रविवार, ४ मे, २०१४

दुभंगलेल्या भिती सांधण्यासाठी विनोदाची गरज


  • राजकारणात आणि निवडणुकीत भाषणबाजी करताना थोडेफार विनोदाचे ज्ञान असणे आवश्यक असते. प्रसंगावधान आणि स्थानिक घटनांची माहिती असणे हे महत्त्वाचे असते. आपल्याकडे जेवढे यशस्वी झालेले नेते आहेत त्यांच्याकडे या गोष्टीचे भान होते म्हणून ते यशस्वी झाले. पण भाषाकौशल्याचा प्रचंड वारसा असणार्‍या महाराष्ट्रात सध्या चांगले वक्तृत्व असलेले नेते नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल. आज ऐकावे असे भाषण फारसे मिळत नाही. महाराष्ट्रात राज ठाकरे सोडले तर ज्यांच्याजवळ भाषणाचे चांगले मुद्दे आहेत, काही चांगले किस्से सांगतील असे वक्ते आढळत नाहीत.
  •     महाराष्ट्राच्या राजकारणात पंचेचाळीस वर्ष अधिराज्य गाजवलेल्या शरद पवार यांनीही आपली विनोद बुद्धी अनेकवेळा वापरली म्हणून ते यशस्वी झाले. 2014 च्या निवडणुकीत शाई पुसून येण्याचा सल्ला देण्याचा त्यांनी केलेला विनोद अंगलट आला असला तरी अनेकवेळा त्यांचे विनोद हे मिश्किल आणि मार्मिक टिपण्णी करणारे असतात. राजकारणाच्या आणि नेहमीच्या टिकाटिपण्णीत सोमवारची आठवड्याची सुरूवात मुद्दाम अशा घटनांची माहिती देण्याचे आज ठरवले आहे.
  •     बॅ. अ. र. अंतुले यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर अचानकपणे बॅ. बाबासाहेब भोसले यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून आले. हा सगळ्यांना धक्काच होता. कारण अंतुले म्हणजे शंभर टक्के काँग्रेसनिष्ठ, इंदिरा गांधींच्या विश्‍वासातले होते. पण त्यांना ते प्रतिभा प्रतिष्ठान भोवले. त्यामुळे सत्तेवरून जावे लागले. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आता काँग्रेस कोणाला पाठवणार असा प्रश्‍न होता. जसा प्रश्‍न अशोकराव आदर्श प्रकरणात गेल्यानंतर होता तसाच तो प्रकार होता. यावेळी शरद पवार विरोधी पक्षात होते. काँग्रेसमध्ये नव्हते. जेव्हा बाबासाहेब भोसले यांचे नाव आले तेव्हा शरद पवारांना काहींनी विचारले की, बाबासाहेब भोसले कसे काय मुख्यमंत्री झाले हो? तेव्हा शरद पवारांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिले होते. ते म्हणाले की, काँग्रेस श्रेष्ठींकडून आदेश होता की आता फक्त निष्ठावान काँग्रेसवालाच नको आहे, तर असा आमदार  हुडका की त्याच्या नावात, आडनावात, किमान पत्त्यामध्ये इंदिरा, गांधी, नेहरू अशापैकी काहीतरी असेल. शे दीडशे आमदारांच्या फाईली काँग्रेस निरिक्षकांनी चाळल्या. पण एकाच्याही नावात, आडनावात, पत्त्यात कुठे गांधी, नेहरू सापडेना. याला अपवाद ठरले ते बाबासाहेब भोसले. कारण त्यांच्या पत्त्यामध्ये नेहरूनगर कुर्ला असा उल्लेख होता. त्यामुळे त्यांना हे मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्याने सगळेजण खोखो हसत होते.
  • आपल्या भाषणात आणि सभेत विनोदाची पेरणी असल्याने सभा जिंकता येते. अशा सभा जिंकण्याचे कौशल्य पुण्यातील साडेतीन शिरोमणी म्हणून जे राजकारण करत होते त्या जयंतराव टिळक, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, ना. ग. गोरे यांच्याकडे होते. जगन्नाथराव जोशी अशाच प्रकारे वार परतवून लावत होते. या तालमीतच शरद पवार अभ्यास करत होते. त्यामुळे भाषणामध्ये विनोदाची नेमकी पेरणी कशी करायची याची त्यांना चांगली जाण आहे.
  • माजी शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे आणि शरद पवार यांच्यात विळा भोपळ्याचे नाते होते. एकाच पक्षात राहून असे मतभेद आणि मनभेद असता कामा नये आणि पक्षसंघटना वाढवली पाहिजे यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला. आळंदीमध्ये मनोमिलनाचा कार्यक्रम ठरवला. या मनोमिलनाच्या कार्यक्रमात रामकृष्ण मोरे आपल्या भाषणात म्हणाले होते की, शरद पवार आणि आमच्यात असलेले सगळे मतभेद आम्ही याक्षणी इंद्रायणीत बुडवत आहोत. त्यावर शरद पवार म्हणाले, हे मतभेद इंद्रायणी सोडून अन्य कुठेही बुडवा. कारण इंद्रायणीत बुडवलेली तुकोबाची अभंगगाथा जशी वर येते तसे ते पुन्हा वर येतील. म्हणून दुसर्‍या कुठल्याही नदीत बुडवा पण इंद्रायणी नको. त्यामुळे सगळे उपस्थित अतिशय दाद देवून हासले आणि खर्‍या अर्थाने मनोमिलन झाले. रामकृष्ण मोरे हे तुकारामांचे वंशज होते, त्यामुळे हा पंच तिथे चपखल बसला होता.
  •    पक्ष मोठा होत गेला, संघटना वाढत गेली की वेगवेगळी मते येतात. मतांतरे होतात. सगळेच विद्वान एक झाले की एकमत कधीच होत नाही. त्यातून गटबाजी आणि बाहेरची कूजबूज सुरू होते. अशा परिस्थितीत परिस्थिती सावरण्यासाठी विनोदाची फोडणी ही अत्यंत आवश्यक असते. शरद पवारांनी हे सातत्याने जपले होते. कुशल संघटनकौशल्य हे त्यांचे वैशिष्ट्य त्यामुळेच झाले. शरद पवारांकडे कृषी खाते आहे याचे कारण ते शेतीवर अधिकारवाणीने बोलतात. त्यामुळे आपल्या भाषणात ते नेहमी शिवसेनेची खिल्ली उडवताना शेतीची उदाहरणे देतात. प्रमोद नवलकर जेव्हा शिवसेनेचे युतीच्या काळात मंत्री होते तेव्हा सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. तेव्हा तिथल्या शेतकर्‍यांनी त्यांना भरपूर फिरवले. एकजण म्हणाला, साहेब यंदा भुईमुगाचं पिक मायंदाळ आलं आहे. या मायंदाळ शब्दाचा अर्थ काही केल्या नवलकरांच्या लक्षात आला नाही. त्यांनी कोणाला तरी विचारले की मायंदाळ म्हणजे नेमके काय? तर एकाने सांगितले की मायंदाळ म्हणजे भरपूर. म्हणून ते पुन्हा भुईमुगाच्या शेताकडे गेले. तर त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. हा शेतकरी सांगतो आहे भुईमूग मायंदाळ आला आहे आणि आपल्याला तो या शेतातील भुईमुगाच्या रोपट्यांना एकही शेंग दिसत नाही. तेव्हा शेतकर्‍याने सांगितले की भुईमुगाच्या शेंगा या जमिनीत येतात, झाडावर नाही. शरद पवार नवलकरांचा हा किस्सा अनेक भाषणातून सांगायचे.
  • शिवसेनेच्या मनोहर जोशींकडेही बर्‍यापैकी विनोदबुद्धी आहे. पण ते आपल्या भाषणातूनच केव्हा कोणाला अडचणीत आणतील हे सांगता येत नाही. कधीकधी त्यांच्या विनोदाला हशा भरपूर मिळतो पण  ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते भाषण करत असतात त्यांच्या ते जिव्हारीही लागते. मनोहर जोशींचे टिकेचे लक्ष हे जास्तीत जास्त शरद पवार हेच असते. 2007 च्या महापालिका निवडणुकीत ठाण्यामध्ये शुभारंभाची सभा घेण्यासाठी मनोहर जोशींना बोलावले होते. तेव्हा शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी प्रास्ताविकात म्हटले होते की, कोणत्याही कार्यात जोशी म्हणजे भटजी लागतो. त्याप्रमाणे आजच्या शुभारंभालाही जोशी सर आहेत म्हणजे आपला विजय निश्‍चित आहे. अनंत तरे यांच्यावर कुरघोडी केल्याशिवाय गप्प बसतील तर ते जोशी सर कसले? त्यांनी भाषणाला सुरूवात केली की मी जोशी असलो तरी माझे रक्त शिवसैनिकाचे आहे. तुम्ही मात्र गोरेगोमटे जोशींसारखेच दिसता. पण मी जीथे नारळ फोडतो तिथे विजय निश्‍चित असतो. पवार जिथे जातात तिथे पराभव निश्‍चित असतो. असे सांगून पवारांवर टिकाटिपण्णी सुरू केली.
  • शरद पवार, मनोहर जोशी, बाबासाहेब भोसले, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे वाचनाची प्रगल्भता होती. त्यामुळे हे नेते कायम अपडेट असायचे. सातारा जिल्ह्यात  नायगांवला सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे उद्घाटन झाले तेव्हा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. शरद पवार खासदार म्हणून आले होते.   त्यावेळी आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांनी आपण पवार साहेबांचा  हात धरून राजकारणात आलेलो आहोत असे सांगताना पवार आणि आपल्यात काय साम्य आहे हे सांगण्यास सुरूवात केली. ते म्हणाले आम्ही दोघांनीही पळून जावून लग्न केलेले आहे. पळून जावून लग्न करणाराही मुख्यमंत्री होवू शकतो. यावर प्रचंड हशा मिळाला पण शरद पवारांनी नाक मुरडले कारण याठिकाणी सुशीलकुुमार शिंदेचे वक्तव्य चुकीचे होते आणि त्यातून वेगळा संदेश जाण्याची शक्यता होती. ही नाराजी त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे जाणवत होती.
  • परतु राजकारणातील गंभीर प्रसंग टाळण्यासाठी विनोदाच्या शिडकाव्याने वातावरण हलके करता येते. माणसे जोडता येतात हे मात्र खरे. म्हणजे संत रामदासांनी टवाळा आवडे विनोद असे म्हटले असले तरी राजकारणात टवाळकी करण्यापेक्षा विनोदाची पेरणी करून गटतटातील दुभंगलेल्या भिंती सांधता येतात. सभेतील प्रेक्षकांची मने जिंकता येतात. बाबासाहेब  भोसले मुख्यमंत्री झाल्यावर एका प्रशासकीय अधिकार्‍याने त्यांची अ‍ॅपॉइंटमेट घेतली होती. त्यांनी दिलेल्या वेळेत ते अधिकारी हजर होते. आपल्या कामात अत्यंत कुशल असलेल्या या अधिकार्‍याचे अडनाव वकील होते. पण बाबासाहेब आपल्या केबिनमध्ये काही लोकांशी खूपवेळ गावाकडच्या गप्पा मारत बसले होते. शेवटी त्यांनी पीएकडे चिठ्ठी पाठवली. पी ए म्हणाला, वकीलसाहेब बाहेर बराचवेळ वाट पहात आहेत. त्यावर बाबासाहेब म्हणाले की, ते वकील असले तरी मी बॅरिस्टर आहे. त्यामुळे रागावलेले वकीलांनीही कपाळाला हात लावला आणि राग सोडला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: