गेले नऊ दिवस सुरू असलेला बेस्ट बसचा संप म्हणजे बेस्ट कर्मचा-यांना देशोधडीला लावण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असेच स्पष्ट झालेले आहे. शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे कर्मचा-यांना आणि बेस्ट प्रवाशांना पर्यायाने मुंबईकरांना वेठीला धरण्याचा प्रकार शिवसेनेने केलेला आहे. या प्रकाराचे उत्तर मुंबईकर जनता आगामी निवडणुकीत शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.बेस्टचा प्रश्न सोडवणे शिवसेनेच्या हातात आहे. तरीही हा संप चिघळवून त्याकडे दुर्लक्ष करण्याचे महापातक शिवसेना करत आहे. निर्णय घेण्याची क्षमता आणि अधिकार शिवसेनेकडे असताना शिवसेना मुद्दाम सोंग आणून सरकारकडे बोट दाखवत आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. बेस्टवर शिवसेनेची सत्ता आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत वाटेकरी आहेत. याशिवाय राज्याचे परिवहन खाते हे शिवसेनेच्या दिवाकर रावते यांच्याकडे असताना हा संप होतोच कसा? शिवसेना या संपाबाबत निर्णय का घेत नाही? यामागचे नेमकं षड्यंत्र काय आहे ते समोर आणण्याची हीच वेळ आहे. बेस्टच्या जमिनी-भूखंडांवर शिवसेनेचा डोळा असल्यामुळे बेस्ट बंद पाडण्याचे कारस्थान शिवसेनेकडून होत आहे. ते हाणून पाडले पाहिजे. ज्याप्रमाणे मुंबईची लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे, त्याचप्रमाणे बेस्ट बस ही मुंबईची सहजीवनवाहिनी आहे. पण या बेस्टला संपवण्याचे कारस्थान शिवसेनेकडून होत आहे. कायम गर्दी असणारी बेस्ट तोटय़ात जाऊच कशी शकते? बेस्टला तोटा होईल अशाप्रकारेच ती गेल्या काही वर्षापासून चालवली जात आहे. बेस्ट बस हे एकेकाळचे मुंबईचे वैभव होते. मुंबईची डबलडेक्कर हे इथल्या परिवहन सेवेचे फार मोठे वैभव होते. मुंबईतील गर्दी वाहून नेण्यासाठी ही डबलडेक्कर कायम अपुरी पडेल इतकी भरून वाहायची. पण हळूहळू डबलडेक्कर बसची संख्या कमी केली गेली. छोटय़ा आणि साध्या बस सुरू केल्या. त्यांची संख्याही अपुरी ठेवली गेली. हे सगळे कारस्थान इथल्या नव्हे तर परप्रांतातून आलेल्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांचा धंदा वाढावा म्हणून केले गेले. ८० टक्क्यापेक्षा जास्त रिक्षा आणि टॅक्सीचालक हे परप्रांतीय आहेत. बेस्टच्या कर्मचा-यांना देशोधडीला लावून या परप्रांतीयांची पोटे भरण्याचे महापाप शिवसेनेने केले आहे. केवळ बेस्टचे असलेले सर्व भूखंड डोळय़ांपुढे ठेऊन चालले आहे, असेच दिसते.१९८०च्या दशकात मुंबईतील लाखो गिरणी कामगारांना असेच देशोधडीला लावले. मुंबईतील गिरणगाव उद्ध्वस्त केले गेले. मुंबईतील गिरणी कामगार हा इथल्या संस्कृतीचा भाग होता. मुंबईतील गिरणी कामगारांवर अनेक हिंदी सुपरहिट चित्रपट बनले. गिरणी कामगारांमुळे अनेक आंदोलने हा इतिहासाचा भाग बनला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे १०६ हुतात्मे झाले त्यामध्ये गिरणी कामगार होते. राजकारण, समाजकारणापासून साहित्यापर्यंत गिरणी कामगारांचे योगदान मोठे होते. त्या गिरणी कामगारांना संपवण्याचे काम शिवसेनेने केले. मोठमोठय़ा नामांकित गिरण्यांचे भूखंड गिळंकृत करून त्या ठिकाणी टॉवर आणि मॉल उभे केले. बाहेरच्या लोकांना मोठे केले. इथल्या भूमिपुत्रांना देशोधडीला लावले. महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतून गिरणीत कामाला आलेल्या मराठी माणसाला उद्ध्वस्त केले. हे कमी की काय म्हणून आता बेस्टवर शिवसेनेचा डोळा आहे. पण मुंबईतील बेस्ट वाचली पाहिजे. बेस्ट कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत.आज प्रत्येक स्थानकाच्या बाहेर पाय ठेवता येणार नाही अशा प्रकारे रिक्षा जवळ येऊन चिकटत असतात. केवळ बेस्ट बसमध्ये प्रवासी जाऊ नयेत म्हणून, बेस्टचे प्रवासी पळवण्याचे काम रिक्षा-टॅक्सीचालकांकडून होते. रस्ताही ओलांडता येणार नाही, अशा प्रकारे बसस्टॉपकडे जाण्यापूर्वीच प्रवाशांना अडवून रिक्षा पुढे येतात. त्या मार्गावर असलेल्या बसच्या पुढे रिक्षा आडव्या आणल्या जातात. रिक्षाचालक मुजोरीने बसचालकांना जाऊच देत नाहीत. बसच्या रांगेत असणारे प्रवासी नाईलाजाने रिक्षात बसतात. हे चित्र दररोज ठिकठिकाणी पाहायला मिळते. बांद्रा पूर्वेला हेच चित्र आहे, तर पश्चिमेलाही तेच चित्र आहे. सांताक्रूज, मालाड, गोरेगाव, बोरिवली अशा प्रत्येक ठिकाणी हेच चित्र पाहायला मिळते. तिकडे मध्य उपनगरातही परिस्थिती वेगळी नाही. मुख्य मुंबईतही अगदी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेर, नरिमन पॉइंट, मंत्रालयाजवळ, चर्चगेटजवळ सगळीकडे बेस्ट बसला रिक्षा आणि टॅक्सीचालक आडवे येतात. प्रवासी पळवण्याचे प्रकार होतात. बस रिकाम्या नेल्या जातात. वाहतूक कोंडीत अडकून पडल्या जातात. हे अत्यंत भीषण चित्र नित्य पाहावे लागते. ही परिस्थिती आपोआप निर्माण झालेली नाही. या रिक्षा-टॅक्सी संघटनांचे नेते हे शिवसेनेचे आहेत. ते बेस्टला आडवे येऊन रिक्षाचालकांचा धंदा करण्यासाठी आपले बोर्ड स्थानकाबाहेर लाऊन रिक्षा युनियनचे नियोजन करत असतात. हे सगळे संगनमताचे चाललेले कारस्थान बेस्टच्या मुळावर उठले आहे. सार्वजनिक परिवहन सेवा मोडीत काढून त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचे कारस्थान आहे. बाहेरच्यांची पोटे भरून इथल्या स्थानिकांना देशोधडीला लावण्याचा हा फार मोठा डाव आहे.
गुरुवार, १७ जानेवारी, २०१९
देशोधडीला लावण्याचा डाव
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा