मंगळवार, ९ जानेवारी, २०१८

साचलेल्या इतिहासाचा परिणाम

भीमा कोरेगांव दंगल भडकवल्याचे कारण शरद पवारांच्या नावावर अनेकजण खपवत आहेत. सातत्याने संशयाच्या भोवर्‍यात वावरून आणि रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा, गुंतून गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा अशी प्रतिमा निर्माण करण्यात शरद पवार गेली अनेक दशके यशस्वी झाले आहेत. तरीही कोणतीही दंगल, सरकार कोसळवणे अशा घटनांशी त्यांचा संबंध असावा असा संशय घेतला जातो. याचे कारण नरो वा कुंजरोवा अशा प्रकारे वक्तव्य करण्याची त्यांची प्रवृत्तीच याला कारणीभूत आहे. वास्तविक आज ज्यांचे वय देखील शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा कमी असेल, अशा लोकांनी या नेत्याबद्दल बोलताना असाच संशय घेणे ही एकप्रकारे पवारांच्या उतरत्या काळाला लागलेली साक्ष म्हणावी लागेल. कारण ही दंगल घडवूनही जेवढा फायदा मिळायचा तेव्हढा विरोधकांना मिळाला नाही. दंगलीमागे नेमके कोण आहेत हे समजल्यामुळे सामान्यांनी त्याला फारसे महत्व दिले नाही. महाराष्ट्राने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार, हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाने महाराष्ट्राला दिलेले दोन मोठे नेते. एकेकाळी लोकसभेपासून विधानसभेपर्यंत पवार यांनी आपली पुरोगामी प्रतिमा टिकवण्यासाठी भाजपावर ‘अर्धी चड्डी’ अशी टिका चालवली होती. अशा लोकांच्या हाती राज्याची सत्ता सोपवणार काय, असा सवाल थेट मतदाराला केला होता. पण आज संघाची फुल पँटही झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालचे सरकारही आले. त्यामुळे शरद पवारांना वैफल्यावस्था आली नसेल तरच नवल. अर्थात ती दाखवायची नाही आणि शेवटपर्यंत प्रयत्न करायचे हे त्यांचे धोरण असल्यामुळे ही अगतिकता दिसली नाही. पण या कालच्या घटनेेनेही त्यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप सोशल मिडीयातुन झाला याचा अर्थ त्यांचा राजकारणाला आजही धाक आहे हे दिसून येते. राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तेंव्हा अर्ध्या चड्डीतून बाहेर आलेल्य त्याच भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाठींबाही पवारच देऊन मोकळे झाले होते. हेच शरद पवारांचे न कळणारे राजकारण आहे. अर्थात त्यासाठी त्यांनी एक राजकीय तर्कशास्त्रही मांडले होते. राज्यात राजकीय अस्थीरता नको म्हणून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पक्षाला जनतेने दिलेले कौल मान्य करून आपण बिनशर्त पाठींबा देत आहोत, असे त्यांनी म्हटले होते. पण आपल्याच विधानावर खुद्द पवारांचा तरी कितीसा विश्वास होता? जोपर्यंत निकाल स्पष्ट झालेले नव्हते, तोपर्यंत भाजपाचे बहूमत हुकल्याचे पवारांना कसे उमगले होते? निकालाचे आकडेच स्पष्ट नसताना भाजपाच्या सोबत अन्य कुठलाच पक्ष नाही, म्हणून त्यांना सरकार बनवण्यात अडचण येणार, हे ओळखणारे पवार किती मुरब्बी राजकारणी आहेत हे भाजपला तेंव्हाच समजले होते.  शिवसेना भाजपच्या विरोधात असतानाच भाजपला अडचण येण्यापुर्वीच न मागितलेली मदत द्यायला धावण्याची ही धुर्त खेळी राज्याच्या स्थैर्यासाठी होती, यावर खुद्द पवार यांचा तरी विश्वास होता काय? त्यामुळेच पवारनिती म्हणूनच त्याकडे बघितले गेले आणि आता जी राजकीय अस्थीरता निर्माण झाली, त्याचे खापरही पवारांच्याच माथी मारले गेले. साहजिकच आजही फडणवीस सरकार पाच वर्ष कारभार करू नये म्हणून ते पाडण्याची जबाबदारी शरद पवारांशिवाय कोणीच पूर्णपणे घेवू शकत नाही. महाराष्ट्राला हे माहिती आहे. त्यामुळेच या दंगलीचे कारण शरद पवार असल्याचे सोशल मिडीयावरून बिनधास्त बोलले गेले.  भाजपला पाठींबा दिल्यानंतर दोनच महिन्यात सरकार चालवायचा मक्ता आपण घेतलेला नाही, असे धमकीवजा विधान अलिबाग येथील चिंतन शिबीरात त्यांनी केले होते. त्यामुळे बोलतील एक आणि करतील एक अशी शरद पवारांची जी प्रतिमा आहे तीच त्यांच्याकडे आज संशयाने पाहताना दिसते आहे.  अर्थात त्यांच्या अर्धशतकाच्या राजकीय वाटचालीत गाजवलेले कर्तृत्व बघितले. तर अकस्मात उलट्या टोकाला जाण्याइतक्या भूमिका सहजगत्या बदलून त्याला तत्वाचा मुलामा चढवण्यात पवार वाकबगार राहिले आहेत. त्यांच्या उमेदीच्या काळातले ज्येष्ठ राजकीय नेते व कार्यकर्ते साधेसरळ अब्रुदार होते. त्यामुळे बोललेले शब्द वा घेतलेल्या भूमिकांविषयी ठाम असायचे, व्यवहारी नुकसान सोसूनही आपल्या भूमिकेवर ठाम रहाण्याला नेतृत्व मानले जायचे. सोयीनुसार भूमिका बदलून त्याला तात्विक मुलामा चढवण्याला संधीसाधूपणा समजले जायचे. असल्या प्रथा परंपरांना शरद पवारांनी त्याच उमद्या कालखंडात बेधडक फ़ाटा दिला आणि केव्हाही संधी मिळेल तिथे स्वार्थाला तत्वांचा मुलामा चढवण्यात धन्यता मानली. त्यामुळे हाच त्यांचा इतिहास या घटनेने त्यांच्या नावाशी जोडला जात आहे. जुने साचलेले आता पुढे येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: