महाराष्ट्रातील एक नामांकित आणि बहुचर्चित नेत्यांच्या लाडक्या श्वानराजांचे नुकतेच निधन झाले. निधन हे दु:खदच असते, कोणाचेही निधन सुखद नसते, तरीही आमच्याकडे दु:खद निधन लिहिण्याची एक प्रथा आहे. त्यामुळे या श्वानराजांचे दु:खद निधनाने सगळा परिसर हळहळला. एरवी रस्त्यावरचे असते, तर ते कुत्रे असते. त्याचा उल्लेख कुत्रं मेलं असा केला गेला असता. पण हे मोठय़ा घरचे असल्यामुळे त्यांचे निधन झाले. सगळा परिसर त्यामुळे हळहळला. कारण महाराष्ट्राच्या एका मोठय़ा नेत्याचे ते श्वान होते. त्या नेत्यांप्रमाणेच या श्वानराजांचीही कामगिरी महान होती, असे नेत्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सांगतात.या नेत्यांच्या लाडक्या कुत्र्याच्या निधनाची वार्ता पसरताच कार्यकर्ते अतिव दु:खी झाले. आपल्या नेत्यांची मर्जी संपादन करण्यासाठी त्या श्वानराजांच्या अंत्यसंस्काराला हा हा म्हणता गर्दी झाली. आता ही पोकळी कोण भरून काढणार? आजमितीला एकही कार्यकर्ता नाही की तो ही पोकळी भरून काढेल. त्यामुळेच या महान श्वानराजांच्या निधनानंतर कार्यकर्ते त्या दिशेने जमू लागले. कारण कार्यकर्त्यांच्या भावना या श्वानराजाच्या बाबतीत अधिकच संवेदनशील आहेत. तसे बहुतेक पक्षात अनेक कार्यकर्ते नेत्यांभोवती असतात. अशाच बडव्यांच्या कोंडाळय़ाला कंटाळून हे नेते बाहेर पडले आणि स्वत:चा नवा पंथ निर्माण केला. आपल्याभोवती नवे बडवे नकोत म्हणून त्यांनी अशा श्वानांचीच एक फौज उभी केली होती. त्यामुळे सगळय़ा कार्यकर्त्यांना या श्वानराजांची महती माहिती होती.एकेकाला या स्मृती आठवल्याने गहिवरून आले. या श्वानराजांच्या लाडात नेते महोदय इतके गुंगलेले असायचे की, त्यांच्याशी खेळण्याच्या नादात आपल्याला भेटायला काही माणसे आली आहेत, काही कार्यकर्ते आलेले आहेत याचे भानही या नेत्यांना नसायचे. त्यामुळे या श्वानराजांची महती संपूर्ण संघटनेत वाढत होती. आपल्या नेत्यांना प्रिय असणा-या श्वानाचे निधन झाल्यामुळे साहजिकच सगळेजण या श्वानाच्या अंत्यसंस्काराला जमा झाले. पांढरे कपडे घालून नेत्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी आले. या राजकीय इतमामात झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी नेत्यांना खूपच गहिवरून आले होते. मीडियाचे प्रतिनिधी जमले होते. एवढी मोठी गर्दी अंत्ययात्रेला जमली म्हणून नेत्यांना भरून आले होते. तरीही काही फुटकळ वृत्तीच्या पत्रकारांनी श्वानराजांच्या अंत्ययात्रेला काळं कुत्रंही फिरकले नाही, अशी बातमी टाकली होती, म्हणे. अर्थात तसे त्या बातमीत चूक काहीच नव्हते. कारण एवढी मोठी अंत्ययात्रा, एवढे मोठे राजकीय इतमामात होणारे अंत्यसंस्कार, पण त्याला एकही श्वान नव्हता. त्या मृताचे कोणी नातेवाईक नव्हते. होते ते फक्त पांढ-या कपडय़ातील कार्यकर्ते. त्यामुळे काळे कुत्रेही फिरकले नाही, या वृत्तात काहीच चूक नव्हती. पण नेते मात्र दु:खी झाले.म्हणजे नेत्यांच्या कुत्र्याचं दुपारी २ च्या सुमारास निधन झाले. परळच्या प्राणी रुग्णालया(हाफकीन)त त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याबाबत एखादा लेख, अग्रलेख, मृत्यूलेख लिहायचे सोडून या महान श्वानराजांच्या अंत्यसंस्काराला काळं कुत्रंही फिरकलं नाही, असे वृत्त देणे म्हणजे लोकशाही मूल्यांचा अपमानच म्हणावा लागेल. बाळशास्त्री जांभेकरांची परंपरा असलेल्या या पत्रकारितेचा किती ऱ्हास झालेला आहे हे यावरून दिसून आले. म्हणजे साडेबारा वर्षापासून हा बंडू नामक श्वान या नेत्यांच्या सोबत होता. त्यामुळेच नेत्यांनी स्वत: परळच्या स्मशानभूमीत या बंडूराजांना अखेरचा निरोप दिला आहे. या बंडू राजांची कामगिरीही इतकी महान होती की, त्यांच्या आठवणींनी नेते व्याकुळ झाले. अंत्ययात्रेनंतर झालेल्या शोकसभेत साक्षात नेत्यांनी गहिवरून या आठवणींनी उजाळा दिला. काय तर म्हणे या बंडू नामक श्वानराजांनी नेत्यांच्या पत्नीला कडकडून चावा घेतला होता. त्यामुळे या बंडूराजांची रवानगी फार्महाऊसवर केली होती. नेत्यांना खूपच आवड श्वानांची होती.या नेत्यांकडे ग्रेट डेन जातीचे दोन कुत्रे पाळले आहेत. नेते महाराष्ट्रप्रेमी असल्यामुळे त्यांनी या दोघांची नावे आपल्या मराठी बाण्याला प्रामाणिक राहून जनू आणि बंडू ठेवली होती. या जनू बांडे परिवाराची दुसरी पिढी इथे कार्यरत आहे. त्यांचीही नावे जनू आणि बंडूच ठेवली होती. या जनू बंडूचा परिवार वाढवण्यावर नेत्यांनी खूप मेहनत घेतली. आपल्या पक्षवाढीपेक्षाही जास्त काळजी त्यांनी जनू बांडे यांच्या परिवाराच्या व्याप्तीकडे घेतली होती. त्यामुळे हे निधन झालेले बंडूराजा या आधीच्या जनू आणि बंडूंची ही पिल्लं आहेत. नेते चित्रपटाचे शौकिन असल्यामुळे त्यांनी या श्वानांची नावेही फिल्मी स्टाईलच ठेवली होती. मेहमूदचे फॅन असल्यामुळे आणि ज्युनिअर मेहमूदही असल्यामुळे या पुढच्या पिढीतील श्वानांचे नामकरण ज्युनिअर जनू आणि ज्युनिअर बंडू असे त्यांनी ठेवले होते. या जनू- बंडूबरोबरच नेत्यांच्या कुटुंबात आणखी एक ग्रेट दिनू नावाच्या कुत्र्याचा समावेश झाला आहे. या तीन कुत्र्यांसोबत नेत्यांकडे आणखी तीन पग जातीचे कुत्रे होते. कारण आमचे नेते हे श्वानप्रेमी आहेत. कारण श्वानांना जेवढी माणुसकी असते तेवढी माणसांना नसते, असे आमचे नेते मानतात. त्यामुळेच नेत्यांच्या घरात साधारण ९ ते १० कुत्रे आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत: या प्रत्येकाचं नामकरण केलं. बंडूचा पराक्रम इतका महान होता की, त्याच्या प्रेमळ दंशाने नेत्यांच्या पत्नीला झालेल्या जखमेची ताकद इतकी होती की, त्यांना आपला चेहरा ठीक करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करायला लागली.अशा या महान श्वानराजांवर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्यावर अनेकांना नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी वाटू लागले आहे की, जल्ला मेला माणसाचा जन्म, श्वानाच्या पोटी जन्माला आलो असतो, तर नेत्यांना चिकटून तरी बसता आले असते. त्यामुळे आपल्या श्वाननिष्ठेपोटी अनेकांनी नेत्यांना मागण्या केल्या आहेत. यामध्ये या श्वानराजांचे भव्य स्मारक उभे केले जावे. त्यामध्ये काहींनी री ओढत ते भव्य आणि आंतरराष्ट्रीय असावे, अशी मागणी केली. काहींनी बांद्रा येथील रस्त्याला बंडूचे नाव द्यावे, अशी मागणी केली, तर कोणी बांद्रामध्ये ब आहे आणि बंडूमध्ये ब असल्याने बांद्रे स्थानकालाच बंडूचे नाव द्यावे अशी मागणी केली, आता बोला.