रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

बिहारमधील पराभवातून भाजप काय बोध घेणार?

  •  कोणतीही लाट फार काळ टिकत नाही. ती केव्हाना केव्हा तरी विरतच जाते. त्याप्रमाणे दीड वर्षातच नरेंद्र मोदी नावाची लाट आता विरू लागली आहे याची साक्ष भारतीय जनता पक्षाच्या बिहारमधील पराभवाने दिलेली आहे. गेल्या पाच वषार्र्ंपासून नितिशकुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील सुरू असलेल्या युद्धात नितिशकुमार विजयी झाले आहेत. पण सर्वात शहाणे आणि हुशार ठरले आहेत ते राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव. ज्याप्रमाणे मोदी आणि नितिशकुमार यांचे विळा भोपळ्याचे सख्य होते तसेच काही वर्षांपासून लालू आणि नितिशकुमार यांचे होते. लालूची राजवट संपविण्यासाठी नितिशकुमार यांनी भाजपचा खुबीने वापर करून घेतला होता. बिहारमध्ये जेव्हा आठ वर्षांपूर्वी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली होती तेव्हा राष्ट्रपती राजवट आली आणि सहा महिन्यात निवडणुका झाल्या. या निवडणुकीत लालूंचा सुफडा साफ झाला होता. कॉंग्रेस होत्याची नव्हती झाली आणि भाजप आणि नितिशकुमार यांनी सरकार स्थापन केले. वास्तविक पाहता नितिशकुमारांना मोठे केले ते भारतीय जनता पक्षानेच. वाजपेयींच्या काळात नितिशकुमारांना रेल्वे मंत्री करण्यापर्यंत भाजपने संधी दिली होती. ममता बॅनर्जींना नितिशकुमारांसाठी भाजपने दूर होवू दिले होते. त्याचा फायदा नितिशकुमारांनी उठवला. लालूराज संपवून रामराज्य आणण्याचे स्वप्न बिहारमध्ये दाखवले. त्यासाठी भाजपला मदतीला घेतले. पण भाजपने जेव्हा दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचे नाव घोषित केले तेव्हा मात्र नितिशकुमार संतापले आणि सूडाने पेटले. मोठे युद्ध जिंकण्यासाठी छोटी लढाई हरली तरी चालते. त्याप्रमाणे भाजपला गाफिल ठेवत लोकसभेत त्यांना यश मिळवता आले नसले तरी त्यांनी विधानसभेची तयारी जोरात सुरू केली होती, त्याचे हे फळ आहे. भाजप बरोबर राहून एखादे केंद्रात मंत्रिपद मिळवण्यापेक्षा स्वतंत्र राज्य आपल्या हातात असले तर बरे असा विचार केला आणि बिहारवर लक्ष केंद्रित केले. यासाठी दुसर्‍याच्या चपलेने विंचू मारण्याचा प्रकार नितिशकुमार आणि लालूप्रसाद या दोघांनीही केला. पण लालू यादव हे सरकारचे तारक आहेत. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शरद पवार केव्हाही फडणवीस सरकारला धक्का देवू शकतात, शिवसेनेला आपल्याकडे खेचू शकतात त्याप्रमाणे लालू यादव नितिशकुमार यांना केव्हाही अडचणीत आणू शकतात.
  •  तरीही भाजपचा पराभव नेमका कशामुळे झाला आहे याचा विचार आता भाजपने केला नाही तर पुन्हा राजकीय वनवास या पक्षाला भोगावा लागेल. मोदींनंतर भाजपचा तारणहार कोणी असणार नाही. आज ही लढत भाजप विरूद्ध महाआघाडी अशी नव्हती तर मोदी विरूद्ध बाकीचे अशी होती. त्यामुळे मोदी यांच्याशिवाय भाजपमध्ये चलावू नाणे नाही. ते नाणे जर गुळगुळीत झाले तर भाजपला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे. यासाठी भाजप नेत्यांनी आता आत्म परिक्षण करण्याची गरज आहे. बिहारमध्ये ही परिस्थिती का ओढवली याचा सविस्तर विचार करण्याची गरज आहे.
  •      बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी जातीनिहाय आरक्षणाचा फेरविचार करावा असे मत व्यक्त केले होते. बिहारमध्ये जातीचा फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे. सरसंघचालकांच्या या विधानामुळे धर्मनिरपेक्ष आघाडीला आयताच मुद्दा मिळाला. लालूप्रसाद यादव यांनी या वक्तव्याला सवर्ण विरुध्द मागास असा रंग दिला. म्हणजे एकेकाळी ब्राह्मणांचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपला बहुजनांचा आणि सर्वांना बरोबर घेवून जाणारा पक्ष असा चेहरा लाभत असतानाच त्यांचा बुरखा गळून पडला आहे. भाजपाने जाहीर सभांमधून जातीनिहाय आरक्षणाला अजिबात धक्का लावणार नाही असे आश्वासन दिले. बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ओबीसी समाजाचा असेल असेही सांगितले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे पूर्वी भाजप आणि संघ जसे स्वतंत्र होते तसे ठेवले तर भाजप तरेल. आज संघ आणि भाजप यांची सरमिसळ झालेली आहे. त्यामुळे कॉंग्रेस, जनता दलाप्रमाणे भविष्यात हा पक्ष तुकड्या तुकड्यात विभागेल.
  •       मुस्लिम मतदार आणि भाजप यांच्यामध्ये नेहमीच विश्वासाचा अभाव राहिला आहे. बिहारमध्ये १५ टक्के मुस्लिम मतदार आहेत. मुस्लिम मतांची ही संख्या आपल्या बाजूला वळवणे हे भाजपासाठी फार मोठे आव्हान होते. २०१४ लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांची झालेली विभागणी भाजपाच्या पथ्यावर पडली होती. मात्र यावेळी नितीश, लालू आणि कॉंग्रेस एकत्र आल्यामुळे एकगठ्ठा मुस्लिम मते धर्मनिरपेक्ष महाआघाडीला मिळाली. गोमांस बंदी, दादरी हत्याकांड या घटनांमुळेही मतदारांनी धर्मनिरपेक्ष महाआघाडीचा पर्याय निवडला. त्यामुळे भाजपला अंतर्गत वाचाळांपासून किती जपले पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे.
  •   आणखी महत्त्वाचे म्हणजे अकबरउद्दीन ओवेसी यांचा बिहारमधील प्रवेश भाजपाला फायद्याचा ठरेल असे सुरुवातीला वाटत होते. पण प्रत्येत टप्प्यावर निवडणुकीत जशी प्रगती होत गेली तसतशी धर्मनिरपेक्ष महाआघाडी ओवेसी मतविभाजन करुन भाजपाला फायदा पोहोचवणार हे मतदारराजाला पटवून देण्यात यशस्वी ठरली. त्यामुळे एमआयएमचा प्रभाव अजिबात दिसून आला नाही. जो एमआयएमचा भितीचा बागुलबुवा निर्माण होणे भाजपला अपेक्षित होते तो झाला नाही.  बिहारमध्ये कॉंग्रेस शर्यतीत कुठेच नव्हती. कॉंग्रेस स्पर्धेत दिसत नसली तरी, कॉंग्रेसने जदयू आणि राजदला एकत्र ठेवण्याची महत्वाची राजकीय खेळी केली आणि भाजपाचा मार्ग अधिक खडतर केला.
  •   सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारले हा देखील धर्मनिरपेक्ष आघाडीच्या विजयातील एक महत्वाचा मुद्दा आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपाकडे नितीश कुमार यांच्या विरोधात कोणताही सशक्त चेहरा नव्हता. 
  •   एकेकाळी राज्यस्तरावरील नेतृत्व ही भाजपची शक्ती होती. पण मोदी सत्तेत आल्यापासून राज्यस्तरावरील नेत्यांचे महत्व कमी झाले. याच दरम्यान हरियाणात फरीदाबादमध्ये झालेल्या दलित हत्याकांडासंबंधात केंद्रीय मंत्री व्हि.के.सिंह यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्याचाही मोठा फटका भाजपाला बसला.
  •  नितीश कुमारांची लोकप्रियता हे देखील विजयाचे एक कारण आहे. कायदा-सुव्यवस्था दुरुस्त करण्यासह मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी अनेक अभिनव कल्पना राबवल्या. जी लोकप्रियता गुजरातमध्ये मोदींची होती तीच गेल्या आठ वर्षात नितिशकुमार यांनी बिहारमध्ये मिळवली होती हे भाजपने लक्षात घेतले नाही. याशिवाय भाजपाचे घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे जितनराम मांझी यांच्यामध्ये दलिताचा खरा नेता कोण यावरुन अंतर्गत स्पर्धा सुरु होती. याचा फार मोठा फटका भाजपला बसला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: