येणार येणार, पण कधी येणार? अशा चर्चाना पूर्ण विराम देत अखेर प्रियंका गांधींचा अधिकृतपणे राजकारण प्रवेश झालाच. या प्रवेशामुळे अर्थातच काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल आणि सध्या राहुल गांधींचा उधळत असलेला वारू अधिक वेगाने धावेल यात शंका नाही. प्रियंका गांधी यांना राजकारणाच्या आखाडय़ात उतरवून साहजिकच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीपुढे आव्हान उभे करण्याची किमया काँग्रेसने केलेली आहे, यात शंकाच नाही. राहुल गांधींचे राजकारणात झालेले आगमन आणि प्रियंका गांधींचे आगमन यात तसा फरक आहे. राहुल गांधींचे आगमन वाजपेयींच्या काळात सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी प्रत्येक घटनेची साक्षीदार म्हणून प्रियंका गांधींनी भूमिका निभावलेली आहे. पण आजवर त्यांनी जाहीरपणे आपला भाऊ आणि आईच्या मतदारसंघापलीकडे कधी प्रचारात आणि कार्यात सहभाग दाखवला नव्हता. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोनच मतदारसंघांत आपला वावर ठेवण्यापर्यंत त्यांनी काँग्रेसचे स्वत:चे राजकारण मर्यादित ठेवले होते. पण आता त्यांची थेट उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या पूर्व विभागाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याने देशातील सर्वात मोठय़ा राज्यात काँग्रेसला चांगला लाभ होईल असे दिसते.याशिवाय त्यांचा फार मोठा परिणाम अन्य राज्यातील काँग्रेसलाही नवसंजीवनी मिळवून देण्यात होईल यात शंकाच नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने हा बहुप्रतीक्षित हुकमी एक्का बाहेर काढल्याचे दिसत आहे आणि त्याचा फायदा काँग्रेसला होईल. भारतातील जनता अजूनही गांधी-नेहरू घराण्याला मानणारी आहे. अजूनही भारतीय राजकारणावर इंदिरा गांधींचे गारुड आहे. त्यामुळे प्रियंका गांधींचे दिसणे आणि असणे हे इंदिरा गांधींचा भास निर्माण करणारे असल्यामुळे काँग्रेसला याचा नक्कीच फायदा होईल. एक फार मोठी भावनिक आणि आकर्षणाची लाट निर्माण करण्याची ताकद प्रियंका गांधींमध्ये आहे. याचे कारण त्यांच्या दिसण्यात इंदिरा गांधींचे साम्य ब-यापैकी आहे. लोक त्यांच्यात इंदिरा गांधींना पाहतील आणि त्याचे मतात परिवर्तन होऊ शकेल. असे असले तरी प्रियंका गांधींपुढे आव्हानेही काही थोडी नाहीत. एकीकडे राहुल गांधी पक्षाध्यक्ष असल्यामुळे त्यांची प्रतिमा कुठेही कमी होणार नाही, याची खबरदारी घेत त्यांना काम करावे लागेल. त्याचप्रमाणे गेल्या अनेक दिवसांपासून प्रियंकांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्यावरील आरोप, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची छापेमारी यामुळे ते सतत काळय़ा यादीत गेलेले असताना त्या प्रतिमेचा फटका काँग्रेसला आणि स्वत:ला बसू न देता विरोधकांवर वर्चस्व गाजवण्याचे फार मोठे आव्हान प्रियंकांपुढे आहे. प्रियंका गांधी यांच्या काँग्रेस प्रवेशाने मुख्यत्वे उत्तर प्रदेशातील राजकारणाची दिशा बदलणार आहे.लोकसभा निवडणुकीत हा निर्णय चित्र पालटणारा ठरणार आहे. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांनी काँग्रेसला आघाडीत घेण्यास नाकारले होते, त्यामुळे काँग्रेसच्या जागा कमी होण्याची शक्यताही होती. काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेनुसार पूर्व उत्तर प्रदेशातील ४० लोकसभा मतदारसंघांसाठी प्रियंका यांची करण्यात आलेली नेमणूक लाभदायी ठरेल, असा अंदाज आहे. या ४० मतदारसंघांत पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघही येतो. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी हे ‘प्रियंकास्त्र’ काँग्रेसला लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत. पूर्व उत्तर प्रदेशातून सध्याचे अनेक केंद्रीय मंत्री निवडून आलेले आहेत, त्यांची घोडदौड रोखण्याचा हा प्रयत्न आहे. रायबरेलीतून सोनिया गांधी यांच्याऐवजी प्रियंका गांधी यांना लोकसभा निवडणुकीसाठी उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याशिवाय पूर्व उत्तर प्रदेशातील फुलपूरमधून यापूर्वी जवाहरलाल नेहरू व विजयालक्ष्मी पंडित हे निवडून आले होते. काँग्रेसला १९८४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ही जागा जिंकता आलेली नाही. २०१८च्या पोटनिवडणुकीत ही जागा समाजवादी पक्षाने बसपाच्या पाठिंब्यावर जिंकली होती. या पार्श्वभूमीवर प्रियंकांचा राजकारण प्रवेश काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो. आज प्रियंका गांधी या पहिल्यांदाच संघटनात्मक पद घेत आहेत. त्यांनी याआधी अनेकदा उत्तर प्रदेशला भेट दिली होती, पण ती रायबरेली व अमेठीपुरती मर्यादित होती. तेथे लोक त्यांना गांधी कुटुंबाची कन्या म्हणून ओळखतात. नेहरू-गांधी घराण्यासाठी लोकांच्या मनात जी सदिच्छा आहे त्याचा चांगला फायदा प्रियंका उठवू शकतात.२०१७च्या विधानसभा निवडणुकांतही त्यांचा प्रचार मर्यादित भागात होता. त्यावेळी सप व काँग्रेस यांची युती करण्यात प्रियंका यांचा मोठा वाटा होता. सध्याच्या नियोजनानुसार प्रियंका आता चाळीस मतदारसंघांत प्रचार करतील व उत्तर प्रदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे हाच संदेश काँग्रेसने यातून दिला आहे. त्यांच्या प्रचारामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना इतरत्र प्रचार करण्यास वेळ मिळणार आहे. ते केवळ उत्तर प्रदेशात अडकून पडणार नाहीत. म्हणूनच ही खेळी काँग्रेसला फायदेशीर ठरणार आहे. प्रियंका गांधी या त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारख्याच दिसतात व गर्दी खेचणा-या प्रचारक म्हणून त्या काम करतील. काँग्रेसच्या जुन्या भावनिक आवाहनाला यात महत्त्व दिले असून हे काम प्रियंकाच चांगले करू शकतात. यापूर्वी राहुल गांधींचा राजकारण प्रवेश झाला तेव्हाही त्यांनी अशी गर्दी खेचण्याचे काम केले होते. पण या गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन करण्यात ते कमी पडले. नेमके हेच आव्हान प्रियंका गांधींना स्वीकारायचे आहे.अनुकूल परिस्थितीचा लाभ उठवत आपले वर्चस्व सिद्ध करून विरोधकांना नामोहरम करण्याचे काम करण्याचे शिवधनुष्य त्यांना आज उचलायचे आहे. भाजप विरोधी सप, बसपा यांनी काँग्रेसला वाळीत टाकले असताना प्रियंका या काँग्रेसला संजीवनी देऊ शकतात. त्यातून देशपातळीवरही काँग्रेसच्या जागा वाढू शकतात. २००९च्या तुलनेत २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्र्रेसची उत्तर प्रदेशात फार वाईट अवस्था झालेली होती. २००९ मध्ये २१ खासदार संख्येवरून २०१४ ला फक्त २ जागांवर काँग्रेसला यश मिळाले. ते फक्त राहुल आणि सोनिया गांधींचे मतदारसंघ राखले. बाकी ठिकाणी काँग्रेस शून्य झाली. विधानसभा निवडणुकीतही २८ वरून काँग्रेसचे ७ वर संख्याबळ आले. त्यामुळे सगळीकडून काँग्रेसला झटका बसत असताना प्रियंका गांधी ही काँग्रेसला नवसंजीवनी ठरेल, अशी चिन्हे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा