काल राज्यातील युती - आघाडी सरकारला वर्ष पूर्ण झाले. युती आणि आघाडी असा उल्लेख करण्याचे कारण सुरवातीला राष्ट्रवादीचा पाठिंबा घेवून बहुमत सिद्ध केलेले आणि सव्वा महिन्याने शिवसेनेशी पुन्हा घरोबा करून आपला मंत्रिमंडळाचा विस्तार करून तरलेले हे ना धड युतीच्या ना धड आघाडीच्या विचाराचे सरकार आहे. वानखेडे स्टेडियमवर फडणवीस आणि त्यांच्या मंडळाने गेल्यावर्षी अभूतपूर्व सोहळा साजरा करुन शपथ घेतली. ही शपथ घेताना त्यांच्यासोबत शिवसेना नव्हती. केवळ १२३ एवढ्या अल्पमतावर राज्यपालांनी भाजपाला सत्तेत येण्याचे आमंत्रण दिले. त्यामुळे सरकार बनले. तेव्हा २२ आमदार त्यांना कमी पडले होते. १२३ या संख्येवरच सरकार बनले. पण या १२३ आमदारांमध्ये २७ आमदार हे आयात केलेले आहेत. त्यामुळे हे सरकार भाजपचे का म्हणावे असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. हे सरकार भाजपच्या नावाखाली संधीसाधूंचे सरकार आहे असेच म्हणावे लागेल.भाजपमध्ये असलेल्या या २७ संधीसाधूंमध्ये राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपामध्ये घुसून आमदार झालेले १६ नेते आहेत. कॉंग्रेस सोडून भाजपात जाऊन आमदारपद मिळवणारे ११ संधीसाधू आहेत. त्यामुळे फडणवीसांचे नुसते अल्पमताचे सरकार नव्हते, तर ते सोयीचे सरकार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात सोय ही या पक्ष आणि नेत्यांची, सामान्य माणसांची गैरसोयच. या सरकारमध्ये मूळचे भाजपाचे असलेले फक्त ९६ आमदार त्यांच्या पक्षात आहेत. आजही ते ९६ आमदार भाजपाचे म्हणून आहेत. परंतु या ९६ ओरिजनल आणि निष्ठावंतांमध्येही प्रचंड असंतोष आणि खदखद आहे. गेल्यावर्षी सत्तेत येऊन बसल्यानंतर सुरवातीला राष्ट्रवादी आमदारांच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यावर उभारलेले सरकार म्हणजे ‘लिव्ह ऍण्ड रिलेशनशिपचा’ नमुना होता. आता कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही जो काही परस्परांवर सेना भाजपने हल्लाबोल केला आहे त्यामुळे सेना भाजपचे सरकारही लिव्ह ऍड रिलेशनशिपचे सरकार आहे, हेच दिसून येते. एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे केलेले नाटक आणि त्यांची पक्षप्रमुखांनी काढलेली समजूत हा राजकीय विनोद झाला आहे. भांडा पण नांदा हे तत्व घेवून हे सरकार चालवले जात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात ज्या राष्ट्रवादी पक्षावर सडकून टीका केली, त्यांच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली, त्यांचाच पाठिंबा घेऊन सरकार चालवल्यामुळे भाजपाने सत्तेसाठी बेशरमपणा केला अशी जोरदार टीका गेल्यावर्षी झाली. तिकडे सत्तेत नसलेली शिवसेनाही काकुळतीला आली होती. मग शिवसेनेला सत्तेत वाटा द्यायचा निर्णय झाला. शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचे नाटक केले होते. पण त्याचे सारे लक्ष कधी एकदा सत्तेत बसतो, याकडेच होते. सत्तेला शिवसेना चटावली आहे, वखवखलेली आहे हे भाजपने ओळखून बरोबर ताटाखालचे मांजर बनवण्याचा प्रकार फडणवीस सरकारने केला आणि सेनेला मिंधे करून घेतले. त्यामुळे साखळीला बांधून ठेवलेले पाळीव कुत्रे जसे आपल्याला चावण्याची शक्यता नसते आणि त्याच्या भुंकण्याला घाबरण्याचीही गरज नसते अगदी त्याप्रमाणे भाजपने शिवसेनेला मनसोक्त टिका करण्यास परवानगी दिली आहे. उपमुख्यमंत्रीपद, गृहखाते अशी महत्त्वाची खाती मिळावीत म्हणून वासावर असलेल्या सेनेला भाजपने लांब ठेवले आणि सरकारमध्ये गेल्यावर आपल्या मर्जीची कमी महत्त्वाची खाती दिली. पाच कॅबिनेट, पाच राज्यमंत्री अशी लाचारीची तडजोड करून सेना सत्तेत आली. पण गेल्या दहा महिन्यांत या दोन्ही पक्षांची तोंडे विरुद्ध दिशांनाच राहिली. विनोदाचा भाग म्हणजे आता शिवसेना भाजपाला सांगत आहे की, ‘सत्तेतून बाहेर पडा’ . भाजपच्या सरकारमध्ये लाचारीने घुसायचे आणि त्यांनाच सरकारमधून बाहेर पडा म्हणायचे. सगळ्यात मोठा विनोद म्हणजे यातील कोणीही सत्तेतून बाहेर पडत नाहीत आणि पडणारही नाहीत. कारण या लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका राष्ट्रवादीची असावी असेच दिसते. जोपयर्र्ंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या मनात येत नाही तोपयर्र्ंत कोणालाही हे सरकार पाडणे शक्य होणार नाही. त्यामुळे आधी बाहेरून पाठिंबा देणार्या राष्ट्रवादीच्या हातात या सरकारचा रिमोट आहे. त्यामुळेच परस्परांशी भांडणारे सेना भाजप हे दोन्ही पक्ष आतून राष्ट्रवादीशी गोड संबंध ठेवून आहेत.असले विचित्र सरकार यापूर्वी महाराष्ट्रात कधीही नव्हते. पुलोदचा प्रयोग १९८० साली झाला होता तेव्हा ते सर्वात उत्तम असे सरकार होते असे म्हणावे लागेल. यापूर्वी असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये भांडणे नव्हती असे नाही. पण सत्तेत एकत्र बसण्याच्या मर्यादा दोघांनाही माहीत होत्या आणि त्यांनी ते मान्य केल्या होत्या. पण शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एवढे पोरकट वागत आहेत की, यांना राजकीय परिपक्वता म्हणतात तशी ती कुठेच दिसत नाही. युतीचे सरकार असूनही वर्षपूर्तीचा सोहळा एकटा भाजपा साजरा करत आहे. मग हे सरकारमध्ये कशाला घुसले? ही लिव्ह अँड रिलेशनशिप मोडून टाका ना. अशा सरकारकडून कसे होणार जनहिताचे निर्णय? यांच्या भांडणाचा तमाशा पाहून जनतेने कमरमणूक करून घ्यायची काय? कांदा, तूरडाळ आणि जिवनावश्यक वस्तुंच्या भाववाढीबद्दल कोणीच कसे बोलत नाही? ही सगळी सर्वसामान्यांची थट्टा आहे. लिव्ह अँड रिलेशनशिपच्या सौद्यात ज्याप्रमाणे अपत्यप्राप्तीच्या आशा नसतात तसेच या सरकारकडून काही घडेल असे वाटत नाही.
रविवार, १ नोव्हेंबर, २०१५
लिव्ह अँड रिलेशनशिपचे सरकार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा