मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

सरकार पाडण्याची हिंमत शिवसेनेत आहेच कुठे?

  •      बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर अनेकाना उकळ्या फुटू लागल्या. मोदींचा पराभव म्हणजे त्यांचा प्रभाव कमी झाला म्हणून आनंद वाटू लागला. राहुल गांधींच्या कॉंग्रेसपासून संजय राउत यांच्या शिवसेनेपयर्र्त अनेकांनी याचा आनंद व्यक्त केला. हे वाक्य मुद्दामच टाकले आहे कारण राहुल गांधींची कॉंग्रेस वेगळी आणि हात छाप कॉंग्रेस वेगळी आहे. तसेच वाघाची शिवसेना वेगळी आणि संजय राउत यांची सेना वेगळी आहे. या दोन्ही पक्षांमध्ये मुख्य नेत्यापेक्षा प्रवक्ते आणि स्वयंघोषित प्रवक्ते नेते बोलत असतात. त्यामुळे आता आपणही मोठे होवू असे स्वप्न शिवसेनेला महाराष्ट्रात पडू लागले आहे. त्यामध्ये शिवसेनेकडे कोणी उमेदवार नसल्यामुळे आपण मुख्यमंत्री असू असे दिवास्वप्न दिवाळीपूर्वीच राउत यांनी पाहण्यास सुरूवात केली. 
  • म्हणूनच बिहराच्या निकालानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रीया ही तशीच आहे. उद्या महाराष्ट्रात निवडणूक झाली तर शिवसेनेला बहुमत मिळेल..’ असे शिवसेनेतर्फे अधिकृतपणे सांगितले गेले आहे. ज्यांनी सांगितले ते संजय राउत हे राज्यसभेत खासदार आहेत. बिहारमधील निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यामुळे हुरळून गेलेले संजय राउत आणि शिवसेना हे लक्षात घेत नाही की, महाराष्ट्रात उद्या निवडणूक होण्याकरिता हे सरकार पाडावे लागेल. ते पाडण्याची तयारी आणि हिंमत शिवसेनेत आहे काय? या देशात, राज्यात कोणतेही सरकार सहजपणे पाडू शकेल अशी ताकद फक्त शरद पवार यांच्याकडेच आहे. बाकीचे सगळे गर्जेल तो पडेल काय अशा स्वरूपाचे पोकळ ढग आहेत.
  •   आता शिवसेनेला जर हे सरकार पाडायचे असेल तर नेमके काय केले पाहिजे हे समजले पाहिजे. विधानसभेत सरकारवर अविश्वास ठराव मंजूर झाला तर हे सरकार पाडता येईल. किंवा कोणत्याही आर्थिक बिलावर विधानसभेत सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला तर सरकारला चले जाव म्हणता येईल. तसेच अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आाणि हा राजीनामा मान्य करून दुसर्‍या कोणत्याही पक्षाने सरकार बनवण्याची समर्थता व्यक्त केली नाही तर राज्यात निवडणुका होवू शकतात. हे सगळे घडवण्याची धमक आणि ताकद आज शिवसेनेत आहे काय? 
  • अस्थिर परिस्थिती निर्माण करून मुदतपूर्व निवडणूक घेण्यास भाग पाडण्यासाठी विरोधी पक्ष सक्षम असावा लागतो. आज सत्तेत असलेली शिवसेना सरकारची विरोधक़ आहे तर विरोधात असलेला राष्ट्रवादी पक्ष हा भाजप सरकारचा समर्थक आहे हा फार मोठा विनोद आहे. त्यामुळे आपली नेमकी भूमिका काय आहे हे शिवसेनेला स्पष्ट करावे लागेल. एकीकडे भाजपला एक वर्ष कल्याण डोंबिवलीचे महापौरपद देवू करायचे आणि दुसरीकडे भाजपच्या पराभवाची भाषा करायची हा पोरकटपणा शिवसेनेने सोडला पाहिजे. उथळ वक्तव्ये करणार्‍या नेत्यांना शिवसेनेने जरा लांबच ठेवले पाहिजे. नाहीतर जो फटका भाजपला बसला तसा शिवसेनेला बसेल. 
  •    हे सरकार पाडण्याचे डोहाळे विरोधकांप्रमाणेच सत्तेतील सहभागी शिवसेनेला लागले असले तरी पण हे सरकार पडेल कसे? जे सरकार पाडण्याची भाषा करतात तेच सरकारमध्ये घुसलेले आहेत. महाराष्ट्रात निवडणूक करायची तर इथे सत्तेवर लाथ मारण्याची तयारी असावी. अशी तयारी वाचाळ नेते करू शकतात का? कल्याण-डोंबिवलीत सत्ता सोडण्याचे खूप मोठे नाटक केले. राजीनाम्याचीही नाटके मंत्र्यांनी केली आणि लोकांना आणि मतदारांना मुर्ख बनवले. शिवसेनेल उद्या निवडणूक हवी आहे. ती निवडणूक होण्याकरिता शिवसेनेला मिळालेली बिनमहत्वाची खातीही सोडण्याची तयारी ठेवायला हवी.  सर्व सेना मंत्र्यांनी आपले राजीनामे राज्यपालांकडे द्यायला हवेत. ती तयारी आहे काय? आज सरकारमध्ये जो काही वाटा आणि जी काही खाती मिळाली आहेत त्या जोरावर आपण मोठे होवू असे स्वप्न शिवसेना नेते पहात आहेत. मग आम्ही हे सरकार पाडत असल्याचे शिवसेनेने अधिकृतपणे जाहीर करायला हवे. ते जाहीर केल्यानंतर राज्यपाल राज्यपाल एक संधी भाजपला देतील आणि नागपूरच्या अधिवेशनात फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध करावे, असे सांगून वेळ मारून नेतील. पण नागपूर अधिवेशनात राष्ट्रवादी कॉंग्रेस बाहेरून पाठिंबा देईल. मग सरकार पडणार कसे? हेच सरकार स्थापनेच्या वेळी घडले होते ना? वर्षाच्या आत शिवसेनेला या गोष्टीचा कसा विसर पडला? पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना नेते उद्धव ठाकरे सरकारला तडीपार करण्याची भाषा करतात. आता संजय राउत निवडणुका परत होतील याचे स्वप्न पाहतात. हे फार विसंगत आहे. मुंबई आणि कोकण वगळाता तसे महाराष्ट्रात शिवसेनेचे वजन आहे तरी काय? केवळ मुंबई ठाण्याच्या जोरावर मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणे पोरकटपणाचे आहे. भाजप ज्याप्रमाणे ग्रामीण भागातही घुसत आहे, कॉंग्रेसप्रमाणे बेरजेचे राजकारण करून ओढाओढी करते आहे तसे शिवसेनेला जमलेले नाही. 
  •    बिहारच्या निवडणुकीवरून केवळ भाजपनेच नाही तर सर्वच राजकीय पक्षांनी बोध घेतला पाहिजे. हा पराभव जरी भाजपचा असला तरी तो एक़ा प्रकारच्या खेळीला मतदार काय उत्तर देवू शकतात हे सांगणारा आहे. त्यामुळे भाजप प्रमाणे शिवसेनेचे पानीपत होवू शकते हा विचारही करावा लागेल. आज भाजपला केवळ २० आमदार कमी पडतात. शिवसेनेने सरकार पाडले आणि खरोखरच निवडणुका लागल्या दीड दोन वर्षांच्या कारभाराच्या जोरावर पूर्ण बहुमत मिळवण्याची खेळी भाजप सहज करू शकेल हे लक्षात घेतले पाहिजे. सरकारमधून बाहेर पडण्याचे सोडा, निवडणुकीचे स्वप्न पाहण्याचे सोडा पण पुढील वर्षी मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीत सत्ता टिकवण्यासाठी सेनेला भाजपचीच मदत लागणार आहे. नाहीतर मुंबई आणि ठाणे गमवावे लागेल यात शंकाच नाही. अशा परिस्थितीत सरकार पाडण्याची धमक शिवसेनेत आहे काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: