शनिवार, २७ जानेवारी, २०१८

जागा दाखवून दिली

प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात राजपथावर जी पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती, तिथे राहुल गांधी यांना मागच्या रांगेत बसवण्यात आले होते. त्यामुळे अनेकांना विशेषत: मोदी विरोधकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. राहुल कॉग्रेसचे अध्यक्ष असल्याने त्या पक्षाच्या नेते समर्थकांना असा संताप येणे स्वाभाविकच आहे. पण हा उत्सव देशाचा होता, कॉंग्रेसचा नाही. पण त्यांच्याही पलिकडे राहुल गांधींना झाले नसेल एवढे दु:ख तथाकथीत पुरोगाम्यांना म्हणजे निखिल वागळे, कुमार केतकर, हेमंत देसाई अशा निरपेक्ष असे दाखवून कॉंग्रेसची भलावण करणार्‍यांना झाले. त्यामागेही अशा लोकांना मोदींचे किंवा अमित शहांचे काही कारस्थान आहे असेच वाटले. मुद्दाम राहुलना अपमानित करण्यासाठी असे वागवण्यात आल्याचा आरोप म्हणूनच झाला.
वास्तविक ज्यांना आपला सन्मान राखता येत नाही, त्यांचा कोणाला अपमान करावा लागत नसतो. मोदी सरकारने जाणिवपुर्वक राहुलचा अपमान करण्यासाठीच त्यांना मागच्या रांगेत बसवले हे मान्य केले तरी एक प्रश्न शिल्लक उरतोच. तो म्हणजे यापूर्वी सत्तेत असताना तरी स्वत: राहुलना कधी पहिल्या रांगेत येऊन बसण्याची हिंमत झाली आहे काय? त्यांना शक्य असलेल्या वेळी तरी त्यांनी पहिल्या रांगेत येऊन बसायचे धाडस कशाला केलेले नाही. मोदीपुर्व दहा वर्षे त्यांच्याच पक्षाच्या हाती देशाची सत्ता होती, त्या काळात राहुल कधी अशा सोहळ्यात पुढल्या पहिल्या रांगेत बसायला का प्रयत्नशील होते का? त्यामुळे ज्या गोष्टीचे दु:ख राहुल गांधींना झाले नसेल, किंवा जी गोष्ट राहुल गांधींच्या लक्षातही आली नसेल ती आणून देवून या पुरोगाम्यांना काय मिळालं? फक्त कॉंग्रेसच्या फुटकळ नेत्यांना तळतळायला लावण्या पलिकडे त्यांनी काय साधले?
कॉंग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाल्यावर पुढे येऊन संसदेतील पक्षनेतेपद राहुलनी स्विकारले असते, तर त्यांना लोकसभेतील पहिल्या रांगेत बसायची संधी मिळालीच असती. पण तिथे खरगे वा ज्योतिरादित्य शिंदे यांना बसवून राहुलनी मागल्या रांगेत आपली सोय लावून घेतलेली होती. त्यातूनच त्यांनी आपण पहिल्या रांगेतला नेता वा व्यक्ती नसल्याची प्रत्येक वेळी साक्ष दिलेली असताना या कार्यक्रमात त्यांना पहिल्या रांगेत बसवण्याचा प्रश्‍न येतोच कुठे?
२००४ सालपासून राहुल गांधी लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांनी एकदा तरी पुढाकार घेऊन कुठल्या विषयात नेतॄत्वाचे गुण प्रदर्शित केले आहेत काय? मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये कुठलेही एक जबाबदारीचे पद घेतले असते, तर तिथेच राहुलची कसोटी लागली असती. पण अशा प्रत्येक कसोटीच्या प्रसंगी पळ काढायचा व इतर कोणाला पुढे करायचे, ही राहुलनिती राहिली आहे. कधी सहाव्या तर कधी आठव्या रांगेत बसून जांभया देण्यात त्यांची संसदीय कारकिर्द खर्ची पडलेली आहे. कॉंग्रेसच्या लाचार कार्यकर्त्यांमुळे त्यांना पक्षाध्यक्ष पद मिळाले असले तरी त्यांची पात्रता पहिल्या रांगेतली आहे काय? प्रजासत्ताकच्या कार्यक्रमात जितकी मोठी जबाबदारी तितकी पुढली रांग व आसन मिळत असते. ते कोणाच्या कृपेने वा वशिल्याने मिळत नसते. तो तुमच्या हक्क असतो आणि हक्कासाठी लढावे लागत असते. आज राहुल पक्षाध्यक्ष आहेत. ते पद मिळवण्यासाठी तरी त्यांनी कुठली लढाई केली आहे? फ़क्त एका कुटुंबात जन्म घेण्यापेक्षा त्यांचे राजकीय योगदान काहीच नाही. वडिलार्जित जागी फ़क्त पुण्याई म्हणून लोकसभेत वर्णी लागलेली आहे. हे पक्षातले स्थान सार्वजनिक जीवनात सवलत म्हणून मिळू शकते.
 नरेंद्र मोदी आज पहिल्या क्रमांकाच्या स्थानावर बसलेत, ते त्यांनी मिळवलेले स्थान आहे. संसदेत निवडून येण्यासाठी त्यांनी गुजरातचा मुख्यमंत्री असतानाही उत्तरप्रदेशात वाराणशी या मतदारसंघात लढण्याची हिंमत केलेली होती. राहुल गांधी अमेठी, रायबरेली हे गांधी नेहरूंचे पारंपारीक मतदारसंघ सोडून दुसरीकडे उभे राहण्याचा विचार तरी करतील का? अशांनी रांगेचे आग्रह धरून चालत नाहीत. चार वर्षापुर्वी जिथे कॉग्रेसचे अधिवेशन भरलेले होते, त्या तालकटोरा स्टेडीयमच्या बाहेर मणिशंकर अय्यर म्हणाले होते, ‘वो चायवाला देशका प्रधानमंत्री कभी नही बन सकता. उसे अगर चाय बेचनी है, तो यहा आकर स्टॉल लगा सकता है.’ तेव्हा मोदींनी कॉग्रेस अधिवेशनात येण्यासाठी आमंत्रण मागितले नव्हते, की राहुल वा अय्यर यांच्या कृपेने कोणी देशाचा पंतप्रधान होत नसतो. तरीही जाणिवपुर्वक मोदींचा जाहिर अपमान करायची मस्ती कॉंग्रेसने केलेली होती. त्यांना ही चांगली अद्दल घडवली गेलेली आहे. राहुल गांधींच्या चौकडीच्या बाष्कळ बडबडीकडे काणाडोळा करून मोदींनी ते पंतप्रधानपद आपल्या हिंमतीने मिळवले. राहुल गांधी फक्त खासदार आहेत. दुसरे कोणतेही महत्वाचे पद त्यांच्याकडे नाही. त्यामुळे अन्य खासदारांप्रमाणेच त्यांना जी रांग मिळाली ती योग्यच होती. त्यांची जागा मोदींनी दाखवून दिली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: