शनिवार, २४ मे, २०१४

जे लोकसभेत तेच आगामी विधानसभेत काँग्रेसचे पानीपत होणार

  •   
  •     लोकसभेच्या निवडणुकात मोदी लाटेच्या प्रवाहात महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश बालेकिल्ले वाहून गेले आहेत. या निकालाने सत्ताधारी आघाडीची बेअब्रू तर झालीच, पण आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पराभव जोरदार तडाखा देणारा ठरला आहे. सध्या काँग्रेस राष्ट्रवादीचे चिंतन, मनन, आत्मपरिक्षण सुरू आहे. या आत्मपरिक्षणात एकमेकांवर खापर फोडण्याचे आणि निसटण्याचे नाट्य जोरात सुरू आहे. काँग्रेसच्या जिल्हावार बैठकीत सोलापूरात हाणामारी झाली. हा प्रकार म्हणजे एखादा भूकंप झाल्यानंतर किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर रोगराईची साथ पसरते तसा प्रकार झाला आहे. मोदी लाटेत ग्रस्त झालेल्या काँग्रेसला आता बंडखोरी, हाणामारी, चिखलफेक असे विविध रोग लागलेले दिसत आहेत.
  • लोेकसभा निवडणुकीच्या निकालाने आणि नरेंद्र मोदी नावाच्या त्सुनामीने सर्वांनाच अवाक  केले आहे. गेले सहा महिने मोदी यांच्या प्रचाराचा झंजावात सुरू होता. देशात काँग्रेसच्या विरोधात वातावरण होते. या नकारात्मक वातावरणाचा भाजपाच्या सकारात्मक लाटेत रूपांतर करण्याचा मोदी यांचा प्रयत्न यशस्वी ठरत होता. तेव्हाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज बहुतांश निवडणूकपूर्व आणि मतदानानंतर घेतलेल्या जनमत सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला होता. रालोआला 335 जागा मिळवत सर्वांनाच धक्का दिला. एवढेच नव्हे तर भारतीय जनता पक्षाने 282 जागा जिंकून स्वबळावर बहुमत प्राप्त केले. 1984 नंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. तब्बल 30 वर्ष आघाड्याच्या राजकारणाची दहीहंडी सुरू होती. आता आघाडी म्हणून रालोआ निवडून आले असले तरी त्यात बिघाडी होण्याची भिती भाजपला नाही, त्यामुळेच हे एक निर्णयक्षम असे सरकार राहिल यात शंका नाही.
  •  1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे देशात सहानुभूतीची लाट उसळली होती. त्या लाटेत कॉँग्रेसचे 414 खासदार निवडून आले आणि विरोधकांचा पार सफाया झाला. भाजपचे तर देशभरात केवळ दोन खासदार निवडून आले होते. पण तीन दशकानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाला शतप्रतिशत बहुमत मिळवून देत कॉँग्रेसची दारुण स्थिती केली. 1984 च्या निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्ष या उंचीला पोहोचेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण फिनिक्स पक्षाप्रमाणे या पक्षाने भरारी घेतली आहे, हे प्रत्येक राजकीय पक्षाला अभ्यासण्यासाठी मार्गदर्शक असे उदाहरण आहे. विशेषत: जे पक्ष या निवडणुकीत साफ झाले आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांचा अभ्यास केला तर त्यांना काही नवे शिकायला मिळेल यात शंका नाही.
  •  या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ 44 खासदार निवडून आले आहेत. उत्तरप्रदेशात 80 पैकी 72 जागा जिंकण्याचा चमत्कार मोदी यांनी घडवला. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती या 16 व्या लोकसभेच्या किंग मेकर असतील अशी भाकितं वर्तवली जात होती. पण त्यांना या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. अनेक प्रादेशिक पक्षांची अशीच दुरवस्था झाली. नरेंद्र मोदी यांची ही लाट नव्हे तर त्सुनामी होती आणि त्याचा अनेकांना तडाखा बसला. 
  • महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता मोदी नावाच्या सुप्त लाटेने महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची वाताहत केली. विधानसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर असताना आलेल्या या वादळाने सगळे संदर्भच बदलून टाकले आहेत. ज्याप्रमाणे सोळाव्या लोकसभेत काँग्रेसला स्थान राहणार नव्हते त्याप्रमाणेच महाराष्ट्रात आता काँग्रेसला सत्तेवर कोणी जावू देणार नाही हे निश्‍चित झाले आहे.
  • संताप बाहेर आला
  • राज्यातील 48 पैकी 42 जागा जिंकून महायुतीने सर्वांनाच धक्का दिला. या निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारा विरुद्धच्या असंतोषाचा फटका आघाडीला बसणार अशी स्पष्ट चिन्हं होतीच. मतदारांनी काँग्रेस नेत्यांवरचा संताप एकगठ्ठा मतदानाने व्यक्त केला. हा संताप उत्स्फूतपणे बाहेर आला. पण तो एवढा मोठा असेल याची कोणीही अपेक्षा केली नव्हती. भाजप, शिवसेना स्वाभिमानी, रिपब्लिकन आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या या महायुतीला 33  ते 35 जागा मिळतील असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. पण त्याहीपेक्षा मोठे यश त्यांनी मिळवले. त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, प्रतीक पाटील, माणिकराव गावीत यांच्यासह लोकसभेच्या रिंगणात उतरलेले राज्यातील मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे, शिवाजीराव मोघे, संजय देवतळे, सुरेश धस, सतीश पाटील असे अनेक मातब्बर या लाटेत पार भुईसपाट झाले. राष्ट्रवादीला 4 तर काँग्रेसला केवळ 2 जागा मिळाल्या. अशोक चव्हाण आणि राजीव सातव या दोघांना निवडून देऊन मराठवाड्याने काँग्रेसची लाज राखली. मुंबई - ठाणे आणि विदर्भात आघाडीचा सफाया झाला. 
  • भारतात 1951-52 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत सांगली आणि नंदुरबार या दोन मतदारसंघात काँग्रेस कधीही पराभूत झाली नव्हती. आणीबाणी नंतरच्या काँग्रेस विरोधी लाटेतही अभेद्य राहिलेले हे दोन बालेकिल्ले यावेळच्या त्सुनामीत उध्वस्त झाले. ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून घट्ट पाळंमुळं रूजवून असलेल्या आघाडीला लाट असली तरी त्याचा फारसा फटका बसणार नाही असे वाटत होते. पण सहकाराचीच वाताहात लावणार्‍या काँग्रेसला ग्रामीण भागाने सहकार्य केले नाही. 
  • या निवडणुकीचे निकाल सत्ताधारी आघाडीला हादरवून सोडणारे असून त्याचे काय काय परिणाम होणार याची चिन्हं दिसायला लागली आहेत. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नारायण राणे आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील दबाव वाढला. राणे, राऊत यांचे राजीनामे स्विकारले नाहीत हा भाग वेगळा. त्यातील गांभीर्य किती, नाटक किती हा भाग वेगळा आहे पण त्यामुळे मुख्यमंत्र्यांचेे आसन अस्थिर करण्याचा प्रयत्न काँग्रेसअंतर्गत सुरू झाला आहे. चार महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांचे नेतृत्व सक्षम आहे का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. चार महिन्यांकरीता बदल होणार नाही. त्याचा काही फायदाही होणार नाही. पण नैसर्गिक संकटानंतर येणार्‍या रोगराईने पिडीत जसे टपकू लागतात तसा प्रकार काँग्रेसमध्ये होताना दिसत आहे.
  • सरकारविरोधी राग
  • महायुतीला मिळालेले यश आणि विजयी उमेदवारांचे मार्जीन पहाता राज्यात नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा प्रभाव होता हे कबूल करावेच लागेल. पण या लाटेएवढाच केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराच्या विरोधातला रोषही प्रखर होता. सतत 15 वर्ष सत्ता मिळाल्याने नाही म्हटलं तरी आघाडीत एक प्रकारचा मस्तवालपणा आला आहे. काहीही केले तरी लोक आपल्यालाच निवडून देतात हे लक्षात आल्याने बेपर्वाई वाढली होती. धरणातले पाणी मिळावे यासाठी उपोषण करणार्‍यांना करंगळी दाखवण्या इतपत आणि मतं नाही दिली तर गावाचं पाणी तोडण्याच्या धमक्या देण्यापर्यंत मस्तवालपणा वाढला होता. त्यामुळे या निवडणुकीत मोदी लाट नसती तरी, लोकांनी धडा शिकवला असताच याबद्दल शंका नाही. 
  • मराठा आरक्षणाच्या आणि शिवस्मारकाच्या मुद्याचे राजकारण, टोल बद्दल लोकांत असलेल्या असंतोषाची दखल न घेणे, एल. बी. टी. चा दुराग्रह आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संवाद आणि संवेदनाशीलतेचा दुष्काळ यामुळे सरकारची प्रतिमा लोकांमध्ये डागाळली आहे. या संतोषात मोदी लाटेची भर पडली. त्यामुळे काँग्रेसचे पानिपत अटळ होते. महायुतीने योग्य नियोजन केले असते तर या सहा जागा तरी मिळाल्या असत्या की नाही देव जाणे. 
  • 245 मतदारसंघात महायुतीला आघाडी
  •  48 पैकी 42 जागा जिंकणार्‍या महायुतीला राज्याच्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी जवळपास 245 मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची गणितं वेगळी असतात. लोकसभेत आघाडी मिळालेल्या मतदारसंघात विधानसभेला विजय मिळेलच असे नाही. पण त्यामुळे एकूण रागरंग लक्षात येतो. लोकांचा कल स्पष्ट होतो आणि त्यामुळेच सत्ताधार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या मतदारसंघातही महायुतीच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाल्याने चिंता वाटणे स्वाभाविक आहे. चार महिन्यांवर विधानसभा असल्याने ही स्थिती बदलणार नाही आणि बदलायची असेल तर पुढील दोन महिन्यात सरकारला काही तरी भव्य दिव्य करून दाखवावे लागणार आहे. कालच्या चिंतन बैठकीत शरद पवारांनी दीड महिन्यात शक्य तेवढे करा असा सल्ला प्रत्येकाला दिलेला आहे. 
  •  सध्या मुख्यमंत्री बदलाची मागणी जोर धरते आहे. काँग्रेसमधून यासाठी दबाव वाढतो आहे. नेतृत्वबदलाने समस्या सुटणार नाहीत.  लोकसभेत काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा मिळाल्याने विधानसभेच्या जागा वाढवून मागण्यांची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे पुढच्या काळात आघाडीत बरेच महाभारत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागावाटपावरून वाद घालून स्वबळावर लढण्याची शक्कलही लढवली जावू शकते. प्रत्यक्षात आता काँग्रेसला उमेदवार मिळतात की नाही हा खरा प्रश्‍न आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 26 उमेदवार मिळवता आले नाहीत. रायगडचा मतदारसंघ उमेदवार नाही म्हणून ऐनवेळी राष्ट्रवादीला दिला गेला. त्यामुळे अगदी काँग्रेस राष्ट्रवादीत 144-144 असा फॉर्म्युला ठरला तरी तेवढे उमेदवार उभे करायला काँग्रेसला माणसे मिळणे शक्य नाही. पूर्वी सभांना गर्दी जमवणे हे जसे काँग्रेसपुढे आव्हान होते तसे आता उमेदवार मिळवणे हे आव्हान झालेले आहे. त्यामुळे केवळ पाडण्यासाठी आणि पक्षाचे चिन्ह मतदानयंत्रात दिसण्यासाठी उमेदवार उभा करायचा हाच प्रकार काँग्रेसला करावा लागेल.
  • विधानसभेत लाट कोणाची?
  • लोकसभा निवडणुकीत मोदी नावाची त्सुनामी आणि त्याला मिळालेल्या जनसमर्थनाने युतीला घवघवीत यश दिले. पण आगामी विधानसभा निवडणुकीत अब की बार मोदी सरकार हा नारा असणार नाही. या निवडणुकीतील यशामुळे निर्माण झालेले वातावरण आणि केंद्रातील मोदी सरकारचा महायुतीला लाभ मिळणार असला तरी केवळ त्यावर अवलंबून राहिले तर गडबड होऊ शकते. या यशाची हवा डोक्यात गेली आणि त्यात तरंगत राहिले तर हुशार काँग्रेसी कधी डाव उलटवतील ते कळणारही नाही. त्यामुळे महायुतीला विधानसभेचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत दिडशे विधानसभा मतदारसंघात युतीला आघाडी होती. पण विधानसभेत केवळ 92 जागा मिळाल्या याचेही भान त्यांनी ठेवलेले बरे. भारतीय जनता पक्षाने मतविभागणी होवू नये आणि काँग्रेसला फायदा होवू नये याची योग्य आखणी केली होती. महाराष्ट्रात तेच करावे लागणार आहे. आज युती, आघाडी, मनसे आणि आप अशा चार शक्तीमध्ये निवडणूक होणार आहे. त्यामुळे आघाडी विरोधातील मते युती, आप आणि मनसेमध्ये विभागली जाणार आहेत. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता युतीने विशेषत: शिवसेनेने आपले जुने दुरावलेले मित्र जवळ करून मतविभागणी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.
  •    नरेंद्र मोदी लाटेचा भाजपप्रमाणेच शिवसेनेलाही मोठा फायदा झाला आणि 20 पैकी 18 जागा निवडून आल्या. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर शिवसेनेची अवस्था नाजूक झाली आहे. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या चार विद्यमान खासदारांनी आणि काही नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. पण मोदी लाटेने शिवसेनेलाही दहा हत्तीचे बळ दिले. सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश राणे यांना शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी धूळ चारली. हा विजय शिवसेनेला मानसिक शक्ती देणारा आहे. पक्ष सोडून गेलेल्या आनंद परांजपे आणि भाऊसाहेब वाकचौरे या दोन मावळत्या खासदारांना शिवसेनेच्या नवख्या उमेदवारांनी धूळ चारली. छगन भुजबळ आणि गणेश नाईक या जुन्या शत्रूंना नाशिक, ठाण्यात शिवसेनेेने धूळ चारली. सगळे जुने हिशेब एका झटक्यात पूर्ण झाले. मोदी लाटेचा हा फायदा शिवसेनेने विसरून चालणार नाही. योग्य नियोजन करून युतीला आपली सत्ता आणता येईल.
  • आप झाले फ्लॉप
  • आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भरपूर हवा केली होती. पण नंतर त्यांचा बहर ओसरत गेला. मेधा पाटकर आणि वामनराव चटप या दोन उमेदवारांना बरी मतं मिळाली. पण आपच्या राज्यातील एकाही उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही. तीच गत मनसेची झाली. त्यांना तर आपपेक्षा कमी म्हणजे केवळ दीड टक्का मतं मिळाली. महाराष्ट्रात आपचा प्रभाव दिसणार नाही. कारण आम्ही इथे बाप आहोत, अशी वक्यव्ये राज ठाकरे यांनी केली होती. भाजपाची इच्छा असूनही शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांना महायुतीच्या गाडीत शिरता आले नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना एकतर्फी पाठिंबा देऊन आणि भाजपा उमेदवारांविरुद्ध न लढण्याचा निर्णय घेऊन त्यांनी गाडीच्या टपावर चढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना काहीही फायदा मिळाला नाही.
  • आगामी विधानसभा ही काँग्रेस आघाडीला सत्तेवरून हटवण्याची आहे. त्यासाठी अनुकूल वातावरण असताना युती कशाप्रकारे व्यूहरचना करते आणि आपल्या मित्रपक्षांना बरोबर घेते यावर त्यांचे यश अवलंबून असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: