कर्नाटकात राजकीय उलथापालथ होईल, असे चित्र आज दिसत आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्यामुळे कर्नाटकातील भाजप काहीतरी गडबड करण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय जनता पक्षाचा नवा कानडी कावा काय असेल हे पाहावे लागेल. पण ही अस्थिरता माजवणे हा निवडणूक रणनीतीचा हा एक प्रकार असू शकतो. कारण काँग्रेसला यातून बेचैन करणे आणि बदनाम करणेही भाजपला यामुळे सोपे जाणार आहे.
कर्नाटकमधील काँग्रेस-धर्मनिरपेक्ष आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस भाजपकडून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजप नेत्यांसमवेत आहेत, असा दावा कर्नाटकचे जलसिंचनमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे, तर हे आमदार सातत्याने आपल्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. आपण भाजपच्या ऑपरेशन लोटसला विशेष महत्त्व देत नसल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले असले तरी भाजपपेक्षा त्यांना काँग्रेसची जास्त भीती वाटत आहे. काँग्रेसवर भरवसा ठेवता येणार नाही याबाबत त्यांच्या मनात साशंकता आहे. भाजपच्या गळाला काँग्रेसचे काही आमदार लागलेच असतील, तर काँग्रेस कोणत्याही क्षणी विश्वासघात करू शकते हेही कुमारस्वामींच्या मनात आहे. त्यामुळे कर्नाटकात कुमारस्वामी सरकारवर टांगती तलवार आहे. जो प्रकार १९९६ च्या लोकसभा निवडणुकीनंतर कुमारस्वामी यांचे वडील एच. डी. देवेगौडा यांच्याबाबतीत झाला त्याचीच पुनरावृत्ती होण्याची सुप्त भीती कुमारस्वामींच्या मनात आहे.
१९९६ ला केंद्रात भाजपला सरकार बनवता येऊ नये म्हणून काँग्रेसने अल्प खासदार संख्या असलेल्या जनता दलाच्या एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील तिस-या आघाडीला पाठिंबा दिला आणि वाजपेयींचे सरकार तेरा दिवसांत मागे खेचले होते. त्यावेळी काँग्रेसच्या पाठिंब्यावर असलेल्या देवेगौडा यांच्या मानगुटीवर अशीच टांगती तलवार होती. आपल्या सोयीचे दिवस येताच काँग्रेसने विश्वासघात करून देवगौडा सरकार पाडले होते. त्याच इतिहासाची कर्नाटकात पुनरावृत्ती होताना दिसते आहे. कर्नाटकात सिंगल लार्जेस्ट पार्टी अशी भाजपची परिस्थिती असतानाही केवळ काही आमदारांची संख्या कमी पडल्याने त्यांना सरकार स्थापन करता आले नाही. राज्याभिषेक करूनही बहुमत सिद्ध करता न आल्याने काही तासांत सत्ता सोडावी लागली. कुमारस्वामींकडे बहुमत नसताना काँग्रेसने त्यांना सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिला. त्याचवेळी या अस्थिरतेला सुरुवात झालेली होती. त्याचप्रमाणे भाजपचे येडियुरप्पा गप्प बसणार नाहीत, हेही निश्चित झालेले होते. त्यांनी अनेकवेळा हे सरकार फार काळ टिकू देणार नाही, अशी भीती कुमारस्वामींना घातली होती. त्यावेळी काँग्रेसने कसलीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यामुळेच कुमारस्वामींनी काँग्रेसवर विश्वास ठेवायचा नाही हेही त्याचवेळी निश्चित केले होते.
आता कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला आहे. मात्र सरकारमध्ये अस्थैर्य असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे; परंतु कुमारस्वामींच्या बोलण्यात कोणताही दम आहे असे बिलकूल वाटत नाही. किंबहुना त्यांनी आपले सरकार केव्हाही गडगडू शकते याची मानसिक तयारीही केलेली असू शकते. त्यामुळेच भाजप सत्तारूढ आघाडीच्या आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला. तथापि, एकही आमदार फुटणार नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यी कुमारस्वामींनी केला. अशा प्रकारचे वृत्त पसरवून कोणाला लाभ होणार आहे ते माहिती नाही, मात्र त्यामुळे राज्यातील जनतेचे नुकसान नक्कीच होत आहे, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. मात्र काँग्रेसचे सहा ते आठ आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे हे निश्चित आहे. भारतीय जनता पक्षाने आपले आमदार सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचा एक गट फोडून तो भाजपत आणण्याचा डाव या ऑपरेशन लोटसचा आहे.
धर्मनिरपेक्ष जनता दलाला पाठिंबा देऊन सरकार बनवण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर कर्नाटकातील अनेक काँग्रेस आमदारांची नाराजी होती. जनता दल हा तिस-या क्रमांकाचा पक्ष असताना काँग्रेसने त्यांच्या मदतीने सरकार बनवावे आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री असावा अशी तेथील काँग्रेस आमदारांची भूमिका होती; परंतु पक्षनेतृत्वाने वेगळाच निर्णय घेत बाहेरून पाठिंबा देत धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार आणण्याला पाठिंबा दिला. किमान आघाडीचे सरकार बनवून काही मंत्रीपदे मिळावीत ही माफक अपेक्षा काँग्रेस आमदारांची होती. आगामी काळात निवडणुका लढवण्यासाठी मंत्रीपदे हातात असणे हे त्या मंत्र्यांच्या आणि पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. पण ती संधी काँग्रेस नेतृत्वाने दिली नाही. त्यामुळे फार मोठी नाराजी काँग्रेसच्या एका गटाकडे होती. हीच नाराजी कॅश करण्याचा, त्या नाराजीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न भाजपने करण्याचे ठरवले आहे. काँग्रेसमध्ये राहुन तुम्हाला कसलेही मंत्रीपद मिळणार नाही, तर भाजपमध्ये आल्याने योग्य स्थान मिळेल, असे आमिष दाखवून भाजपने ऑपरेशन लोटसमध्ये काही आमदारांना जवळ केले आहे.कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपची हवा संपली असा देखावा काँग्रेस आणि प्रसारमाध्यमांनी केला. प्रत्यक्षात या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता गेली. काँग्रेसच्या ४२ सीट कमी झाल्या तर भाजपच्या ६० सीट वाढल्या होत्या. जनता दलाच्या ३ जागा कमी झाल्या होत्या. त्यामुळे फायदा फक्त भाजपचा झाला होता. जनतेचा कौल भाजपच्या बाजूनेच होता. असे असतानाही सरकार बनवता आले नाही. १०४ जागांपर्यंत भाजप पोहोचले पण आठ-नऊ जागांसाठी सत्तेपासून दूर राहावे लागले. म्हणूनच लोकसभा निवडणुकीपूर्वी काही करून जनता दल काँग्रेस आघाडी फोडायची आणि भाजपची सत्ता आणायची हे ऑपरेशन लोटसचे धोरण आहे. त्यानुसार येडीयुरप्पाचा भाजप कामाला लागल्याचे दिसते आहे. एकीकडे उत्तर प्रदेशात सपा-बसपाने काँग्रेसला दूर केले. बिहारमध्ये सपा-बसपाने काँग्रेसचा आणखी एक मित्र राष्ट्रीय जनता दल आपल्याकडे खेचला, आता कर्नाटकातही जनता दल काँग्रेसपासून दूर करण्याचे ऑपरेशन लोटसमुळे साध्य होणार हे निश्चित.