मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

कर्मयोगाची शिकवण देणारे श्रीगुरूनानक साहेब

एक ओंकार सतिनाम, करता पुरखु निरभऊ्|
निरबैर, अकाल मूरति, अजूनी, सैभं गुर प्रसादि |्|

   आज श्रीगुरूनानक साहेब यांची जयंती आहे. श्रीगुरू नानक हे शीखांचे धर्मगुरू म्हणून ओळखले जात असले तरी त्यांची शिकवण ही सर्व धर्मियांनाच मार्गदर्शक आहे. नानकसाहेबांना गुरू म्हणूनच सर्वत्र उल्लेख करतात तो यासाठीच. शीख धर्माची जरी स्थापना त्यांनी केलेली असली तरी सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करत, न्यायबुद्धीने आणि समानतेने जगण्याची शिकवण देण्याचे काम श्रीगुरूनानक देव यांनी केले. कर्मावर आणि कर्तव्यावर श्रद्धा ठेवून आपले कर्म प्रामाणिकपणे करण्याची शिकवण देणारे संत श्री गुरुनानक देव हे खर्‍या अर्थाने कर्मयोगाची शिकवण देणारे गुरू होते.
  शीख धर्माची स्थापना गुरू नानक यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये केली. तेव्हाचा पंजाबचा बराचसा भाग हा आजच्या पाकीस्तानातही आहे. आज संपूर्ण जगभरात सुमारे दोन कोटी शीख राहतात. त्यातील बहुतांश पंजाबमध्ये राहतात. ब्रिटनमध्येही जवळपास पाच लाख शीख वास्तव्य करतात. शीख हा जगातला पाचवा सर्वांत मोठा धर्म आहे.
 गुरू ग्रंथसाहिब हा शीखांचा धर्मग्रंथ आहे. शीखांचे एकूण दहा गुरू आहेत. त्यातील पहिले गुरू म्हणजे श्री नानक देव. त्यांच्यानंतर नऊ गुरू झाले. दहावे गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की माझ्या मृत्यूनंतर गुरू ग्रंथ साहिबा यालाच आपले गुरू माना व त्यात सांगितल्याप्रमाणे आचरण करा. त्यामुळे पुढे गुरूंची परंपरा बंद झाली. या धर्माची विचारधारेची स्थापना श्रीगुरूनानक साहेबदेव यांनी केली.
    शीख हा शब्द मुळ संस्कृतमधुन आला आहे. त्याचा अर्थ होतो शिष्य. शीख हे एकेश्वरवादी आहेत. ते देवाला वाहे गुरू म्हणतात. तो अकाल व निरंकार आहे असे ते मानतात. धार्मिक कार्य करत बसण्यापेक्षा चांगले कृत्य करण्याला ते प्राधान्य देतात. ही सगळी शिकवण गुरू नानक देव यांची आहे. सेवाभाव आणि प्रेमभाव, निष्ठा आणि ध्येयप्राप्ती ही या शिकवणीची वैशिष्ठ्ये आहेत.
   शीख बांधव हे पूजेसाठी गुरुद्वारात जातात. दिवाळी, बैसाखी, गुरूपर्व हे सण शीख बांधव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. अमृतसर येथील सुवर्णमंदिर हे शीखांचे पवित्र धर्मस्थळ आहे.
     महाराष्ट्रातील संत नामदेव भारतभर यात्रेसाठी फिरत असताना पंजाबात गेले होते. त्यांनी तेथे दिलेली प्रवचने नंतर ’गुरू ग्रंथसाहिब’चा भाग बनली आहेत. सर्वसमावेशक विचार देणारा असा हा धर्म आहे. भेदभावाला या धर्मात थारा नाही. सर्वांकडे समान दृष्टीने पाहण्याची शिकवण धर्मस्थापनेच्या वेळीच गुरू नानकसाहेबांनी दिली होती.
शीख धर्माची शिकवण ही खर्‍या अर्थाने सर्व जगाला मार्गदर्शक अशी आहे. या शिकवणुकीचा, विचारधारेचा पाया गुरूनानक देव यांनी घातला. गुरू नानक देव नेहमी म्हणत की , देवाला आपल्या हृदयात ठेवा. माणसांमधील, प्राणीमात्रांमधील देवाचे दर्शन घ्या. त्यामुळेच कोणी उपाशीपोटी राहिलेले, कोणी दु:खी पाहिले की गुरू नानकदेव यांना वाईट वाटायचे. त्याचे दु:ख दूर करण्यासाठी गुरूनानक देव आपले सर्वस्व देवून टाकायचे. महाराष्ट्रातील संत तुकारामांनी आपली घरची सावकारी, दुकानदारी ही गोरगरीबांसाठी खर्ची केली. तोच प्रकार पंजाबमध्ये त्याअगोदर श्री गुरुनानक देव यांनी केला होता. आपल्या वडिलांनी दिलेली दुकान सांभाळायची जबाबदारी त्यांनी विचारात न घेता दुकानातील सर्व चिजवस्तू गोरगरीबांना वाटून टाकल्या होत्या.
   पण आपण वाटून कोणाला कुठपर्यंत पुरणार आहे? असा प्रश्‍न त्यांना नेहमी पडायचा. कोणी देतो आहे म्हणून माणसाने याचक बनता कामा नये. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही वृत्ती माणसाने सोडली पाहिजे.  परमेश्‍वराने प्रत्येक प्राण्याला काही ना काहीतरी दिले आहे. त्या दिलेल्या गोष्टीची जाणिव प्रत्येक प्राण्यास असते. मुके प्राणीही आपले अन्न आपण मिळवतात. माणसालाही परमेश्‍वराने बरेच काही दिले आहे. पण त्याची जाणिव त्याला झालेली नाही काय? असा प्रश्‍न गुरू नानकांना पडत असे. त्यामुळे त्यांनी आपल्या दोह्यांमधून, श्लोकांमधून मार्गदर्शन केले आहे. नेहमी प्रामाणिकपणे जगा आणि भरपूर कष्ट करा. कष्ट करणार्‍या आणि प्रामाणिकपणे जगणार्‍या माणसाच्या पाठीशीच देव असतो. आळसाने आपले कर्तव्य न करणार्‍या माणसाला ईश्‍वराची साथ लाभत नाही. म्हणून त्यांनी कष्टसाध्य सर्व आहे, ते साध्य करण्याची शिकवण माणसांना दिली.

पवणु गुरु पानी पिता माता धरति महतु|
दिवस रात दुई दाई दाइआ खेले सगलु जगतु ॥

 वारा, पाणी, माती, अग्नी अशा पंचमहाभुतांपासून सगळे जन्माला आलेले आहेत. हेच सर्वांचे मातापिता आहेत. मग माणसांमाणसांत भेदभाव तो काहीच उरत नाही. गुरूनानक देव हे समानतेने वागणारे आणि समतेचे तत्वज्ञान पसरवणारे संत होते. कोणत्याही भेदभावाला थारा न देता सर्वांशी समान वागा अशी त्यांची शिकवण होती. आपल्याला जे उत्पन्न मिळते त्यातील काही भाग हा समाजाच्या सेवेसाठी देण्याची जबाबदारी आपली आहे. ही सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारे धर्मगुरू अशी श्री नानक देवांची ओळख आहे. शक्य तितकी दुसर्‍यांची सेवा करावी, अनाथ, अपंग, वृद्ध आणि वडीलधार्‍या माणसांशी प्रेमाने वागावे. त्यांची सेवा करावी. शक्य तितके अन्नदान करावे. अन्नदान करून गोरगरीब सर्वांना तृप्त करावे ही नानक साहेबांची शिकवण होती. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी लंगर सुरू करण्याचे काम नानक साहेबांनी केले.  

दीन दयाल सदा दु:ख-भंजन, ता सिउ रुचि न बढाई्|

नानक कहत जगत सभ मिथिआ, ज्यों सुपना रैनाई्॥

    गुरू नानक देव यांनी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण म्हणजे श्रीमत भगवत गीतेतील कर्मयोग आहे. माणसाने आपले कर्म करत राहिले पाहिजे. आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळतेच यावर विश्‍वास ठेवावा. पण नशिबाला दोष देत किंवा दैवावर जास्त विश्वास ठेऊ नका, तर कर्तव्य बजावून आपले नशिब घडवा अशी शिकवण गुरूनानक साहेबांनी दिलेली होती. या शिकवणुकीनुसार चाललेला कधीच अपयशी होत
नाही. हा नानक साहेबांचा आशीर्वाद आहे. श्री गुरूनानकांनी म्हटले आहे की, 
कर्मभूमीपर फल के लिये श्रम सबको करना पडता है| रब सीर्फ लकीरे देता है, उसमे रंग हमे भरना पडता है| 
श्री गुरूनानक देव यांनी स्थापन केलेेल्या शीख धर्मात १० गुरू होऊन गेले. त्यांच्या जन्मदिनी गुरूपर्व साजरा केला जातो. विशेषतः गुरू नानक, गुरू गोविंदसिंग, गुरू अर्जुनदेव व गुरू तेगबहाद्दूर यांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या गुरूपर्वांपैकी सर्वात मोठा पर्वकाल म्हणजे गुरूनानक जयंती हा असतो. कातिर्ंकी पौर्णिमेला या निमित्ताने फार मोठा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात. ’गुरू ग्रंथसाहिब’चे सलग ४८ तासात वाचन काही जण करतात. नवे कपडे घालून गुरूद्वारात जातात. गुरूव्दारा या दिवशी सजविण्यात येतो. मिरवणूकही काढली जाते. पारंपरिक धार्मिक गाणी गायली जातात. या दिवशी गुरूद्वारात जेवण दिले जाते. त्याला लंगर म्हणतात. लंगर हा माणसाचा अहंकार दूर करणारा प्रसाद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: