सोमवार, १५ जानेवारी, २०१८

या चिमण्यांनो परत फिरा रे...

महाराष्ट्रात आज कोणता राजकीय पक्ष प्रबळ आहे? असे विचारले तर कोणत्याही पक्षाचे नाव घेता येणार नाही. तरीही त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळे तो प्रबळ आहे असे वाटू शकते. पण १२३ आमदारसंख्येपर्यंत पोहोचलेल्या भाजपात कॉंग्रेस राष्ट्रवादीतून आलेले पटोलेंप्रमाणे बाहेर पडले तर भाजपची ही ओसरायला लागलेली सूज लक्षात येईल. त्यामुळे भाजपची सूज ओसरल्यावर कोण प्रबळ आणि पर्यायी राहील? तर दंड थोपटून जो आत्ताच पुढे येईल तो प्रबळ होईल. त्यामुळे गुजरातच्या अनपेक्षित यशानंतर राहुल गांधींनी महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसते आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या हाकेनंतर येत्या काही दिवसात महाराष्ट्रात उलथा पालथ होवू शकते. या झाडावरचे कावळे त्या झाडावर जातात त्या प्रमाणे पुन्हा काही नेते भाजप आणि अन्य पक्षांमधून कॉंग्रेसमध्ये येवू शकतात. त्याचप्रमाणे कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेल्यांना आमंत्रित केले जावू शकते.   २०१९च्या सावत्रिर्र्क निवडणुकीसाठी मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील २८८ विधानसभा मतदारसंघातील ‘वन टू वन’ सर्व्हे करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाच पथके रवाना केली आहेत. ही पाच पथके येत्या महिनाभरात आपला अहवाल राहुल गांधी यांना सादर करणार आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर महिनाभरात राहुल गांधींनी मुंबई लक्ष केल्याचे दिसते. कारण त्यांना महाराष्ट्र सर करायचा आहे. सध्या देशातील संख्याबळ आणि महत्व यानुसार तेच एक मोठे राज्य कॉंग्रेसला हात देवू शकते. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन मोठ्या राज्यांकडे बिल्कूलच संधी नसल्याने आता महाराष्ट्रातून दिल्लीच तख्त काबीज करण्याची रणनीती ते आखत आहेत. गुजरात निवडणुकीच्या यशानंतर कॉंग्रेसची ताकद वाढत चालली आहे, हे नाकारता येणार नाही. यावरून राहुल गांधी यांचे मार्गदर्शक अत्यंत चोख काम करीत आहेत हे दिसते. यात सध्या साडेतीन शिरोमणी नाहीत. हे म्हणजे दिग्विजयसिंग, कपिल सिब्बल, मणिशंकर अय्यर असे लोक लांब ठेवल्याने राहुल गांधी यांना स्वत:चा मेंदू वापरण्याची संधी मिळत असल्याचे दिसते आहे.  मोदी सरकारवर आसूड कसे ओढावेत, याचे मार्गदर्शन नव्या टीममधील लोक अत्यंत चाणाक्षपणे करीत आहेत. त्यामध्ये नाराज असलेल्या रा. स्व. संघाच्या जेष्ठ नेत्यांचाही सहभाग असल्याचे पुढे आले आहे. म्हणजे एक काळ असा होता की कॉंग्रेसला कोण हरवू शकतो तर कॉंग्रेसचे नेेतेच हरवू शकत होते. शरद पवारांनी तर असे राजकारण करण्यात हयात घालवली. पुण्यात आणि महाराष्ट्रात आपली डाळ शिजण्याकरीता पुण्यातील मातब्बरांना संपुष्टात आणण्याचे काम शरद पवारांनी केले होते. त्यामध्ये बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक, सुरेश कलमाडी यांच्यासह अन्य महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि एकेकाळच्या मुख्यमंत्र्यांना संपवण्याचे राजकारण हे शरद पवारांनी केले. जेंव्हा विरोधक सत्तेवर येतात तेंव्हा ती विरोधकांची ताकद असल्यासारखे दिसले तरी ती सूज असते. त्यामुळे आता भाजपची सूज उतरवण्यासाठी कॉंग्रेसमय भाजपची चाल खेळण्याचे तंत्र पुन्हा नव्याने येत आहे. त्यामुळे भाजपातील असंतुष्टांना गोळा करण्यात पुढचे काही दिवस जातील हे निश्‍चित.बिहारमध्ये भाजपला हरविण्यासाठी त्यावेळी शरद यादव व नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधीपक्ष एकत्र आले होते. गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोदी व अमित शहा यांचा पाडाव करण्यासाठी विरोधक एकत्र आले होते. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व इतर डावे पक्ष एकत्र येत आहेत. एवढेच नव्हे तर भाजपचे मित्रपक्ष असलेले शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनाही राहुल गांधींबरोबर गेल्यास आश्‍चर्य वाटायला नको. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि संजय राउत यांनी राहुल गांधींवर सातत्याने उधळलेली स्तुती सुमने ही त्याचीच साक्ष आहे. या सर्वांचे एकच लक्ष म्हणजे, भाजपला हटविणे. शिवसेना एकही मुद्दा सोडत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींच्या बंडाच्या आधारावरही उद्धव ठाकरे यांनी मोदींना अप्रत्यक्षपणे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे.महाराष्ट्रातील ‘कर्जमाफी’ आंदोलन दोन्ही कॉंग्रेसने एकत्रपणे चालविले. यापूर्वी शरद पवारांनी राहुल गांधींचे नेतृत्व मान्य केले नव्हते.  गुजरात निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली. आता शरद पवारही त्यांची स्तुती करण्यास मागे नाहीत. यापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी व इतर विरोधीपक्षांमधून भाजपकडे ‘इनकमिंग’ सुरू होते. त्या जोरावरच २०१४ च्या निवडणुकीत भाजपला १२२ जागा मिळाल्याने ते सत्तेवर आले. आता २०१८ मध्ये भाजपमधूनच कॉंग्रेसमध्ये जाण्याचे ‘आऊटगोईंग’ सुरू झाले आहे. त्यामुळे या चिमण्यांनो परत फिरा रे अशी साद घालायला राहुल गांधींनी सुरूवात केली असल्यास ते नवल नाही. ते त्यांच्या परिपक्व होत चाललेल्या राजकारणाचा भाग असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: