मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह असंख्य क्रिकेटपटूंना घडविणारे पद्मश्री पुरस्कारविजेते क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यावरील अंत्यसंस्कार शासकीय इतमामात का करण्यात आले नाहीत, यावरून गुरुवारी दिवसभर प्रचंड गदारोळ माजला. सरकारने यासंदर्भात समन्वयाचा अभाव असल्याचे सांगत माफी मागून हात झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी ही झालेली चूक सुधारण्याची वेळ निघून गेली आहे. याचा सगळा रोष क्रीडाप्रेमींकडून मुख्यमंत्र्यांवर व्यक्त होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्या हाताखालची माणसे, सहकारी काही बाबतीत त्यांना अंधारात ठेवत असावेत, असे दिसते. त्यामुळेच अशा चुका घडत असाव्यात. रमाकांत आचरेकर यांना २०१० मध्ये पद्मश्री हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कार हे सरकारी इतमामात होणे आवश्यक होते. पण शासनाकडून तसे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही आणि अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या क्रिकेट चाहत्यांनी रागाला वाट मोकळी करून दिली. कारण एका वर्षाच्या आत मुंबईतील या दोन घटनांची तुलना केली गेली आहे. ती म्हणजे अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू आणि रमाकांत आचरेकर यांचे निधन. दोघेही पद्मपुरस्कार विजेते होते.
पण श्रीदेवीपेक्षा कितीतरी पटीने अधिक सरस काम रमाकांत आचरेकर सरांचे होते. माणसे घडवण्याचे काम सरांनी केले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणारे खेळाडू घडवणारे ते रत्नपारखी असे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांची कामगिरी ही उजवीच होती. देशाला एक भारतरत्न खेळाडू आचरेकर सरांनी दिलेला आहे. ज्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते त्या देवाचा देव म्हणून रमाकांत आचरेकर यांची ओळख आहे. असे असताना केवळ वैयक्तीक करिअरसाठी कामगिरी करणारी एक अभिनेत्री श्रीदेवी हिचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केला जातो आणि तिच्यापेक्षा श्रेष्ठ कामगिरी असलेल्या आचरेकरांचा सरकारला विसर पडतो ही अत्यंत खेदाची बाब आहे. राजकीय पक्ष, विरोधक टीका करतीलच, पण या घटनेने सामान्य आणि बिगर राजकीय व्यक्ती दुखावल्या गेल्या आहेत. त्या रागातून दोन दिवस श्रीदेवी आणि आचरेकर यांच्यात नकळत तुलना होत आहे. श्रीदेवीचा मृत्यू दारू पिऊन पडल्याने झाला, तर आचरेकर अखेपर्यंत गुरू म्हणून कार्यरत होते आणि वृद्धापकाळाने झाला होता. इतपत तुलना करणे भाग पडले. त्यामुळे सामान्यांच्या लेखी सरकारची ही अक्षम्य अशी चूक झालेली आहे.
विशेष म्हणजे राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे सरकारच्या वतीने या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. ते म्हणाले की, आचरेकर यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले गेले नाहीत हे दुर्दैवी आहे. ही कुणाची तरी चूक असून समन्वयाच्या अभावामुळे हे झाले आहे. सरकारचा प्रतिनिधी या नात्याने मी याबद्दल माफी मागतो. यात नेमकी चूक काय झाली हे मी तपासून पाहतो. हा प्रकार म्हणजे निव्वळ अंदाधुंदीचा प्रकार आहे. एकीकडे क्रीडा आणि सास्कृतिक मंत्री विनोद तावडे म्हणतात की, पद्मश्री पुरस्कार मिळाला म्हणजे शासकीय इतमामातच अंत्यसंस्कार केले पाहिजेत, असा काही नियम नाही. असे बोलून आणखी जखमेवर मीठ चोळण्यचा प्रकार झाला आहे. म्हणजे सरकारमध्ये असलेल्या दोन मंत्र्यांच्या मतांमध्ये किती भिन्नता आहे. सरकारमध्ये, प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव आहे हे यातून स्पष्ट होते. हे अंत्यसंस्कार होईपर्यंत सर्वजण शांत होते. पण आचरेकर यांच्यावर गुरुवारी सकाळी दादरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून माहिती देण्यात आली की, आम्हाला आचरेकरांचे अंत्यसंस्कार सरकारी इतमामात करायचे आहेत, याची माहितीच राजशिष्टाचार विभागाने आम्हाला दिली नाही. याचा नेमका अर्थ काय होतो? राजशिष्ठाचार खात्यात नेमके कोणते शिष्ठाचार चालतात? सर्वसाधारणपणे सामान्य प्रशासन आम्हाला यासंदर्भात माहिती देते आणि मुख्यमंत्री त्याला मान्यता देतात.
पण आम्हाला अशी कोणतीही माहिती मिळाली नव्हती, असे सांगून मुख्यमंत्री कार्यालयाने आपले हात झटकले, हे योग्य नाही. राजशिष्टाचार विभागाचा कारभार पाहणारे मंत्री राम शिंदे हे मुंबईत नव्हते. पण याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री कार्यालयातून घेतला जातो, असे ते म्हणाले. जर मला याची माहिती बुधवारी असती, तर मी त्याबाबत निर्णय घेतला असता, असे सांगून ते मोकळे झाले. हा पोरकटपणा आहे. सरकार असे चालवतात का? राजशिष्ठाचाराच्या मंत्र्यांनाच कसले शिष्ठाचार नाहीत हे सर्वानीच यापूर्वी पाहिले आहे. शेतक-यांचा अपमान करून जनावरांना पाहुण्यांच्या घरी घेऊन जाण्याचा शिष्ठाचार शिकवणारे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या आसपास असतील, तर मुख्यमंत्री कितीही चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतील तरीही त्या निर्णयांची अंमलबजावणी होणार नाही, अपयश पदरी पडत राहील हे निश्चित. याबाबत सामान्य प्रशासन विभागातील एका अधिका-याने सांगितले की, एखाद्या व्यक्तीला नागरी पुरस्कार मिळाला आहे अथवा नाही, याचा सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याशी काही संबंध नाही. सिनेअभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा बरीच टीका झाली होती.
पण पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात, असे कारण दिले गेले होते. त्यानुसार आचरेकर सरांनाही निरोप देताना तोच मान द्यायला हवा होता, असा सूर उमटला. पण सरकारमध्ये असलेली अंदाधुंदी आणि समन्वयाचा अभाव हे याला कारणीभूत आहे. शासन आणि प्रशासनात संवाद नसल्याचे हे लक्षण आहे. उत्तम नेता म्हणजे केवळ चांगली भाषणे देणारा नाही, चांगल्या योजना राबवणारा नेता उत्तम नाही, तर घोषित केलेल्या योजनांची, निर्णयाची अंमलबजावणी करणारा नेता तो खरा नेता. पण प्रशासन सरकारला, मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीत, अंधारात ठेवतात हे यातून स्पष्ट होत आहे. शासकीय इतमामातील अंत्यसंस्कार आणि नागरी पुरस्काराचा संबंध नसला तरी असा पुरस्कार न मिळालेल्या अनेकांवरही असे अंत्यसंस्कार सरकारने केलेले आहेत. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार असताना आचरेकर सरांचा पडलेला विसर याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना घ्यावीच लागेल.