मंगळवार, ९ जानेवारी, २०१८

वास्तव

गेली काही वर्षे आपल्याकडे समाजाचे जे विघटकीकरण सुरू आहे त्याचाच परिणाम म्हणून समाजातील प्रत्येक समूहास आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवून देण्याची गरज वाटू लागली आहे. या विघटकीकरणाचे मूळ आहे निवडक विकासवादात. या निवडक विकासवादास कोण जबाबदार, कोणत्या राजकीय पक्षाचे किती चूक किती बरोबर वगैरे मुद्यांची चर्चा करण्याची ही वेळ नाही. तेव्हा आधी भीमा कोरेगाव संघर्ष आणि त्याचे परिणाम नेमके काय आहेत हे पहावे लागेल.काल परवापर्यंत भीमा कोरेगाव आणि तेथील विजयस्तंभ यांची पुणे जिल्ह्याबाहेर फार कोणास जाणीवदेखील नव्हती. अर्थात भीमा कोरेगावची लढाई हा तितका चर्चेचा विषय नव्हता. या लढाईत दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचा इंग्रजांनी पराभव केला. पेशवे यांचे सैन्यबळ इंग्रजांच्या तुलनेत मोठे होते. तरीही ते हरले. अत्यल्प संख्याबळ असूनही इंग्रजांना विजय मिळाला याचे कारण त्यावेळी इंग्रजांच्या वतीने लढणार्‍या दलितांचे शौर्य, इतकीच ही कहाणी. ती घडली १ जानेवारी १८१८ या दिवशी. परंतु तिचे राजकीय महत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली त्या स्थळास भेट देईपर्यंत जाणवले नव्हते. हेच वर्ष हे महाड सत्याग्रहाचे वर्ष. त्या सत्याग्रहापूर्वी भीमा कोरेगावास भेट द्यावी असे बाबासाहेबांना वाटले ही बाब सूचक होती. बरेच काही सांगून जाणारी होती. प्रत्येक समाजास स्वाभिमानाचा टिळा लावण्यासाठी काहीतरी इतिहास, घटना हवी असते. तो इतिहासातील दाखला देवूनच प्रत्येक समाज स्वत:चे मोठेपण सांगत असतो. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या शोषित, उपेक्षित आयुष्यच जगलेल्या दलितांना इतिहासातील त्यांच्या शौर्यकथेची गरज वाटली असल्यास नवल नाही. ही शौर्यकथा बाबासाहेबांनी त्यांना शोधून दिली. तेव्हापासून या स्थानास महत्त्व आले.परंतु अलीकडच्या काळात हे राजकारण भलतीकडेच भरकटले. बाबासाहेबांनीच स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची झालेली अनेक शकले हेच दाखवून देतात. तेव्हा अशा कणाहीन नेतृत्वास आधी कॉंग्रेसने आणि नंतर भाजपने आपल्या पदराखाली घेऊन निष्प्रभ केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाने चालणार्‍या सरकारात रामदास आठवले यांचा समावेश नेमके काय सांगतो? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेवून आठवले भाजपची साथ देतात. याचा अर्थ भाजप आणि मोदी सरकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालले आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ठरतो. त्यामुळे ही झालेली एकी विरोधकांना नेस्तनाबूत करणारी ठरली असेल तर त्यांनी एखादे अघोरी अस्त्र उपसले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.  भाजपात भगवे झालेल्या आठवलेंमुळे रिपब्लिकन तेज पुन्हा स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करू लागली. भीमा कोरेगाव संघर्षांच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व कसे उठून उभे राहाते, हे देखील समजून घेता येते. कालचा बंद हा शंभर टक्के यशस्वी आणि रिपब्लिकन ताकद दाखवून देणारा आहे. गेल्या कित्येक वर्षात ही ताकद दाखवणे या पक्षांना शक्य झाले नव्हते हे कालच्या घटनेवरून लक्षात आले असेल.२०१४ मध्ये केंद्र आणि राज्यात झालेला भारतीय जनता पक्षाचा उदय हा दलितांच्या जखमांवर निश्चितच मीठ चोळणारा ठरला. हाती सत्ता नाही, विकासाच्या प्रक्रियेत आणि शहरकेंद्रित विकासात काहीही स्थान नाही. संपुष्टात आलेल्या रोजगाराच्या संधी या वातावरणात दलित समाजातील खदखद वाढत गेली. म्हणूनच ब्राह्मणी वर्चस्वाचे प्रतीक असलेल्या पेशव्यांच्या पराभवाची आठवण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ब्राह्मण असताना नव्याने काढली जाते आहे. वर्षानुवर्षे असलेली सत्तेवरची मक्तेदारी गेल्यानंतरच मराठा आंदोलन पेटले. दशकानुदशके मराठा मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाची आठवण कोणाला झाली नाही. मग मराठा नेत्यांनी काय केले? बिगर मराठा नेतृत्व महाराष्ट्रात आल्यावरच हे आंदोलन का केले गेले? याचा विचार केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्रीपदी फडणवीस असल्याने भीमा कोरेगाव संघर्षांच्या स्मृती तीव्र झाल्या, या दोन्हींमागचे कारण एकच आहे. त्यामुळे याचा अर्थ एकच राजकारणाबाहेर सगळ्या जाती धर्माचे लोक एकीने गुण्या गोविंदाने रहात असतात. त्यांच्यात बेटी रोटी व्यवहार असतो. मांडीला मांडी लावून काम करत असताना आपल्या शेजारी कोणी अन्य जातीचा आहे अशी शंकाही मनात येत नाही. फक्त सत्तेची सूत्र आपल्या माणसाच्या हातात असली की सगळं काही चांगलं चाललं आहे असे प्रत्येकाला वाटतं. तसं कोण मुख्यमंत्री आहे याने सामान्य माणसाला काहीही फरक पडत नसतो. फडणवीस आले म्हणून ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले नाही की त्यांना नोकर्‍यांच्या सुकाळ झाला नाही. यशवंतराव ते विलासराव व्हाया पवार, अशोकराव, पृथ्वीराज चव्हाण होते म्हणून मराठ्यांना खूप फायदा झाला असे नाही. किंवा बिगरमराठा सुशीलकुमार, सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक, अंतुले आदी नेते झाले म्हणून बिगर मराठा ब्राह्मण समाजाचे खूप भले झाले असे नाही. त्यामुळे जातीचे राजकारण सोडून राज्याच्या नेत्याकडे, सरकारकडे पाहणे गरजेचे आहे. नसेल पटत तर खाली खेचा पण जातीय तेढ वाढवून देशाचा विकास कधीच होणार नाही हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: