नेतृत्व राहिले तर वेगळे काही घडणार नाही, असे आमदारांना वाटते आहे. ही घाबरलेली काँग्रेसची सेना मनाने पराभूत झालेली आहेच, आता अधिकृतपणे चार महिन्यांनी पराभूत होईल असे चित्र आहे. मराठी मतदारांनी यावेळी मतांचे विभाजन होणार नाही, याची खबरदारी घेतली.
- विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाने कोणते मुद्दे घ्यायचे, असा गोंधळ आता यापुढे सुरू राहील. लोकसभा निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम असली तरी या निकालामुळे पुढील तीन महिन्यांत अनेक राजकीय समीकरणे बदलतील. केंद्रात आणि राज्यात एकच पक्षाची सत्ता असेल तर संवाद चांगला राहतो या भावनेने महाराष्ट्रात युतीची सत्ता येईल यात शंकाच नाही.
मंगळवार, २० मे, २०१४
विधानसभेतही अशीच लाट यावी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा