रविवार, १८ मे, २०१४

मोदी विजयाचा अन्वयार्थ दिल्ली ते गल्ली स्पष्ट विश्‍लेषण

  • सोळाव्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अगदी स्पष्ट बहुमत मिळवले आहे. हा विजय नरेंद्र मोदींची दूरदृष्टी, नियोजन आणि विकासकामांचा आहे. सर्वात कठीण परिस्थिती असताना मार्ग काढत नरेंद्र मोदींनी गेली दोन वर्ष नियोजन केलेले होते. पक्षांतर्गत आणि बहिस्थ विरोध असतानाही जनतेच्या मनात घर करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले त्याचा हा विजय आहे. त्यामुळेच या निवडणुकीतील विजयाचे विश्‍लेषण आणि अन्वयार्थ काढताना प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करावी लागेल.

  • प्रसारमाध्यमांचा विरोध

  • नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर बहुसंख्य प्रसारमाध्यमांनी नरेंद्र मोदी हा थट्टेचा विषय केला होता. नरेंद्र मोदी म्हणजे एखादा खलनायक आहे अशा तर्‍हेचे चित्र प्रसारमाध्यमांनी उभे करून नरेंद्र मोदींचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. बहुसंख्य प्रसारमाध्यमे आणि वर्तमानपत्रे ही काँग्रेसची असल्यामुळे नरेंद्र मोदींना या वर्तमानपत्रांनी वाळीत टाकल्याचा प्रकार केला होता. स्वत:ला तज्ज्ञ म्हणवणारे दिग्गज आणि ज्येष्ठ म्हणवणारे पत्रकारांना या निकालाने धडा मिळाला आहे. काँग्रेसची भूमिका प्रसारमाध्यमे मांडत होती हे चुकीचे होते. कुमार केतकर यांच्यासारखा दिव्य संपादक पत्रकार साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरून नरेद्र मोदींवर टिका करतो आणि काँग्रेसचे कौतुक करतो. हा अक्कल गहाण ठेवल्याचा प्रकार होता. निखिल वागळे यांना तर नरेंद्र मोदी म्हटल्यावर तळ पायाची आग मस्तकाला जायची. मोदींना दूषणे देण्यासाठी मुद्दाम जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या माणसाला चर्चेत बोलवून गलिच्छ टिका केली जायची. या सगळ्या परिस्थितीत प्रसारमाध्यमे विरोधात असताना नरेंद्र मोदींचा झालेला विजय हा खरा विजय आहे.
  • भाजपचे नियोजन
  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीत स्थिर असलेल्या मित्र पक्षांचा लाभ झाला पाहिजे. त्यासाठी तडजोड केली पाहिजे. नव्या येणार्‍या मित्र पक्षांना सन्मानाने वागवले पाहिजे हे नियोजन भारतीय जनता पक्षाने केलेले या निवडणुकीत दिसते. महाराष्ट्रात महायुतीत रिपाइं हा पक्ष आल्यावर रिपाइंना बरोबर घेण्याचा मोठेपणा भाजपने दाखवला. रिपाइंचे रामदास आठवले हे लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवून खासदारकी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भाजपने केला. राज्यसभेसाठी शिवसेना आपली जागा रामदास आठवलेंना देण्यास तयार नव्हती तेव्हा दोघांनाही सांभाळून घेण्यासाठी भाजपने आपली जागा मोठेपणाने रामदास आठवलेंना दिली आणि खासदार म्हणून राज्यसभेत पाठवले. प्रकाश जावडेकर यांना थांबवून रामदास आठवले यांना संधी देण्याच्या भूमिकेमागे नरेंद्र मोदी यांचे नियोजन होते. त्याचा चांगला संदेश आंबेडकरी जनतेमध्ये गेला. काँग्रेस राष्ट्रवादीने सातत्याने रिपाइं जनतेला फसवले असताना भारतीय जनता पक्षाने मात्र शब्दाला जागून आठवलेंना सन्मान दिला, यामुळे रिपबल्किन जनता मोदींच्या, भाजपच्या पर्यायाने मित्र पक्षांच्या पाठीशी उभी राहिली. हीच होती खरी मोदी लाट. मोदी लाट कशी निर्माण होत गेली हे फार महत्त्वाचे आहे. ती एकाएकी निर्माण झालेली नाही. ती नियोजनाने मोठी केली गेली आहे.
  •     काँग्रेसमुक्त भारताची घोषणा
  • नरेंद्र मोदी यांचा जेव्हा उदय होवू लागला होता तेव्हा देशातील महागाई, भ्रष्टाचार, अत्याचार, गुन्हेगारी याला देशातील जनता कंटाळली होती. या प्रत्येक गोष्टीला काँग्रेस जबाबदार आहे हे जनतेला माहित होते. पण काँग्रेस विरोधात बोलायला कोणी धजावत नव्हते. ज्या प्रसारमाध्यमांनी हे प्रश्‍न उचलून धरायला पाहिजे होते ती प्रसारमाध्यमे विकली गेलेली होती. त्यामुळे नरेंद्र मोदींना जेव्हा भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोेषित केले, तेव्हा त्यांनी सर्वात पहिली घोषणा दिली ती काँग्रेसमुक्त भारत करण्याची. त्याप्रमाणे त्यांनी गुजरात, राजस्थान, दिल्ली, हिमाचलप्रदेश, गोवा या राज्यांमधून काँग्रेसला शून्यावर नेत अन्य राज्यातूनही काँग्रेसचा सुफडा साफ केला. महाराष्ट्राचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या काँग्रेसला अब्रू वाचवण्यापुरती एकमेव जागा मिळाली. पण काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करून त्यांनी आपले वादळ घोंघावत ठेवले.
  • भाजपमध्ये मतभेद असल्याचा आभास
  • आपल्या पक्षाबाबत चर्चा करण्यापेक्षा किंवा विकासकामांवर चर्चा करण्यापेक्षा काँग्रेस आणि प्रसारमाध्यमांनी, विविध वाहिन्यांनी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद आहेत यावर चर्चा करण्यात फार वेळ घालवला. नरेंद्र मोदी- अडवाणी यांच्यात मतभेद आहेत. नरेंद्र मोदी-मुरली मनोहर जोशी यांच्या मतभेद आहेत, सुषमा स्वराज-नरेंद्र मोदी यांच्यात मतभेद आहेत, वसुंधरा राजे सिंधिया-नरेंद्र मोदी यांच्यात मतभेद आहेत, गडकरी मुंडे यांच्यात विरोध आहे, खडसे-विनोद तावडे यांचे पटत नाही अशा चर्चा सुरू करून भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी आहे असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि प्रसारमाध्यमांनी केला. पण भाजपने यावर कुठेही भाष्य केले नाही. आपण या ना त्या निमित्ताने चर्चेत आहोत हेही नसे थोडके. उद्या हीच प्रसारमाध्यमे आपल्या मागे लागतील याचा विश्‍वास भाजपला होता. तो त्यांनी साध्य करून दाखवला.
  •   अण्णा हजारेंचे आंदोलन आणि आपचा उदय
  • 2011च्या ऑगस्टमध्ये अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार, जनलोकपालसाठी मोठे आंदोलन उभे केले. हे आंदोलन काँग्रेस विरोधात होते. हा विरोध त्यांनी कोणातरी एकाच्या बाजूने उभे राहून भक्कम करण्याची गरज होती. पण काँग्रेसही नको, भाजपही नको, मोदी तर अजिबात नको असा अण्णा हजारेंनी हेका लावला. आपण राजकारणात जाणार नाही असे सांगत त्यांच्याच सहकार्यांनी आम आदमी पार्टी उभी केली. हा प्रबळ विरोधी पक्ष असेल असा दावा केला. पण हा बार फुसका निघाला. बदल हवा असेल तर दुसर्‍यावर विश्‍वास टाकला पाहिजे. पण दुसराही नको म्हटल्यावर पहिला बदलणार कसा? पर्याय तर असला पाहिजे. अशावेळी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला पाहिजे हे अण्णा हजारेंनी केले नाही. अण्णा हजारे फक्त काँग्रेसला धमकावत आपला फायदा करून घेत राहिले. हे वास्तव जनतेला समजल्यावर बदलासाठी अण्णांच्या आंदोलनाचा उपयोग नाही तर नरेंद्र मोदींचे वादळ महत्त्वाचे आहे हे लक्षात घेतले. त्याचा योग्य फायदा भारतीय जनता पक्षाने करून घेतला.
  • राज्यातही मोदी लाटेचा परिणाम
  • भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक जिंकण्यासाठी लढवली होती. त्यामुळे केवळ आपणच नाही तर आपल्याबरोबर आपल्या मित्र पक्षांचा फायदा कसा होईल याकडे पाहिले. नरेंद्र मोदींनी जास्तीत जास्त सभा महाराष्ट्रात घेवून 40 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणण्याचे नियोजन केले. शिवसेनेचे नेतृत्त्व या निवडुकीत प्रभावीपणे पुढे आले नसले तरी मोदी लाटेमुळे शिवसेनेला न भुतो न भविष्यती असे यश या निवडणुकीत मिळाले आहे. त्याचप्रमाणे सोबत घेतलेल्या मित्रपक्ष स्वाभीमानी संघटना, रिपाइं यांचाही फायदा करण्याचा प्रयत्न या लाटेत झालेला दिसून येतो. यामध्ये भल्या भल्या दिग्गजांना पराभवाची चव चाखावी लागली आहे.
  •        सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव
  • खोटी आश्‍वासने देवून तुम्ही एकवेळ निवडून याल पण वारंवार जनतेची दिशाभूल तुम्ही करू शकणार नाही हा इशारा सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवातून मतदारांनी दाखवून दिलेला आहे. 2012 पर्यंत हा देश, महाराष्ट्र भारनियमनमुक्त करू. शेतकर्‍यांना मोफत वीज देवू अशी आश्‍वासने काँग्रसने आणि तत्कालीन उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती. मोफत सोडा विकत देण्यासाठीही या सरकारकडे वीज नाही हे वास्तव आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांना चांगलाच धडा शिकवलेला आहे. याउलट नरेंद्र मोदी हे विकासाचे मॉडेल म्हणून समोर आले, त्याचा हा परिणाम शिंदेच्या पराभवात झाला.
  • अनिल शिरोळे यांचा विजय
  • पतंगराव कदम यांनी कितीही आपले साम्राज्य मोठे केले असले तरी त्यांचे पुत्र विश्‍वजीत कदम यांना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी माती चारली आहे. कारण सुरेश कलमाडी यांच्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण जगभरात देशाची बदनामी झालेली असताना त्यांना जवळ करणे चुकीचे होते. सुरेश कलमाडीच काँग्रेसचा प्रचार करतात, काँग्रेसला मते द्या सांगतात आणि काँग्रेसचे ते हिरो होतात. ज्यांना भ्रष्टाचाराने ग्रासले आहे त्या काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी हा पराभव झालेला आहे.
  • मावळ मतदारसंघाचा निकाल
  • मावळ मतदारसंघात गद्दारीचे राजकारण करून काँग्रेसने आपल्या मित्रपक्षाला धोका दिला. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मणभाऊ जगताप विजयी होवू नयेत म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसच्या स्थानिक पुढार्‍यांनी आपल्या आणि मित्र पक्षाच्या वरिष्ठांना अंधारात ठेवून आधी दोन दिवस अगोदर शिवसेनेला मतदान करा असा आदेश काढला. त्याचप्रमाणे लक्ष्मण जगताप यांच्याबाबत प्रचंड गैरसमज पसरवण्याचे काम सभांमधून काँग्रेसने केले. यामध्ये शरद पवारांनी एका सभेत सांगितले होते की लक्ष्मण जगताप कोकणात शेकापक्षाचा तर घाटावर अपक्ष उमेदवार असल्याचे सांगत आहेत. हा अपप्रचार मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारा होता. त्याचप्रमाणे कालांतराने लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीबरोबर जाणार आहेत अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरवली गेली. त्यामुळे राष्ट्रवादीचा माणूस, पवारांचा माणूस या जवळकीमुळे मतदार मोदी प्रवाहात गेला. लक्ष्मण जगताप यांचा, शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा हा नरेंद्र मोदींनाच होता हा संदेश पाठविण्यात मावळ मतदारसंघात जगताप कुठेतरी कमी पडले असावेत. मात्र उरण पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाशिवाय कोणताही पर्याय नाही याची जाणिव मतदारांना चांगलीच आहे. कोणत्याही परिस्थितीत शेकापक्षाला सोडायचे नाही कारण मोदींप्रमाणे उरण पनवेलमध्ये विकास करणारा पक्ष हा शेकापक्षच आहे याची जाणिव मतदारांमध्ये आहे. त्यामुळेच पनवेल विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार असतानाही काँग्रेसला मानहानीकारक असा फटका बसलेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा तब्बल 40 हजार मतांनी शेतकरी कामगार पक्ष पुढे आहे. तोच प्रकार उरणमध्ये आहे. उरणमध्ये शेकापक्षाच्या उमेदवाराला 75 हजाराच्या आसपास मते आहेत तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारास फक्त 32 हजार मते आहेत. म्हणजे काँग्रेस उरणमध्ये निम्मिही शिल्लक राहिलेली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कोणत्याही लाटेत विकासगंगा आणणारा शेकाप मात्र उरण पनवेलमधून उजळून निघाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: