रविवार, २५ मे, २०१४

नरेंद्र मोदी यांचे स्वागतार्ह परराष्ट्रधोरण

  • आज नरेंद्र मोदी भारताचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत. भारताच्या विकासपर्वाला यामुळे सुरूवात होणार आहे. स्वातंत्र्य मिळाले होते पण या देशात सुराज्य नव्हते. आता स्वराज्याकडून सुराज्याकडे जाण्याचे पर्व आता सुरू होणार आहे. म्हणूनच हा शपथविधी सोहळा हा अन्य कोणत्याही शपथविधी समारंभापेक्षा वेगळा आहे. यातील आणखी वेगळेपण हे आहे की सार्क देशांच्या प्रतिनिधींना या समारंभाला आंमत्रित करण्यात आले आहे.
  • पंतप्रधानपदाची शपथ घेताना भारताचे शेजारी व मित्र देशांच्या प्रमुखांनी (सार्क देशांचे प्रतिनिधी) उपस्थित राहावे म्हणून नरेंद्र मोदींनी सर्वांना दिलेले निमंत्रण हे भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे. हा खर्‍या अर्थाने उत्कृष्ठ राज्यकर्त्याचा विचार आहे. गेल्या सहा दशकात या देशातील राज्यकर्त्या काँग्रेसला हा विचार कधीही सुचला नव्हता. आपल्या शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले असले पाहिजेत हा फार महत्त्वाचा विचार आहे. पण पंडित नेहरूंपासून या देशात शेजारी पाकीस्तान, चीन या देशांना घाबरून राहण्याचे तत्व पाळले गेले. पण नरेंद्र मोदींनी हा नवा पायंडा पाडून एका सुरक्षित देशाचे नवे पर्व सुरू केले आहे.
  •  नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यावर ते पाकिस्तान व बांगलादेशाबाबत कठोर भूमिका घेतील असे वातावरण भाजपने देशात तयार केले होते. शिवाय खुद्द नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकींच्या प्रचारादरम्यान भारत-पाक सीमेवर भारतीय जवानांच्या नृशंस हत्येचा मुद्दा हाती घेत पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा केली होती. यूपीए सरकारच्या पाकिस्तानविषयीच्या मवाळ भूमिकेवर कडाडून टीका केली होती. पण सत्ता हाती आल्यानंतर एका रात्रीत शेजारील देशांशी संबंध राखणे ही तारेवरची कसरत व कठीण परीक्षा असते याचे भान मोदींसह भाजपला आले, असे काँग्रेसह मोदी विरोधकांना वाटणे स्वाभाविक आहे. पण हे समजण्याइतका परिपक्वपणा काँग्रेस आणि काँग्रेस समर्थक वाहिन्या, पक्षांमध्ये नाही. निवडणूका या एका विशिष्ठ पक्षाला किंवा आघाडीला जिंकायच्या असतात. पण निवडून आल्यावर तो लोकप्रतिनिधी फक्त एका विशिष्ठ पक्षाचा रहात नाही. तो संपूर्ण देशाचा असतो. ही मानसिकता काँग्रेसला आजपर्यंत कधी कळलीच नाही. त्यामुळेच समतोल आर्थिक विकास काँग्रेसला करता आला नाही. काँग्रेसच्या गल्ली ते दिल्ली हीच अत्यंत कोवती आणि संकुचीत मनोवृत्ती राहिली आहे. तीन वर्षांपूर्वी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्री विलासराव देशमुख यांना बोलावण्यात आले होते. तेव्हा पनवेल काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आणि त्यांचे तीर्थरूप राम ठाकूर यांनी केवढी आदळआपट केली होती. रायगड जिल्हा बँक शेकापच्या ताब्यात आहे. त्या कार्यक्रमाला आमच्या पक्षाच्या मंत्र्यांना का बोलावले? अशी टिका करत आमचे पाय चाटायला आले अशा शब्दात प्रशांत ठाकूर यांनी टिका केली होती. या प्रकाराला वेडपटपणा या शब्दाशिवाय दुसरा शब्द नाही. कारण हे बापलेक एवढे अज्ञानी आणि अडाणी आहेत की त्यांना निवडून आलेला लोकप्रतिनिधी, मंत्री हा कोणत्याही पक्षाचा नसतो तर तो देशाचा असतो, राज्याचा असतो हे समजायला खूप शिकावे लागेल. जिल्हा बँकेचा संबंध हा ग्राम विकासाशी येतो, त्यामुळे विलासराव देशमुख यांना आमंत्रित केले गेले होते हे कळण्याइतकी अक्कल या पितापुत्रांना नाही. कारण काँग्रेसने कधी शहाण्या, हुषार आणि विचारी माणसांना आपल्याकडे खेचलेच नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे काँग्रेसचे नेते, राज्यकर्ते संकुचित वृत्तीनेच राहिले. स्वत: शहाणे झाले नाहीत आणि दुसर्‍यांना शहाणे होवू दिले नाही. त्यामुळे या देशाचा आर्थिक विकास झाला नाही. समतोल विकास झाला नाही. त्यामुळेच सार्क देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केल्यामुळे काँग्रेसजनांच्या भुवया उंचावल्या. कारण चांगले काही करायची, पहायची त्यांना कधी सवयच नाही. त्यामुळे हे थोडे विचित्र वाटले असावे. मोदींच्या निमंत्रणावरून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आज भारतात येत आहेत. पण शरीफ आल्यावर भारत-पाकिस्तान संबंधांना वेगळे वळण लागेल. मोदींनी व्यापार व आर्थिक साहचर्याच्या माध्यमातून पाकिस्तानबरोबरच्या संबंधांबाबत सुधारणा होतील असे एका मुलाखतीत म्हटले होते. त्याला शरीफ यांनी दिलेला प्रतिसाद असा निष्कर्ष निघू शकतो. भारत पाकीस्तान संबंध सुधारावेत असे काँग्रेसला कधी वाटलेच नाही. पाकीस्तानशी संबंध बिघडवून, पाकीस्तान पुरस्कृत दहशतवाद या देशात पसरवून त्याचे भांडवल करून सत्तेवर यायचे हे काँग्रेसचे धोरण राहिले आहे. निवडणूका जवळ आल्यावर पाकीस्तानवर टिका करायची. सामान्य माणसाला सरकार किती आक्रमक आहे असा आभास निर्माण करायचा. तिकडे पाकीस्तान तेच करत होता. भारतातील काँग्रेस आणि पाकीस्तानातील नेते हे परस्परांचा तिरस्कार करून सत्तेवर येत राहिले. त्यामुळे कधी संवाद हा झालाच नाही. देशातील दहशतवाद संपवायचा असेल, तर शेजारी राष्ट्रांशी संंबंध सुधारले पाहिजेत, चर्चा व्हायला पाहिजे. पण काँग्रेसने कधीही त्याबाबत पुढाकार घेतला नाही. कारण काँग्रेस हाच मुळात दहशतवादी पक्ष होता. या निवडणुकीत काँग्रेसचे हे दहशतवादी रूप समोर आल्यावरच काँग्रेसचा पराभव झालेला आहे. पाकीस्तानशी चर्चा करायची की नाही यासाठी अमेरिकेची परवानगी घेण्याचा मूर्खपणा काँग्रेस करत आली. तिथे काय अमेरिकेचा संबंध? पण या सगळ्या काँग्रेसच्या मूर्खपणाला आता नरेंद्र मोदी यांनी मूठमाती दिलेली आहे.
  • आजच्या या शपथविधीला अफगाणिस्तान, मालदीव, भूतान, नेपाळ, बांगलादेशचे प्रमुख उपस्थित राहतील. यूपीए-2 सरकारच्या कार्यकाळात तिस्ता नदी पाणीवाटप व बांगलादेश निर्वासितांच्या मुद्यावरून संसदेत महत्त्वाचे विधेयक भाजपने आणू दिले नव्हते. तसेच तृणमूल काँग्रेसनेही विरोध केला होता. आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारतभेटीवर आल्यास हे प्रश्न उभय देशांना पुन्हा तपासून पाहावे लागतील. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा धोका पाहता अफगाणिस्तानबरोबरही भारताला आपले संबंध अधिक दृढ करावे लागतील तशीच परिस्थिती श्रीलंकेबाबतही आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या मोदींच्या शपथविधीनिमित्ताने होणार्‍या भारतभेटीवर एमडीएमकेचे नेते वायको, अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता व द्रमुकने आताच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंकेतल्या तामिळ निर्वासितांच्या समस्या व त्यांचा श्रीलंका सरकारवरील संताप मोदींनी समजून घेतला पाहिजे अशी भूमिका हे प्रादेशिक पक्ष घेत आहेत. हा सगळा माहोल पाहून मोदींना आपली पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी लागतील.
  • पण याची चिंता करण्याचे कारण नाही. प्रथम देशातील जनतेची सुरक्षितता महत्त्वाची आहे. राष्ट्र फार महत्त्वाचे आहे. श्रीलंकेत राहणार्‍या, श्रीलंकेचे नागरिकत्व घेतलेल्या तामिळी लोकांची काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तो श्रीलंकेचा प्रश्‍न आहे. पण जे जयललिता या अशा कारणांनी हट्टून बसत असतील तर तो त्यांचा मूर्खपणा आहे. भारताबाहेर राहणार्‍या मूळ भारतीयांची चिंता त्या त्या देशांनी करायची आहे. भारतात अनेक पाकीस्तानी, नायजेरीयन, विविध देशातील लोक राहतात. त्यांचे रक्षण भारत करतो आहे. त्याचप्रमाणे पाकीस्तानातील हिंदू, सिंधी यांचे रक्षण करण्याची जबाबदारी पाकीस्तानची आहे. श्रीलंकेतील तमिळींच्या रक्षणासाठी श्रीलंकेने मजबूत व्हायला पाहिजे. पण या जयललितांसारख्या प्रवृत्तींच्या आग्रहाने राजीव गांधींनी घोडचूक केली. आपलेच सैनिक मरण्यासाठी श्रीलंकेत पाठवले. हे शहाणपणाचे लक्षण नव्हते. त्यामुळे या सगळ्या चूका सुधारून सार्क समूहातील सर्वात मोठा देश, सर्वात मोठी सत्ता हे स्थान दाखवून देण्यासाठी नरेंद्र मोदी उचलत असलेले पाऊल हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतीक महासत्ता होण्यापूर्वी सार्कमधील आपले वर्चस्व दाखवणे फार महत्त्वाचे आहे. हे कधीच काँग्रेसने आजवर होवू दिले नाही. कायम दुबळे राष्ट्र अशी भारताची जी प्रतिमा निर्माण केली, ती पुसून टाकून एक खंबीर राष्ट्र अशी प्रतिमा आता निर्माण होताना दिसेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: