मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

वैफल्यातून केलेले भाषण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने पक्षाच्या नव्या निवडी करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे केविलवाणे भाषण म्हणजे शिवसेना आता घटका मोजत आहे आणि अखेरची घटका मोजताना आवाज वाढतो तसा तो आवाज जाणवत होता. अत्यंत असंबद्ध आणि फालतू भाषण अशा शब्दातच या भाषणाचा वेध घ्यावा लागेल. त्यांच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ सांगणे म्हणजे फार मोठा प्रपंच होईल. म्हणून काहीच वक्तव्यांचा समाचार इथे घेत आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, ’देशात थापा मारण्याची लाट आली आहे. केवळ सत्तेसाठी भाषणं करून लोकांची फसवणूक केली जात आहे. गायीला मारणं जसं पाप आहे, तसं थापा मारणंही पाप ठरवलं पाहिजे. या देशात गोहत्याबंदीबरोबरच थापाबंदीही करा. थापा मारणं गुन्हा ठरवून अशा लोकांना तुरुंगात टाका,’ मग सर्वात प्रथम उद्धव ठाकरेंनाच तुरुंगात टाकावे लागेल. कारण डिसेंबर २०१७ च्या सत्तेतून बाहेर पडू अशी थाप त्यांनी काही दिवसांपूर्वी मारली होती. सरकारमधून बाहेर पडण्याच्या थापा किती वेळा मारल्या याची मोजमापच न केलेली बरी. त्यामुळे जे स्वत: थापा मारतात त्यांनी अशा कायद्याची मागणी करणे म्हणजे स्वत:लाच तुरूंगात टाका असे सांगण्याचा प्रकार आहे.उद्धव ठाकरे म्हणतात, ’हे सरकार केवळ जाहिरातबाजीवर चालणारं आहे. त्यामुळे हे जाहिरातबाज सरकार खाली खेचावच लागेल,’ सरकार खाली खेचण्यापूर्वी अगोदर सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस का दाखवत नाही? त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पोरकटपणाच समोर आला आहे. कदाचित आपण सरकारमध्ये आहोत हे त्यांना माहिती नसावे.उद्धव म्हणतात, सीमवेर जवान शहीद होत आहेत. तिकडे रक्ताचा सडा पसरला आहे. मात्र तरीही भाजप लाचार बनून काश्मीरमध्ये सत्तेची खुर्ची उबवत आहे. पण लाचारपणे केंद्रात मंत्रिपद मिळवणे, राज्यात सरकारमध्ये शिवसेना का राहीली आहे याचे उत्तर का देत नाहीत?उद्धव म्हणतात, सध्या चुकीची लोकं सत्तेत आली असून हे भेकड राज्यकर्ते आम्हाला मान्य नाहीत. मग या भेकडांच्या पंगतीत शिवसेनेचे वाघ शेळ्या मांजरासारखे का थांबले आहेत?  उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं. स्वबळावर निवडणुका लढवण्यापूर्वी आत्ता जे सरकारमध्ये राहुन फायदे उठवणे चालवले आहे ते कधी थांबवणार असा जनता सवाल करेल त्याचे उत्तर उद्धव ठाकरे यांचेकडे आहे का?  चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका करण्यासाठी उद्धव म्हणतात की, ’मी कोणत्याही भाषेचा द्वेषी नाही. मराठीचा जसा मला आदर आहे. तसाच मी कानडी भाषेचाही आदर करतो. मात्र कानडी भाषेचा आदर करत असलो तरी कानडी अत्याचाराचा निषेधच आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. कर्नाटकविषयी एवढच प्रेम आलं असेल तर चंद्रकांत पाटील यांना सांगतो की आताच दत्तक जा, आणि मग ‘कर नाटक’. अत्यंत सुमार आणि फालतू कोटी करून केलेली ही टिका आहे. आपण काय बरळतोय हे उद्धव ठाकरे यांना समजते काय? चंद्रकांत पाटील यांनी कानडी अत्याचाराची बाजू घेतल्याचे काय पुरावे आहेत? दुसर्‍या राज्यात जावून त्यांची भाषा बोलणे हे उत्तम लक्षण आहे. ठाकरेंना मुंबई पलिकडे कोणी ओळखत नाही म्हणून कानडीवर टिका करता का? उद्धव ठाकरे म्हणतात, महाराष्ट्राकडे शिवसेनेशिवाय पर्यायच नाही. पण हा पर्याय जनतेनेच २०१४ ला दिला आहे. भाजपला जागा वाटपात शंभरही जागा न देणार्‍या शिवसेनेच्या नाकावर टिच्चून भाजपने १२३ आमदार निवडून आणले. लोकसभेला शिवसेनेला जे १८ खासदारांचे यश लाभले ते मोदी लाटेमुळे. नाहीतर शिवसेना मावळसारख्या मतदारसंघात निवडून येणे शक्य तरी होती का? कसलाही अभ्यास न करता बोलणार्‍या नेत्यांना आता जनता जवळ करत नाही. त्यामुळे शिवसेनेला पर्यायच नाही, तर शिवसेनेची आता गरज नाही हच मतदारांनी तेव्हा दाखवून दिले आहे. केवळ आपल्या हातून एकेक सत्ता जात आहेत. सगळीकडे अपयश येत आहे, या वैफल्यातून केलेले भाषण असे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे वर्णन करावे लागेल. दोन दिवस अगोदर या निवडीत शिवसेना मनोहर जोशी, सुधीर जोशी यांचे नेतेपद काढून घेणार असे सांगितले जात होते. विविध वाहिन्यांवरूनही तशा बातम्या प्रसारित होत होत्या. पण या नेत्यांचे नेतेपद काढून घेण्याची हिम्मत त्यांना झाली नाही. कारण आज या नेत्यांमुळेही शिवसेनेकडे आदराने पाहिले जात आहे. हे नेते जनाधार असलेले नेते आहेत. उद्धव ठाकरे यांनी कधी पालिकेची निवडणूकही लढवलेली नाही. त्यांना जनाधार नाही तर ठाकरे या नावाचा आधार आहे. त्या आधारावर आपण किती बोलतो? काय बोलतो याचे भान सुटत चालले आहे. बेताल वक्तव्यामुळे आणि चुकीच्या लोकांच्या साथीमुळे राहुल गांधी कॉंग्रेसला अपयशाच्या खाईत नेत होते. तेच काम महाराष्ट्रात उद्धव ठाकरे करताना दिसतात. राहुल गांधी यांनी आपला पवित्रा बदलला आहे, उद्धव ठाकरे कधी बदलणार? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: