२०१८ या नववर्षात पदार्पण करताना दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता रजनीकांत आपला नवा पक्ष घेवून येताना दिसतो आहे. त्याच्या स्टाईलीश हालचाली आणि संवादांप्रमाणेच भविष्यात त्याच्या पक्षाची वाटचाल असेल. सतत तोंडात सिगारेट धरून फायटींग करणारी त्याची स्टाईल असंख्य चित्रपटातून दिसून आली. गिरफ्तार चित्रपटात ती विशेष जाणवली. कारण त्याला जीपला धरून जाळून मारले तरी त्याच्या तोंडातील सिगारेटचा धूर येत होता. हा असला चमत्कार दाक्षिणात्य निर्माताच दाखवू शकतो आणि रजनीकांतलाच तो शोभतो. एरवी असले प्रकार कोणी करणे शक्य नाही. त्यामुळे राजकारणात आल्यावर रजनीकांत कशा उड्या मारतात आणि २०१८ मध्ये आणि त्यानंतर होणार्या लोकसभा निवडणुकीत रजनीकांत यांचा कसा प्रभाव राहतो हे पाहणे २०१८ चे मनोरंजन असेल.लोकशाहीत जनमत प्रभावी ठरते हे तांत्रिक दृष्ट्या खरे असले तरी अनेकदा खांदेपालट घडवुन आणण्यापलीकडे ते यशस्वी ठरतेच असे नाही. जनमत हवे तसे बदलवण्याची, ते बदलेल अशा घटना घडवण्यात अथवा वक्तव्ये करण्यात किंवा प्रसंगी मते विकत घेत सत्तेत येण्याची कला राजकारणी व्यक्तींनी साधलेली असते. हे ज्याला जमते तो यात यशस्वी होतो. चित्रपटात दीर्घकाळ काम केल्यानंतर रजनीकांत यांना हे समजले असेल यात शंकाच नाही. त्यामुळे जनमताची त्यांना फारशी पर्वा असेलच असे नाही. देश राज्य-घटनेप्रमाणे चालेल असा विश्वास लोकांना असला तरी घटनात्मक तरतुदींनुसारच अनेकदा अन्याय्य कायदेही केले जातात अथवा करण्याचे टाळले जाते. भारताचा क्रमांक जगात लोकसंख्या वगळता सर्वच बाबतीत तळाला किंवा कोठेतरी मध्याला लागत असला आणि कणभर जरी बढती मिळाली की त्याचेच ढोल एवढे वाजू लागतात. त्यामुळे घसरण झालेल्या बाबी आपोआप दुर्लक्षित राहतात. मुलांच्या कुपोषणात आपण पार खाली, म्हणजे ११९ देशांच्या यादीत शंभराव्या स्थानावर असुन आपल्या देशातील उपासमार ही सध्या जगातील हुकुमशहा म्हणून ओळखल्या जाणार्या उत्तर कोरीयातील उपासमारीच्या इंडेक्सपेक्षा ७ पायर्यांनी खालचे आहे. देशातील कुपोषणाची समस्या वाढत असतांना आम्ही देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे असे कोणत्या पायावर म्हणतो याचाही विचार करण्याची आवश्यकता आम्हाला भासत नाही. कारण आमचे राजकारण आणि सत्ताकेंद्र ही सेलीब्रेटींनी व्यापलेली असतात. राजकारणावर जोपर्यंत रूपेरी पडद्याचा प्रभाव आहे तोपर्यंत स्वप्न दाखवणारे राजकारणी यशस्वी होत राहतील. तिथे विचारवंताना काडीमात्र अधिकार असणार नाही. कारण सत्तेत येवून किंवा लोकप्रतिनिधीत्व करून अभिनेते नेते बनतात आणि लंबे चौडे डायलॉग बोलणारे सत्ताधिशांपुढे गप्प रहातात. त्यामुळेच मागच्या महिन्यात कमल हसनची राजकीय एंट्री होणार अशी चर्चा असतानाच आज झालेली रजनीकांतची एंट्री ही पण फारशी दखल घेण्यासारखी ठरणार नाही. याचे कारण अभिनेत्यांची भाषणे, त्यांच्या सभा हे लोक पहायला येतात. ऐकायला येत नाहीत. त्याकडे मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते. त्यांना विचारवंत कोणी मानत नाही. विचारवंत अभिनेता नेता म्हणजे एकतर पुरोगामी असतो किंवा बॉक्स ऑफीसवर आदळलेल्या कलात्मक चित्रपटाप्रमाणे असतो. त्यामुळे मुंडी हालवणारे अभिनेते नेते बनणे हे मक्तेदारी राजकारणाला पोषक ठरते.म्हणजे ही व्यवस्था सुधारावी, लोक अधिक सबळ व्हावेत व आर्थिक प्रगतीचे वितरण सर्व लोकसंख्येत व्हावे यासाठी जी लोकशाही आहे तिचे यात काय होते हा प्रश्न कोणीच विचारायचा नाही. कारण तो कोणाला विचारायचा हाच प्रश्न आहे. त्याचे उत्तर कोणाकडे असेल हे त्याहून अनाकलनीय असेल. लोकशाहीचे दोष मान्य केले तरी सत्तेवर विवेकी विचारवंतांचा नि:पक्षपाती नैतिक दबाव असावा. की ज्यायोगे सत्ताधारी डोके ताळ्यावर ठेवून निर्णय घेतील व सक्षम व न्याय्य अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतील. आपल्या देशात हे कधी होत होते काय हा प्रश्न निरुपयोगी ठरावा अशी स्थिती आहेच. किंबहुना उथळपणाचा उद्रेक या विचारी पण आपापल्या गटांत वाटल्या गेलेल्या विद्वानांमध्येही झालेला असुन त्यांचा राजसत्तेवरील प्रभाव ओसरलेला आहे असे चित्र आपल्याला दिसेल. लोकांवर प्रभाव टाकत त्यांनाही विचारे बनवायची म्हणून जी जबाबदारी विचारवंतांवर असते तीसुद्धा आज कोणी पाळते आहे असे दिसत नाही. किंबहुना भारतीय समाजव्यवस्थेचे जे नव्याने मुलगामी आकलन करत नवी ध्येये निर्माण करण्याचे कार्य व्हायला हवे होते ते तर दुरच पण अजुनही स्वातंत्र्योत्तर काळात देशासमोरची जी आव्हाने होती व त्यावर तत्कालिक स्थितीत जी उत्तरे शोधली गेली होती त्या उत्तरांवरच आजही आमची मदार आहे असे आपल्याला दिसुन येईल. त्यामुळे ७० वर्षानंतरही राजकारण हे जुन्या चित्रपटांचा रिमेक करणारे आहे. त्यामुळे जुने अभिनेते नेते बनून जातात आणि नवे अभिनेते नेते बनायला येतात हे चित्र दिसत राहणार.
मंगळवार, ९ जानेवारी, २०१८
अभिनेते नेते
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा