- दहशतवादाचे जगासमोरील आव्हान दिवसेंदिवस कठीण होत आहे. गेली अनेक दशके भारताला या दहशतवादाने चांगलेच झोडपले होते. त्या घटनांकडे पाश्चिमात्य, युरोपियन देश हे अत्यंत तटस्थपणे बघत होते. भारतात घडणारा दहशतवाद हा पाकीस्तानमुळे होतो आहे हे जगाला ओरडून सांगण्याचा प्रयत्न भारताने केला. परंतु परदु:ख शीलतम च्या न्यायाने अमेरिकेसह त्यांची मित्र राष्ट्रे फ्रान्स, इटली हे गप्प बसले. भारत पाकीस्तानातील तणावाचे सबंध राहणे हे त्यांच्या अर्थव्यवस्थेला पोषक राहिले.
- परंतु त्याच दहशतवादाचा प्रत्यय परवा पॅरिसमध्ये आला. अर्थात फ्रान्सने लगेच त्याचे सडेतोड उत्तर दिले. पंधरा वर्षांपूर्वी ९/११ या घटनेने अमेरिकेला दणका दिल्यानंतर अमेरिकेने एका ओसामा बिन लादेनसाठी संपूर्ण अफगाणिस्थान उद्धवस्त केले. लादेनचा खातमा करेपर्यंत अमेरिकेने प्रयत्न केले आणि त्याचा सूड उगवला. दहशतवादाला असे सडेतोड उत्तर देण्याचे धाडस लागते. तसे सडेतोड उत्तर द्यावे लागते हे भारताने अजूनही ओळखले नाही. ओळखले असले तरी इच्छाशक्ती नाही. त्यामुळे कोणताही दहशतवादी हल्ला झाला की आमच्या देशात अंतर्गत वादच उफाळून येत असतात. धर्माच्या नावावरून राजकारण करतात. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो वगैरे छापिल कमेंट पास करून आपले मतप्रदर्शन करतात. किंवा या दहशतवादी हल्ल्याला हिंदू मुस्लिम असा रंग देण्याचा प्रकार करून डावे आणि तथाकथीत पुरोगामी स्वत:ला शहाणे समजतात. पण दहशतवाद हा विषारी डंख मारणार्या सापासारखा असतो. तो ठेचायचा असतो, हे मात्र हे लोक करत नाहीत. अमेरिकेने लादेनचा सूड घेतला पण आम्ही अजूनही दाउद कोठे आहे हे माहित असूनही अंतर्गत राजकारणाने त्यावर फालतू चर्चा करत बसतो. दाउदला पकडल्याने विशिष्ठ समाज, अल्पसंख्यांक दुखावले जातील हा समज या डाव्या आणि तथाकथीत पुरोगामी लोकांनी करून दिला. छोटा राजनला पकडल्यानंतर त्याच्यावरून कशाप्रकारे राजकारण घडते आहे? चार महिन्यांपूर्वी याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर त्याचे उदात्तीकरण करणारी प्रवृत्ती या देशात उफाळून आली होती. याकूबच्या अंत्यसंस्काराला जमलेली गर्दी नेमके काय सांगत होती? ही असली धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम डाव्या विचारांनी आणि पुरस्कार परत करणार्या सुमार लोकांनी केले आहे. टिव्हीवरील फालतू चर्चासत्रांमधून अमूक एक धर्माच्या संघटनेने तमूक एक कृत्य केले असे पसरवून संपूर्ण धर्माला, विशिष्ठ समाजाला वेठीस धरण्याचा प्रकार काही प्रवृत्तींनी चालवला. हे या देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
- गेल्या दोन वर्षात इसिसने आपले पाय जगभर पसरवले आहेत. या इसिसचा भारतालाही धोका आहे. त्याच इसिसने फ्रान्समध्ये हल्ले चढवल्यावर कशाप्रकारे हालचाली झाल्या आहेत ते आपण पाहिले पाहिजे.
- ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी पॅरिसवर आत्मघाती हल्ले केले. सात ठिकाणी झालेल्या स्फोटांत सव्वाशेहून अधिक जण बळी पडले. शेकडो जखमी झाले. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी या घटनेने पुन्हा जागल्या आहेत. पॅरिस व मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात साम्य असल्याचेही बोलले जात आहे. सिरियातील हल्ल्यात फ्रान्सने सहभाग घेतल्याबद्दल हा बदला असल्याचा दावा ‘इसिस’ने केला आहे. मात्र या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार फ्रान्सने केला. असा निर्धार आम्हाला कधी जमला नाही. कारण अशा प्रवृत्तींना धडा शिकवला तर विशिष्ठ समाज दुखावला जाईल अशी भिती निर्माण केली गेली. एकीकडे दहशतवादाला धर्म नसतो म्हणायचे आणि एका विशिष्ठ समाजाला व्होट बँक म्हणून कवटाळायचे. ही व्होट बँक दहशतवादाचे समर्थन करणारी असली तरी गप्प बसायचे. असली घाणेरडी प्रवृत्ती या देशात निर्माण करण्याचे काम राजकीय पक्षांनी केले आहे.
- पॅरिसमधील हल्ल्यानंतर मुंबईप्रमाणेच संकटकाळी डगमगून न जाता तेथील नागरिकांनी दाखवलेले सामाजिक भान कौतुकास्पद आहे. जखमींना रक्ताची गरज भासेल याची जाणीव ठेवून हजारो तरुणांनी रक्तदानासाठी रुग्णालयांत रांगा लावल्या होत्या. मेट्रोसेवा बंद झाल्यावर टॅक्सीचालकांनीसुद्धा प्रवाशांना मोफत सेवा पुरवली. जगात सर्वत्र शांततेचा पुरस्कार केला जात आहे. तसे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र त्या प्रयत्नांना सुरूंग लावण्याचे काम दहशतवादी शक्ती करत आहेत. आता एकटा भारत, अमेरिका वा फ्रान्सपुरता हा धोका मर्यादित राहिलेला नाही. संपूर्ण जगासमोरच दहशतवादाचा भस्मासूर आ वासून उभा आहे. मानवतेला तो आव्हान देत आहे. माणुसकीला काळिमा फासणार्या घटना वाढत आहेत. मानवतेच्या शत्रूंची संख्या आणि त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे हे नाकारता येणार नाही. देशातील सुरक्षायंत्रणा सावध असल्या तरी समाजविघातक शक्तींचे विध्वंसक इरादे भुईसपाट करण्यासाठी त्या पुरेशा नाहीत. दहशतवादाचे घोंघावणारे भूत वेळीच गाडण्याची गरज भासत आहे. विविध देशांमध्ये मतभेद असू शकतात. मात्र दहशतवादाविरुद्ध दोन हात करण्यासाठी आपसातील मतभेद विसरून जगातील सर्व देशांनी एकजूट दाखवली पाहिजे. परंतु भारतासारख्या देशात पक्षीय मतभेद विसरून देशहितासाठी सवार्र्नी एकत्र आले पाहिजे.
सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५
एकजुटीने प्रश्न सुटेल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा