दरवर्षी २६ जानेवारी आल्यावर भारतरत्न आणि पद्म पुरस्काराची घोषणा होते. ती घोषणा झाल्यानंतर त्याचे राजकारण करून अमुक यांना डावलले आणि तमुक यांना दिलेला पुरस्कार योग्य नाही, यावरून राजकारण सुरू होते. यामुळे त्या पुरस्काराचाही अवमान होतो आणि ज्यांना जाहीर होतो, त्यांचाही अपमान होतो. पण, यापूर्वी ज्यांना असे पुरस्कार दिले गेलेले आहेत, ते खरोखरच कसे आहेत याबाबत कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे या पुरस्कारानंतर कोण काय बोलले आहे, त्याचा विचार केला, तर आपल्या अकलेचे दिवाळे हे लोक काढत आहेत असेच वाटते. बाबा रामदेव या संन्याशाने एवढी माया पतंजलीच्या माध्यमातून कमावली असली, तरी स्वत:ला संन्यासी म्हणवून घेत आपले मत त्यांनी प्रकट केले आहे. बाबा रामदेव म्हणतात की, स्वातंत्र्यानंतर एकाही संन्याशाला भारतरत्न दिले गेले नाही. ते न दिल्याबद्दल योगगुरू रामदेव बाबा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी पुढील सरकारला एका तरी संन्याशाला भारतरत्न देण्याचा आग्रह केला आहे.स्वातंत्र्यानंतर गेल्या ७० वर्षात एकाही संन्याशाला भारतरत्न न मिळावे हे दुर्भाग्य आहे. महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंदजी किंवा शिवकुमार स्वामीजी यांपैकी एकास सरकारने पुढील वेळी भारतरत्न देऊन सन्मान करावा, असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे. यावर हसावे की रडावे, असा कोणालाही प्रश्न पडेल. संन्यासी किंवा साधू हे सर्वसंग परित्याग केलेले असतात. सर्व मोह-मायेपासून दूर गेलेले असतात. त्यांची उंचीही खूप पराकोटीला गेलेली असते. त्यांनी कार्य काही पुरस्कारासाठी केलेले नसते. असे असताना त्यांना पुरस्काराने गौरवण्याची अपेक्षा करणेच चुकीचे. त्यात ज्या स्वामी विवेकानंदांना विश्व पुरस्काराने जागतिक पातळीवर गौरवले आहे, त्या स्वामी विवेकानंदांची शिफारस बाबा रामदेव यांनी करावी, यासारखा विनोद नाही. संन्यासी झाल्यावर कोणी मग दहा अवतारांना, देवांना असे पुरस्कार का नाहीत अशीही मागणी करतील. पण, जे स्वातंत्र्यानंतर हयात आहेत, स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर ज्यांचे काही कार्य आहे, अशांना हा पुरस्कार देण्याची प्रथा असताना जुन्या श्रेष्ठ व्यक्तींना, इतिहास पुरुषांना अशा मर्यादित पुरस्कारात बांधून ठेवण्याची अपेक्षाच चुकीची आहे.या पुरस्कारावरून राजकारण करण्याचे कारण नाही. त्याचवेळी असे पद्म पुरस्कार दिलेले काही भ्रष्ट लोकही आज हयात आहेत. त्याबाबत कोणीच काही बोलत नाही. सध्या चंदा कोचर हे नाव गाजत आहे. या चंदा कोचर यांना २०११ ला पद्मभूषण पुरस्कार दिला गेला आहे. आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. भ्रष्टाचारात त्या गुंतल्याची चर्चा आहे. मग असे पद्म पुरस्कार ज्या सरकारने दिले, त्याबाबत कोणीच काही बोलत नाही. पद्मभूषण पुरस्कार दिल्यानंतर माणसाची जबाबदारी वाढते. चारित्र्य टिकवण्याची जबाबदारी असते. असे असताना, चंदा कोचर यांच्यावर कलंक लागलेला असताना त्यांच्या पुरस्कार वापसीची कोणीच चर्चा करत नाही. सहिष्णूतेवरून अनेकांनी पुरस्कार परत केले. पण, चंदा कोचर यांचा पुरस्कार मागे घ्या म्हणून कोणीच बोलत नाही. ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणता राजा किंवा आपल्या व्याख्यानांमधून दाखवला, त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार दिल्याबद्दल टीका होते. पण, चंदा कोचरबाबत कोणीच काही बोलत नाही. हे राजकारण चांगले नाही. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतही बोलायला पाहिजे होते. चंदा कोचर यांना महाराष्ट्राच्या उद्योजक म्हणून हा पुरस्कार २०११ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात दिला गेला आहे. त्याची शिफारस कोणी केली होती याबाबत मौन का, असाही प्रश्न महाराष्ट्र विचारत आहे.त्यामुळे भ्रष्ट लोकांना पुरस्कार दिला गेल्याबद्दल साधा निषेधही करायचा नाही आणि त्यावरून विनाकारण राजकारण मात्र करायचे, हा प्रकार म्हणजे सवंग प्रसिद्धीसाठी केलेला आटापिटा म्हणावा लागेल. तोच प्रकार बाबा रामदेव यांचाही आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल रामदेव बाबांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, प्रवण मुखर्जी यांना भारतरत्न दिल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुकही केले. पण, त्यानंतर संन्याशाला भारतरत्न का दिले नाही म्हणून विचारणा केली? ज्या संन्याशांची नावे भारतरत्न द्या म्हणून रामदेव बाबा यांनी घेतलेली आहेत, त्यातील स्वामी विवेकानंदांनी मोह माया जमवण्यासाठी भगवी वस्त्रे परिधान केलेली नव्हती. ज्याप्रकारे पतंजली उद्योग समूहातून बाबा रामदेव व्यवसाय करत आहेत, पैसा कमावत आहेत, तसा कोणताही उद्योग स्वामी विवेकानंदांनी केलेला नव्हता. ते खूप उंचीला पोहोचले होते. त्या उंचीला अशा पुरस्काराने झाकता येण्यासारखे नव्हतेच; परंतु बाबा रामदेव यांना विवेक म्हणजे काय हेच समजले नसेल, तर त्यांना आनंद काय मिळणार? पुरस्काराने आनंद मिळेल म्हणून स्वामींनी विवेक बुद्धी जागवली नव्हती. ते फार मोठे आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते.पण, संन्याशांना हा पुरस्कार मिळाला पाहिजे, असे सुचवून बाबा रामदेव कदाचित आपलीच शिफारस करीत नाहीत ना, याचा विचार केला पाहिजे. ज्याप्रमाणे २०१४च्या निवडणुकीत बाबा रामदेव नरेंद्र मोदींची शिफारस करत होते, भाजपच्या पाठीशी राहत होते, तोच प्रकार आता काँग्रेसला जवळ करण्यासाठी ते करत नाहीत ना, असाही प्रश्न यातून पडतो. आपल्या पाठीशी, आपले फॉलोअर योगाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने आहेत, त्यांना आपल्याकडे वळवू शकतो. पण, मला पुढच्या वर्षी भारतरत्न द्या, असे तर रामदेव बाबांना सुचवायचे नाही ना? कारण, त्यांच्या अंगावर संन्याशाची वस्त्रे आहेत. पण, अशा राजकारणात त्या पुरस्कारांचा अवमान होत असतो, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पुरस्कारांचे राजकारण करून चर्चेत राहायचे आणि पुरस्कार जाहीर झालेल्यांना संकोच होईल असे वागणे, हे हीन राजकारण आहे. या देशासाठी बलिदान दिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भारतरत्न परत काढून घेतला जातो आणि त्यांचा अपमान होतो. पण, चंदा कोचरसारख्या लोकांबद्दल काही बोलायचे नाही, हा दुटप्पीपणाच नव्हे का?
गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९
पुरस्कारांचा अवमान
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा