प्रसिद्ध इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण संमेलनाच्या आयोजकांनी रद्द केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केल्याने, हा वाद निर्माण झाला आणि आमंत्रण दिल्यानंतर एका पाहुण्याला आता येऊ नका, असे कळवावे लागले. हा मराठी संस्कृतीचा अपमानच म्हणावा लागेल. भारतीय मराठी संस्कृती ही ‘अतिथी देवो भव’ मानणारी आहे. आपण अतिथी किंवा प्रमुख पाहुणे म्हणून एखाद्या व्यक्तीला आमंत्रित केल्यावर तिचे स्वागत करणे आणि अपमान न होता ती परत जाणे ही आपली जबाबदारी असते. पण, आमंत्रित करून नयनतारा सहगल यांना आता येऊ नका, असे कळवणे आणि त्यांचे आमंत्रण रद्द केले आहे, हे प्रसारमाध्यमांमधून जाहीर केले जाणे, ही फार मोठी नामुष्कीची आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणारी गोष्ट आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आणि लगेच आयोजकांनी त्यांचे पाहुणेपद, उद्घाटकपद रद्द करणे ही फारच विचित्र गोष्ट आहे. उद्या कोणी कुठे पाहुणे बोलवावेत यासाठी मनसेची परवानगी घ्यावी लागणार काय? विशेष म्हणजे नयनताराबाईंचे आमंत्रण रद्द केल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सगळे झाल्यानंतर या वादावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांची अधिकृत भूमिका मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका असलेले एक पत्र ट्विटरवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मराठी संस्कृतीची जी महत्त्वाची शक्तिस्थळं आहेत, त्यात मराठी साहित्य हे महत्त्वाचे शक्तिस्थळ आहे. एखाद्या भाषेतील साहित्याचा उत्सव साजरा करण्यासाठी त्यावर मंथन करण्यासाठी साहित्य संमेलन न चुकता भरवण्याची परंपरा बहुधा फक्त महाराष्ट्रातच असावी.
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणा-या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिला होता. मनसेच्या स्थानिक पदाधिका-यांचाही यात समावेश होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ट्विटरवरून भूमिका स्पष्ट केली आहे. यावर्षीच्या मराठी साहित्य संमेलनाला साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल प्रमुख उद्घाटक म्हणून आमंत्रित होत्या. याला माझ्या पक्षातील सहका-यांनी विरोध केला असला, तरी मनसेचा अध्यक्ष या नात्याने माझा विरोध नाही, असेही या पत्रात नमूद केले आहे. हा फारच पोरखेळ झाला, असे म्हणावे लागेल. अध्यक्षांची भूमिका एक आणि कार्यकर्त्यांची भूमिका अध्यक्षांच्या भूमिकेच्या विसंगत. म्हणजे रेल्वेचे इंजिन मुंबईच्या दिशेन धावत आहे आणि डबे रूळ सोडून दिल्लीच्या दिशेने धावत आहेत, असेच म्हणावे लागेल. अशा पक्षाची गाडी रुळावर येईल कशी? अशा निश्चित स्टेशन ठाऊक नसलेल्या रेल्वेने प्रवास करणार कोण? पण, यामध्ये महाराष्ट्राबद्दल तिडीक आणि नाराजी अमराठी लोकांमध्ये पसरली त्याचे काय? पाहुण्याला बोलावून नंतर आपले मतभेद आहेत म्हणून नंतर आमंत्रण रद्द करणे हे कितपत योग्य आहे. आपण समारंभात, लग्नकार्यात सर्वानाच बोलावतो. मतभेद विसरून भाऊबंदांनाही आमंत्रित करतो. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही शिवसेनापक्षप्रमुख यांना आपल्या घरातील कार्याला बोलावले आहेच. मग तसाच हा सामाजिक, साहित्यिक सोहळा असतो, विचारांची देवाणघेवाण असते. त्याठिकाणी बाहेरच्या भाषेतील साहित्यिकांनाही अनेकवेळा आमंत्रित केले गेलेले आहे.
यापूर्वी गिरीष कर्नाड, पी. व्ही. नरसिंहराव, एस. एल. भैरप्पा अशा दाक्षिणात्य साहित्यिकांनाही बोलावले गेलेले आहे. याचा अर्थ मराठी साहित्याच्या उत्सवात बाहेरच्यांनी यायचे नाही, विरोधी मते असणारांनी यायचे नाही, अशी कोणतीही परंपरा नाही; परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणा-या प्रवृत्तीने आज सहगल यांना येऊ नये, असे कळवण्यास भाग पाडले, हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असेच म्हणावे लागेल. राज ठाकरे म्हणतात, मराठी साहित्य संमेलनाचे मराठीपण जपले जावे, ही माझ्या सहका-यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. मात्र, नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर मराठी साहित्याची परंपरा खुली होणार असेल आणि ही प्रक्रिया जगासमोर नेण्यात त्या एक वाहक होणार असतील, तर मला आणि माझ्या पक्षाला आक्षेप असण्याचे कारण नाही. हे जर होते, तर राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना झापले का नाही? तुम्ही घेत असलेली भूमिका चुकीची आहे, हे ठणकावून का सांगितले नाही? आयोजकांना आमंत्रण रद्द करावे लागणे ही केवढी नामुष्की आहे. त्याला सर्वस्वी मनसे जबाबदार आहे. आता पश्चाताप व्यक्त करून आणि वरातीमागून घोडे अशाप्रकारे भूमिका मांडून काय फायदा? गेली ती अब्रू गेलीच. महाराष्ट्राची व्हायची ती बदनामी झालीच. महाराष्ट्र बदनाम करणारी सेना अशी ख्याती मनसेने या प्रकारातून मिळवली आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे.
राज ठाकरे म्हणतात, नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरूर यावे, आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो. हा काय पोरखेळ आहे की, भातुकलीचा खेळ आहे? आज आम्ही रुसलो आहोत खेळायचे नाही, रुसवा गेला पुन्हा खेळायला सुरुवात करूया म्हटल्याचाच हा प्रकार आहे. एकदा आमंत्रित केले, पत्रिकेत नाव छापल्यानंतर काही दिवसांवर कार्यक्रम आल्यावर ऐनवेळी उद्घाटक म्हणून कार्यक्रमाला येऊ नका, असे कळवल्यावर आता संयोजकांनी राज ठाकरे यांची मान्यता आहे, तेव्हा तुम्ही या, असे पुन्हा आमंत्रण करावे असे राज ठाकरे यांना वाटते का? राज ठाकरे यांच्या मान्यतेनंतर आयोजकांनी पुन्हा नयनतारा सेहगल यांच्या नाकदु-या काढून माफी मागून पुन्हा आमंत्रित करावे, असे राज ठाकरे यांना वाटते का? असे आयोजकांनी केले तरी त्या पुन्हा आमंत्रण स्वीकारून कार्यक्रमाला येतील, असे राज ठाकरे यांना वाटते का? असे झाले तरी महाराष्ट्राची गेलेली अब्रू परत येणार आहे का? पाहुण्यांना इथे आमंत्रित करून अपमानित केले जाते, हा जो संदेश गेला आहे, तो महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असेच म्हणावे लागेल.