मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

घायल तोगडियांचा इन्कलाब कशासाठी?

प्रविण तोगडिया हे हिंदूत्ववादी संघटनांमध्ये सर्वाधिक भडक बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात. दोन दिवसांपूर्वी ते गायब झाल्याच्या बातम्या आल्या आणि ते शुद्ध हरपल्याने कुठेतरी बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना कोणीतरी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी त्यांनी त्याच इस्पितळातुन पत्रकारांशी संवाद साधला. आपला एनकौटर केला जाणार असल्याचे सांगून ते खूप भावनीक झाले. हा सगळा प्रकार एकदम फिल्मी आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात सनी देओलच घायल, नरसिंहा सारखे चित्रपट होते. किंवा इन्कलाब सारख्या चित्रपटात आपण गुन्हेगारांबरोबर काम करत आहोत हे माहित नसलेल्या अमिताभ प्रमाणे त्याची अवस्था झाली आहे का? त्यामुळे अभिमन्यू चक्रव्यूह में फस गया है तू असे म्हणत त्यांना रडावे लागले का असा प्रश्‍न पडतो आहे. या प्रकारामुळे त्यांना सर्व वाहिन्यांवर तात्काळ प्रसिद्धी मिळाली. वाहिन्यांना आणि वर्तमानपत्रांना सतत काहीतरी खाद्य, सनसनाटी हे हवंच असतं. त्यामुळे आजचा दिवस जाणार याचा आनंद सगळ्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. वास्तविक पाहता तोगडिया हे नेहमी पुरोगाम्यांच्या हल्ल्याचे केंद्र राहिले आहेत. त्यांना अटक करण्यापासून तुरूंगात डांबण्यासाठी प्रत्येक पुरोगामी संघटनेने मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे तोगडीया हे संघ परिवाराचे सदस्य आहेत. त्यांना विश्व हिंदू परिषदेने नेते मानले जाते. हिंदू संघटन करताना मुस्लिमांच्या विरोधात अतिशय कडवी भाषा बोलणारे म्हणून ते प्रसिद्धीच्या झोतामध्ये आले. गुजरात दंगल भडकली व मोदींना हटवण्याच्या मागणीने जोर धरला, तेव्हा तोगडीया चालतील काय, असाही डिवचणारा प्रश्न विचारला जात होता. असे तोगडिया आता अकस्मात कॉग्रेसला जवळचे वाटू लागले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असताना कोणीही भाजपा नेता त्यांना भेटायला इस्पितळात गेल्याचे कोणीही दाखवले नाही. पण तितक्याच अगत्याने पटेल समाजाचे नेते व कॉग्रेसचे हितचिंतक हार्दिक पटेल त्यांना भेटायला तातडीने पोहोचले. त्यापाठोपाठ कॉग्रेसचे गुजरातचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोधवाडीयाही इस्पितळात जाऊन पोहोचले. म्हणजे राहुल गांधींनी जे हिंदुत्वाचे रुप धारण केलेले होते त्याला आता फ़ळे येऊ लागली आहेत असे समजायला काही हरकत नाही.  अन्यथा प्रविण तोगडियांच्या प्रकृतीची चिंता कॉग्रेस नेत्यांना कशाला वाटली असती? आता हिंदू पुरोगामीत्व हळुहळू साकार होऊ लागल्याची ही चिन्हे आहेत असा अर्थ घ्यायचा का?  प्रविण तोगडियांनाही राहुल गांधींची कॉंग्रेस आपली वाटू लागली आहे असे दिसते. अन्यथा त्यांनी इस्पितळातून पत्रकार परिषद घेऊन ‘पुरोगामी हिंदुत्ववादी’ नेत्यांना कशाला आमंत्रण दिले असते? तोगडियांनी आपण का गायब होतो व मध्यंतरी काय घडले, त्याची कथा वाहिन्यांच्या कॅमेरासमोर कथन केली. त्यामुळे हिंदुत्ववादी कॉग्रेसला आपला तारणहार तात्काळ मिळाला, असे वाटले असल्यास शंका नाही. एका मंदिरात पूजा करीत असताना एक फ़ोन आला आणि गुजरात व राजस्थानचे पोलिस आपल्याला चकमकीत ठार मारण्यासाठी निघाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे फ़ोन बंद करून आपण मंदिरातून बाहेर पडलो आणि रिक्षाने निसटण्याचा प्रयत्न केला. वाटेत आपल्याला घाम आला व आपली शुद्ध हरपली, असे तोगडियांनी सांगितले. त्यांनी नाव घेऊन कोणावर आरोप केलेला नाही. पण त्यांचा रोख भाजपाचे नेते व पंतप्रधान मोदी यांच्याकडे असल्याचे स्पष्ट दिसते. कारण ज्या दोन राज्यातील पोलिस चकमक करणार असे तोगडिया म्हणतात, तिथे भाजपाचे राज्य असून सोहराबुद्दीन चकमकीत याच दोन राज्यातील पोलिसांना आरोपी बनवले गेलेले होते. त्यात भाजपाचे अध्यक्ष अमित शहांचेही नाव गोवले गेलेले आहे. सध्या गाजत असलेले न्या. लोया मृत्यू प्रकरणही त्याच चकमकी संबंधातले आहे. नेमक्या अशा वेळी तोगडियांनी त्याच दोन राज्यांच्या पोलिसांवर चकमकीचा आरोप ठेवावा हे विशेषच म्हणावे लागेल. मागल्या तीन वर्षापासून देशात इतरांचा आवाज दाबला जातो अशी तक्रार पुरोगामी करीतच आहेत. आता तोच आरोप विश्व हिंदू परिषदेचा नेता करतो.  देशाला हिंदूराष्ट्र बनवण्याचे कारस्थान राबवले जात असल्याची पुरोगामी तक्रार आहे आणि दुसरीकडे त्या़च कारस्थानाचा प्रचारक मानला जाणारा नेता तोगडिया आपलाही आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत आहे. याला नेमके काय म्हणता येईल? तोगडियांच्या मते देशातील यापुर्वीचे युपीएचे पुरोगामी सरकार त्यांचा आवाज दाबत नव्हते व हिंदूत्वाचा खुलेआम प्रचार करण्याची मोकळीक होती. यूपीए असताना तोगडीयांना सुरक्षित वाटत होते, तर त्यांनी २०१४ पुर्वी खुलेआम राजकीय मैदानात येऊन मोदी विरोधात दंड थोपटायला हवे होते. मग तसे का केले नाही? घायल होवून असे फिल्मी स्टाईल इन्कलाब होण्याचे कारण काय?  मोदी भाजपचे स्वरूप तोगडियांना माहिती होते तर त्यांनी गुजरात विधानसभेच्या प्रचारात तरी समोर येऊन, त्यांनी मोदी-शहांचा मुखवटा फ़ाडून टाकायला हवा होता. पण त्यांनी तसे का केले नाही हाच प्रश्‍न त्यांच्या आजच्या भूमिकेचे उत्तर देईल. हिंदुत्वाच्या नावावर चालणारे सरकार इतके दगाबाज असेल, तर त्यातल्या आरोपींची नावे लपवून तोगडिया लाखो हिंदू परिषद कार्यकर्त्यांची दिशाभूल करीत आहेत. तोगडियांचा बोलविता धनी कोणी आहे का? ते खरे बोलत आहेत का? या सगळ्याची तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: