२०१९च्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. सर्वच पक्ष आणि आघाडय़ांकडे जागावाटपाचे ढोल बडवले जात आहेत. यात काँग्रेस आणि भाजपला वाकवायला छोटे-मोठे पक्ष आतुर झाले असतानाच भाजप आणि शिवसेनेचे रंगलेले नाटक आणि या नाटकातील शिवसेनेची दुटप्पी भूमिका म्हणजे किळसवाणे राजकारणच म्हणावे लागेल. २०१९ मध्ये मोदी लाटेवर शिवसेनेला एवढी संख्या लोकसभेत नेता आली. नाही तर हाताच्या बोटावरही त्यांना खासदार निवडून आणता येणे शक्य नव्हते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला सोडून निवडणुका लढवणे म्हणजे आत्मघात आहे याची शिवसेना नेत्यांना जाणीव झाली आहे. पण पडलं तर नाक वर आहे आणि नाक कापलं तर अजून भोकं बाकी आहेत, अशी शिवसेनेची गत आहे. बिहारमध्ये भाजपने नितीशकुमारांशी आणि पासवानांशी तडजोड केली म्हणजे आपल्याशीही ते करतील, या भ्रमात शिवसेना असतानाच त्यांच्या मनात कुठेतरी एकप्रकारची भीती आहे. शिवसेनेला भाजपने ३१ जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे. आलात तर तुमच्याबरोबर, नाही तर तुमच्याशिवाय आम्ही निवडणुका लढवू शकतो हा सणसणीत इशारा चारच दिवसांपूर्वी भाजपने शिवसेनेला दिलेला आहे. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावणार नाही असे स्पष्ट सांगून शिवसेनेला भाजपने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे.त्यामुळे आता भाजपबरोबर समझोता करणे म्हणजे आपली शरणागती आहे, अशी भीती सेनेला वाटते आहे. त्यामुळे ताकद नसताना निम्म्या निम्म्या जागा मागायचे धोरण आखले आहे. पण इतके ताणून धरायचे नाही की पार फाटेल. पण मुळातच शिवसेनेचे हे वस्त्र इतके टाकाऊ आणि जुनाट झाले आहे की, ते आपोआपच फाटेल अशा अवस्थेत आहे. त्यामुळे भाजपने आपल्याला गोंजारले पाहिजे या अपेक्षेत सेना नेते वावरत आहेत. त्यामुळे एकीकडे स्वबळाची भाषा करायची आणि दुसरीकडे छुप्या बैठका घेत कसेही करून युती टिकवा म्हणून भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी संपर्क साधायचा असला दुटप्पीपणा सेनेकडून चालला आहे. मांजर जरी डोळे मिटून दूध पीत असली तरी जगाचे डोळे उघडे असतात याचे भान आज शिवसेनेला राहिलेले नाही. आपली ताकद आणि पत न ओळखता बेडक्या फुगवून दंड थोपटून कुस्ती खेळायला निघाले आहेत. पण जे फुगलेले दंड दिसत आहेत, त्यात भाजपच्या बेडक्या आहेत याचे विस्मरण सेनेला पडलेले दिसते. २०१९ ला भाजपबरोबर लोकसभेला युती होती म्हणून मोदी लाटेत इतके खासदार निवडून आले आहेत, याचे भान शिवसेनेला नाही. पण प्रत्यक्षात त्यांना लोकसभेला भाजपला सोडायचे नाही, कारण मतविभाजनाचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला, तर शिवसेनेची दाणादाण उडेल. या भीतीपोटी आम्ही तुमच्याबरोबर युती करू, पण राज्यात मुख्यमंत्री आमचा असेल, असे वचन द्या, असल्या पोरकट अटी शिवसेना भाजपला घालते आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण तर उद्धव ठाकरे. ज्यांनी कधी पालिकेची निवडणूकही लढवली नाही. ज्यांना कसलाही जनाधार नाही. ज्यांनी कधी कुठल्याही सभागृहात कसे कामकाज चालते याची माहिती घेतलेली नाही आणि कसलाही अनुभव नाही असा नेता म्हणे मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहतो. जगातला इतका महान विनोद दुसरा कोणताही नसेल. हे कशाच्या जोरावर? तर भाजपच्या जोरावर. म्हणजे एकीकडे स्वबळाची भाषा करायची आणि दुसरीकडे आम्हाला मुख्यमंत्रीपद दिलेत, तर आम्ही युती करू असे सांगायचे. हा दुटप्पीपणा अत्यंत हास्यास्पद आहे.त्यामुळेच छुप्या बैठका भाजप नेत्यांबरोबर घेऊन आम्ही युती तोडणार नाही, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे कानमंत्र सोडायचे आणि दुसरीकडे लवकरच भूकंप घडवणार, राजीनामे खिशात ठेवणार असली वक्तव्ये करणार. भाजपने ३१ जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे. तोपर्यंत नाही निर्णय घेतला तर शिवसेनेचे मंत्री १ फेब्रुवारीला राजीनामा देण्याचे धाडस करतील का? शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून बाहेर पडेल का? अशा परिस्थितीत फडणवीस सरकार अल्पमतात आले, तर काँग्रेसशी चुंबाचुंबी करून औट घटकेचे राज्य मिळवणार का? अशी कोणतीही शक्यता नसल्याने आणि स्वत:जवळ कोणताही अजंडा नसल्याने भाजपच्या नावाचा गजर करायचा आणि डबल ढोलकी वाजवायचा प्रकार शिवसेना करते आहे. शिवसेना वाजवत असलेली ढोलकी असली तरी त्याला मृदंग असल्याचे ते सांगत आहेत. म्हणूनच शिवसेना म्हणते की, मृदंग दोन्ही बाजूंनी वाजतो हे खरे, पण प्रत्येक थापेचा सूर वेगळा काढण्याची कला हिंदुत्ववादी मतदार सध्या अनुभवत आहेत. राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात कसा सुटणार आहे? मुळात न्यायालयाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय नाही.आज सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून शिवसेनेला राम मंदिर, हिंदुत्व हे मुद्दे आठवले आहेत. एकीकडे भाजपवर टीका करायची आणि दुसरीकडून राजीनामे फक्त खिशातच ठेवायचे, ते सादर करायचे नाहीत आणि आपण कसे वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. स्वबळाची भाषा करायची, भाजपला डिवचण्यासाठी राहुल गांधींच्या तोडातून बाहेर पडलेली उष्टी वाक्ये उच्चारायची आणि दुसरीकडे चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर अशा भाजपच्या नेत्यांशी गुप्त बैठका घेऊन तेवढे आम्हाला सावरून घ्या, म्हणून विनंती करायची. हा दोन्ही बाजूने येणा-या आवाजाला मृदंगाची थाप म्हणायची की, ढोलकीची ते मतदार ठरवतील. पण ज्या जाचक अटी घालून मुख्यमंत्रीपदाचा आग्रह शिवसेना धरते आहे त्यांचा १९९५ फॉर्म्युला राज्यात मान्य झालेला आहे. ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला राज्यात जुना आहे. तोच काँग्रेस-राष्ट्रवादीनेही स्वीकारला होता. त्या फॉम्र्युल्यात भाजपच्या वाटय़ाला ११७ आणि सेनेच्या वाटय़ाला १७१ जागा असूनही भाजप सेनेच्या बरोबरीने जागा जिंकत होते. निम्म्या जागांचा आग्रह भाजपने २०१४ ला धरला तेव्हा सेनेला भीती वाटली आणि युती तुटली. आता भाजप मोठा पक्ष झालेला असताना सेनेला मुख्यमंत्रीपद म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी गत आहे. त्यामुळे असला काहीतरी दुटप्पीपणा करण्याचे किळसवाणे राजकारण शिवसेना करताना दिसते आहे.
सोमवार, ७ जानेवारी, २०१९
दुटप्पी राजकारणाचा कळस
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा