गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

चपराक

भाजपच्या नेत्या आणि पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेस नेत्या मनेका गांधींच्या श्‍वानप्रेमामुळे संपूर्ण देशाला फार मोठी शिक्षा भोगावी लागत होती. गांधी घराण्यातील सुनबाई आपल्या पक्षात आल्यामुळे उकळ्या फुटलेल्या भाजपने पंधरा अठरा वर्षांपूर्वी या मनेका गांधींचे फाजील लाड पुरविले आणि भटक्या कुत्र्यांना मारण्यास बंदी घातली. पण या कुत्र्यांमुळे माणसांचा जीव धोक्यात असतानाही हे श्‍वानप्रेम उतू गेल्यामुळे सर्वाच्च न्यायालयाने अशी भटकी कुत्री संपवून टाकण्याचे आदेश दिले. ही चांगलीच मनेका गांधी आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थेला मिळालेली चपराक आहे. देशातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सुप्रीम कोर्टाने  हा फार मोठा निर्णय दिला आहे. आजारी असलेल्या किंवा लोकांना धोकादायक ठरु शकणार्‍या कुत्र्यांची हत्या करण्याला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. कुत्र्यांच्या उपाययोजनासंदर्भात सचिवांना प्रतिज्ञापत्र देण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत.
    आज आपल्या देशात गावोगावी  आणि शहरातही या कुत्र्यांची दहशत फारच वाढली होती. मुंबईत तर रेल्वे प्लॅटफॉर्मवरही माणसांप्रमाणे भटक्या कुत्र्यांचे अड्डे, रांगा दिसतात. ओव्हरब्रीजवरून जातानाही या ब्रीजवर गर्दीत कुत्र्यावर पाय पडू नये म्हणून खबरदारी घेताना माणसांना प्रचंड त्रास होतो. सकाळच्या वेळी फिरायला जावे तर टोळीने ही कुत्री भटकत असतात. एखादा बाईकस्वार गेला, वाहन गेले की भुंकून त्याचा पाठलाग करून त्याला खाली पाडेपयर्र्त मजल या कुत्र्यांची गेली होती.
  सातारमध्ये दोन तीन वर्षांपूर्वी एका बालकाला कुत्र्याने फाडून खाल्ले होते. दहा बारा वषार्र्पूर्वी शौचास बसलेल्या एका बालिकेला कोल्हापुरात अशाच प्रकारे कुत्र्यांनी मारले होते. हे प्रकार सातत्याने घडत होते. पण भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्यास कोणी तयार नव्हते. का? तर मनेका गांधींसारख्या भामट्या श्‍वानप्रेमींमुळे याला अडसर होत होता.   श्‍वानदंशानंतर घ्यावी लागणारी लसही आजकाल सहज उपलब्ध नसते. पण या श्‍वानप्रेमी प्राणीमित्रांना माणसांपेक्षा कुत्री जवळची वाटत होती. भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन काही जणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या प्रश्नावर सरकारने पावलं उचलावीत म्हणून अनेकदा दबाव टाकण्यात आला. केरळ, मुंबई हायकोर्टाच्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयाला प्राणीमित्र संघटनांनी आवाहन दिलं होतं. ‘त्या’ कुत्र्यांना मारण्यास हायकोर्टांनी दिलेला संमतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. ही एक चांगली आणि अभिनंदनीय गोष्ट म्हणावी लागेल. मात्र अशा प्रकारच्या कत्तली योग्य असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे. या कुत्र्यांमुळे कोणाला धोका पोहचत असेल, तर त्यांना मारुन टाकावं असं मत सर्वोच्च न्यायालयाने मांडलं आहे. राज्यासह देशभरात विविध ठिकाणी भटक्या किंवा पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यात अनेक चिमुरड्यांना प्राण गमवावे लागले होते तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.    खरं तर प्राणीमित्र संघटनांच्या नावाखाली अनेक एनजीओंनी नावनोंदणी करून फार मोठा भ्रष्टाचार या देशात होत आहे. परदेशी आर्थिक मदत मिळते आणि मुंबई महापालिकेचा भुखंड मिळतो म्हणून अशा श्‍वानप्रेमी संघटनांच्या टोळ्या मुंबई, ठाण्यात वावरत आहेत. पूर्वीच्या काळी नगरपालिका, महापालिकेचे कर्मचारी पावसाळ्या पूर्वी भटक्या कुत्र्यांना गोळ्या घालून मारत असत. पण त्यांना बंदी केली गेली. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून त्यांची नसबंदी करण्याचे काम या संघटना करू लागल्या. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरणाच्या नावाखाली सरकारी आणि परदेशी पैसा या संघटना मिळवू लागल्या. इतके करूनही कुत्र्यांची संख्या काही केल्या कमी होत नव्हती. कारण कोणत्या कुत्र्याचे निर्बिजीकरण केले आहे आणि कोणाचे नाही याची नोंद नव्हती. त्यामुळे मुंबईत तर इन्स्पेक्शनच्या वेळी कुत्री पळवून नेण्याचे प्रकार होत होते. अनेक प्राणीमित्र संघटनांनी आपले कार्यक्षेत्र निश्‍चित केले होते. परंतु एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील कुत्री पळवणे आणि त्यांची नोंद आपल्या संस्थेत करायची असले प्रकार घडले. या कुत्र्यांची खरोखरच नसंबंदी केली आहे की नाही हे कोण तपासणार? जन्माला आलेली पिल्ले कोणत्या कुत्र्याची आहेत त्यांची काय डीएनए टेस्ट केली जाणार होती? पण तसले काहीही केले गेले नाही. पण या भटक्या कुत्र्यांचा सामान्यांना मात्र फार त्रास होत होता.गेल्या काही वर्षांत अंगावर भोकं पडलेली, खरूज झालेली, लूद भरलेली, जखमा झालेली, गोमाशा, गोचीड आणि पिसवा लागलेली कुत्री सगळीकडे फिरताना दिसत आहेत. ही कुत्री खाद्यपदाथार्र्चे गाडे, हॉटेलच्या आवारात मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे साथीचे रोग आणि नवे रोग निर्माण करण्याचे काम या कुत्र्यांमुळे होत होते. रोगांचा प्रसार करण्याचे मोठे साधन ही भटकी कुत्री आहेत. डासांची पैदास करण्यास ही कुत्री कारणीभूत ठरतात. कचरा कुंडीत कचरा टाकला की कुत्र्यांची टोळी येवून तो कचरा बाहेर खेचून आणतात. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरते. पण हे प्रकार वातानुकुलीत कारमधून हिंडणार्‍या मनेका गांधींना दिसले नव्हते. ज्या प्राणीमित्रांचे आणि संस्थांचे श्‍वानप्रेम उतू जाते आहे त्यांनी ती आपल्या घरी घेवून जावीत. अगदी कुशीत घेवून झोपावे. पण रस्त्यावर सामान्य माणसांना त्रास देणारी भटकी कुत्री मारलीच पाहिजेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: