विवेकवृत्तीची शिकवण देणारे ते विवेकानंद. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्यांनी लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. अशा या विवेकानंदांची १२ जानेवारी ही जयंती. उत्तर कलकत्त्यातील सीमलापल्ली येथे विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा मोठा होता. विवेकानंदांना दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदी धार्मिक साहित्यात त्यांनी विशेष आवड दाखवली. त्यांना शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रितसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच ते व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत. कोलकात्यात शिमला नामक मोहल्ल्यात सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांनी आपल्या शेजारी राहणा-या नरेंद्रला बोलावून आणले. रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते, म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले असे म्हणतात. अनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले.एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यास दीक्षा दिली. संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झाले होते. पण, ही धर्मभावना कर्मयोगाशी, कर्तव्याशी जोडली गेली होती, हे आजच्या धर्माध नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. राजा अजितसिंग खेत्री यांनी स्वामीजींना विवेकानंद असे नाव दिले. रामकृष्ण परमहंस यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानास बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे, असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदान्त विचार जगभरात पोहोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे, यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चमात्य जगात जाण्याचेही ठरविले. हे सर्व मानव कल्याणासाठी त्यांनी केले होते. देश, धर्म या सीमांच्या पलीकडे पोहोचलेले ते एक वैश्विक व्यक्तिमत्त्व होते. जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणा-या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो, या शब्दांत त्यांनी आपले शिकागोतील व्याख्यान चालू केले.या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्माचे सार, तत्त्व एकच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी असे केले. विवेकानंदांच्या मते, सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच शिवभावे जीवसेवा हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले होते. उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा फार मोठा संदेश स्वामींनी युवकांना दिलेला आहे. ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात, तेच ईश्वराची सेवा करतात. असे सांगून कर्माला महत्त्व देण्याची शिकवण त्यांनी दिली. ज्याप्रमाणे प्रत्येक शास्त्राच्या स्वत:च्या पद्धती असतात, त्याप्रमाणे धर्माच्याही विशिष्ट पद्धती असतात. धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही योग म्हणतो आणि आम्ही जे योग शिकवतो ते वेगवेगळ्या स्वभावांना व मनोधर्माना जुळणारे असतात, हे तत्त्वज्ञान त्यांनी पुढे नेले. कर्मयोग या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्य यांच्याद्वारे मनुष्य दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो, हे त्यांनी स्पष्ट केले होते.भक्तियोगानुसार सगुण ईश्वरावर प्रेम करून व त्याची भक्ती करून मनुष्य आपल्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो, हे त्यांनी सांगितले, तर राजयोगानुसार मन:संयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य जीवनाचा साक्षात्कार करून घेतो आणि ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाच्या द्वारे मनुष्य साक्षात्कार करून घेतो. अखिल मानवजातीचे चरम वा अंतिम लक्ष्य ज्ञान हे आहे. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणा-या एकूण एक दु:ख क्लेशांचे कारण हेच की, आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. माणसाला आयुष्यात जेवढय़ा म्हणून शक्तींना हाताळावे लागते, त्यापैकी मानवी चारित्र्य घडविणारी कर्म शक्ती हीच सर्वापेक्षा अधिक प्रबल आहे असे स्वामींनी सांगितले. आपल्याला कर्म हे करावेच लागेल पण त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हेही आपण हुडकून काढले पाहिजे आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारेच्या सारे हेतू स्वार्थाने लडबडलेले असल्याचे आपल्याला आढळून येईल. परंतु चिकाटी धरल्यास ती स्वार्थमलिनता कमी होत जाऊन अखेरीस समय येईल, ज्यावेळी आपण अधूनमधून नि:स्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ, हा कर्मयोगातील ज्ञानयोग त्यांनी दिला.