बुधवार, १४ मे, २०१४

मोदी लाट आहे हे मान्य करावे लागेल


  • मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर सायंकाळी सहा नंतर सगळ्याच वृत्तवाहिन्यांनी एक्झीट पोलचे निकाल जाहीर केले. प्रत्येक वाहिनीमधील स्पर्धा आणि चढाओढ यामध्ये सर्वात प्रथम कोण काय अंदाज व्यक्त करतो याला फार महत्त्व होते. पण कितीही मतभिन्नता असली तरी सर्वच वाहिन्यांनी एकमताने या निवडुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर येणार असे चित्र दाखवले आहे. बहुतेक वाहिन्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणानुसार नरेंद्र मोदी 272 चा आकडा सहज पार करतील असे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यामुळे मोदींची लाट नाही वगैरे म्हणणार्‍यांची तोंडे पार बंद झाली आहेत. आता मुख्य निकाल 16 तारखेला असला तरी चित्र यापेक्षा काही वेगळे असेल असे नाही.
  • काँग्रेसला तर आपल्या दारूण पराभवाची जाणिव आधीच झालेली होती. त्यामुळे त्यांनी आज 14 मे रोजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा निरोप समारंभ ठेवलेला आहे. मनमोहनसिंग यांनीही गेल्या चार दिवसांपासून आपले निवासस्थान हलवण्याचे काम सुरू केलेले होते. ज्या निवासस्थानात गेली दहा वर्ष ते रहात होते त्या निवासस्थानातून निकालाअगोदरच पाय काढण्याचा त्यांनी निर्णय घेतल्याने काँग्रेसला आपल्या पराभवाची किती जाणिव झालेली होती हे अधिक स्पष्ट होते.
  • शेवटच्या टप्प्यानंतर जाहीर केलेल्या एक्झीटपोलमध्ये आज तकने राष्ट्रीय लोकशाही आघाडी किंवा भाजपला 298 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करीत स्पष्ट बहुमताचा संकेत दिलेला आहे. इंडिया न्यूजने केलेल्या पाहणीनुसार रालोआला 315 जागा मिळतील असे सांगत अगदी स्पष्ट बहुमताचा कौल दिलेला आहे. झी न्यूजच्या निष्कर्षाप्रमाणे भाजपप्रणित रालोआला 299 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे इथेही स्पष्ट बहुमत दिसून येते. एबीपी न्यूज नेल्सनच्या अंदाजाप्रमाणे रालोआला 281 जागा मिळतील असे म्हटले आहे. त्यामुळे इथेही स्पष्ट बहुमताचा कल दाखवलेला आहे. एनडीटीव्हीच्या मते नरेंद्र मोदी यांना 283 जागा सहज मिळतील असा होरा मांडलेला आहे. त्यामुळे मातब्बर अशा विश्‍लेषक आणि अभ्यासक संस्थांनी केलेल्या पाहणीत आकडेवारीत थोडा फार फरक असला तरी नरेंद्र मोदींना स्पष्ट बहुमत मिळेल हे सांगितले आहे. चाणक्य या एजन्सीने तर मोदींना फारच झुकते माप दिलेले आहे. रालोआ 340 जागांवर विजयी होईल असा अंदाज वर्तवला आहे. गोल्डमॅन सॅचच्या अंदाजानुसार भाजपप्रणित रालोआला 302 जागा मिळतील असे म्हटले आहे. इंडिया टीव्हीने दाखवलेल्या अंदाजानुसार भाजपप्रणित रालोआला नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे 317 जागा मिळतील असे म्हटले आहे. नरेंद्र मोदींना सतत विरोध करणार्‍या सीएनएन आयबीएन या वाहिनीच्या निष्कर्षानुसार रालोआला 282 जागा मिळतील असे म्हटले आहे. एक्झीट पोलचे निकाल जाहीर करणार्‍या तब्बल 10 एजन्सीजनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेल्या भाजपच्या पारड्यात झुकते माप असल्याचे अंदाज व्यक्त केलेले आहेत. दोन एजन्सीजचे अंदाज फक्त बाकीच्यांपेक्षा थोडे वेगळे आहेत. यामध्ये हेडलाईन्स टूडे यांच्या मते 272 जागा मिळतील असे म्हटले आहे. तरीही रालोआ सर्वात मोठी आघाडी असेल हेच स्पष्ट होते. तर टाईम्स नाऊच्या मते रालोआला फक्त 249 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजे बहुमतापासून भाजप 24 जागा दूर राहिल असा त्यांचा अंदाज आहे. पण काहीही असले तरी भाजपचे यश हे घवघवीत असेल यात शंकाच नाही. भाजपला सत्तेपासून आता रोखण्याची कोणाचीही ताकद नाही हे स्पष्ट झालेले आहे.
  •  या अंदाजावरून आणि निकालाच्या भाकीतावरून असे जाणवते की नरेंद्र मोदी यांची लाट आहे हे न मानणारेही आता त्यांच्यापुढे झुकलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी नरेंद्र मोदींना विरोध केला आहे ते या निवडणुकीत साफ झोपले आहेत असा अर्थ यातून दिसत आहे. 
  • बिहारच्या 40 जागांमध्ये एकटा भाजप 19 जागा जिंकताना दिसत आहे. तर त्यांच्या मित्रपक्षाला रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला 2 जागा मिळत आहेत. मागच्या 2009 च्या निवडणुकीत भाजपकडे संयुक्त जनता दलाच्या आघाडीत असताना 12 खासदार बिहारमधील होते. आता ती संख्या 7 ने वाढली आहे. तर भाजपशी फारकत घेतलेल्या संयुक्त जनता दलाला 20 वरून 5 वर यावे लागणार आहे. हा मोदींचा दणका आहे. नितिशकुमार यांनी नरेंद्र मोदींना विरोध करून स्वत:च्या पायावर कुर्‍हाड पाडून घेतलेली आहे. काँग्रेसबरोबर जाणार आणि तिसरी आघाडी करून पंतप्रधान होणार अशी फुटकळ स्वप्न पाहणार्‍या नितिशकुमार यांना मतदारांनी चांगलाच दणका दिलेला आहे.
  • उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या राज्यातही भाजपला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. तिथे भाजपला विरोध करणार्‍या मायावती, मुलायमसिंग यांना चांगलाच दणका मतदारांनी दिलेला दिसतो आहे. तर काँग्रेसला पार उखडून टाकल्याचे चित्र आहे. मायावती यांच्या बसपाला फक्त 12 जागांवर समाधान मानावे लागणार आहे तर मुलायमसिंग यांच्या समाजवादी पार्टीचीही तशीच हालत आहे. सर्वात वाईट हालत झालेली दिसते ती काँग्रेसची. काँग्रेसला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी यांना कदाचित पराभवाचा धक्का पत्करावा लागण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या सहा जागा आहेत त्यामुध्ये राहुल सोनिया या दोघांचा समावेश असेल असे ठामपणे सांगता येत नाही. नरेंद्र मोदींवर गलिच्छ पातळीवरून प्रचार करणार्‍या काँग्रेस, सपा, बसपाला चांगला दणका मतदारांनी दिलेला आहे हे यातून स्पष्ट होत आहे.
  • महाराष्ट्र हे तिसरे मोठे राज्य आहे की जिथून 48 खासदार संसदेत जातात. या 48 मध्ये भाजप 21 जागांवर विजयी होईल असा अंदाज वर्तवला आहे. तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला 11 जागांवर यश मिळेल असे सांगण्यात येत आहे. म्हणजे 32 जागा युतीला मिळतील. तर काँग्रेसला अवघ्या 9 तर राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही नरेंद्र मोदींची लाट आलेली आहे हे स्पष्ट झालेले आहे.
  • ही तीन राज्येच फार महत्त्वाची होती. बाकी गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातून घवघवीत यश मिळणार हे तर निश्‍चित होतेच. पण याखेपेला दक्षिणेतही भाजपने चांगलाच शिरकाव केलेला आहे हे या अंदाजावरून दिसून येते. यामध्ये कर्नाटक, सीमांध्र आणि तेलंगणा या राज्यातही भाजपने आपले पाय रोवले आहेत.
  •   दिल्ली, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, झारखंड, पंजाब आणि हरयाणा येथेही भाजपचे प्रदर्शन लक्षणीय दिसते आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ एका विशिष्ठ भागात नरेंद्र मोदींची लाट आली आणि बाकीकडे आली नाही असे म्हणण्याला आता कोणताही वाव नाही. गेली दहा वर्ष दिल्लीतून भाजपला एकही खासदार निवडून आणता आलेला नव्हता. सातही जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले होते. त्याच दिल्लीत याखेपेला भाजप 5 ते 6 जागांवर विजयी होईल आणि आपला 1 जागा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दिल्ली काँग्रेसमुक्त झाल्याचे चित्र आपल्याला सोळा तारखेला पहायला मिळेल यात शंकाच नाही.
  • तामिळनाडूत जयललिता आणि पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनजी या मात्र आपले संख्याबळ चांगले ठेवतील यात शंका नाही. तरीही बंगालमध्ये एका जागेवर भाजपने शिरकाव करून आपले अस्तित्व निर्माण केलेले आहे. पण मोदींना नाचवण्याचा विचार करणार्‍या जयललिता आणि ममता बॅनर्जी यांना ती संधी मिळणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. देशातील जनता आघाडीतून होणारी फरपट आणि निष्क्रिय राजवट याला कंटाळलेली होती. त्यामुळेच अस्पष्ट किंवा त्रिशंकू कौल न देता अबकी बार मोदी सरकार असा कौल दिलेला आहे. 16 तारखेच्या निकालाचे चित्र यापेक्षा वेगळे असेल असे नाही. काही टक्के इकडे तिकडे झाले तरी मोदी पंतप्रधान होणार हे निश्‍चित झालेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: