कोणत्याही लाटेला थोपवता येते किंवा सुसाट येणार्या वादळाला शांत व्हावेच लागते. त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत अनुभव आल्याचे दिसून येते. अगदी निराशा पदरी पडली नसली तरी वादळ जसे हळूहळू शांत होते तसे ते आता होवू लागले आहे. त्यामुळे येत्या ८ तारखेला बिहार विधानसभा निवडणुकीत हे वादळ तिथे किती थैमान घालते किंवा शांत राहते याकडे सवार्र्चे लक्ष लागून राहील. भाजपाची लाट सर्वत्र लाट असताना कोल्हापूर महापालिकेची सत्ता कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. कॉंग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदा भाजपा-शिवसेना स्वतंत्र लढले आहेत. पण यामध्ये शिवसेनेचे नुकसान अधिक झाले आहे. राजकीय सुंदोपसुंदीचा फटका राज्यात युती असलेल्या या दोन पक्षांना कोल्हापुरात बसला आहे. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने आपली लाज राखली हे महत्त्वाचे म्हणावे लागेल. कोल्हापूरात त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाने एवढी मोठी आघाडी घेतल्याचे दिसते. अर्थात याचे सर्व श्रेय हे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना जाते.कोल्हापूरात मतदारांचा कौल त्रिशंकू असला तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील या निवणुकीत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध महाडिक अशीच लढाई खर्या अर्थाने होती. महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार पाहिला तर भाजपा-ताराराणी आघाडी विरुद्ध कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना अशीच लढाई झाली. काहीही करून महाडीक यांच्या ताराराणी आघाडीला सत्तेपर्यत पोहचू द्यायचे नाही, असा चंगच सवार्र्ंनी बांधला होता. त्यानुसारच सगळी व्यूहरचना करण्यात आली होती. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात आमचा शिवसेना नैसर्गिक मित्र आहे, वेळ पडली तर त्यांच्याशी युती करू या विधानांना मतदारांनी प्रतिसाद दिला नाही. भाजपने काही ठिकाणी उमेदवार देताना विधानसभेप्रमाणेच फोडाफोडी, तडजोडी, आयात केली होती. पण मतदारांनी हा कावा ओळखला आणि स्थानिक पातळीवर हे राजकारण चालणार नाही हे दाखवून दिले. कॉंग्रेसच्यावतीने माजी मंत्री सतेज पाटील यांनी एकाकीच लढत दिली होती. त्यामध्ये त्यांनी यश मिळवल्याचे दिसते. पाटील विरुद्ध महाडिक अशी पारंपरिक राजकीय इर्षा असल्याने काहीही करून पाटील यांना महाडिक यांना सत्तेपासून रोखायचेच होते. त्यानुसार त्यांनी निवडणुक लढवून सत्तेची चावी आपल्याकडेच ठेवली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला ताराराणी आघाडीचा फार मोठा फटका बसला. गेल्या वेळी त्यांच्या २६ जागा होत्या. यावेळी केवळ १५ जागा निवडून आल्या आहेत. शिवसेना-भाजपा नेहमी महापालिका निवडणूक एकत्र लढत आली होती. यंदा मात्र भाजपाने ताराराणी आघाडीशी युती करून शिवसेनेची काडीमोड घेतली. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने केलेल्या या प्रयत्नामध्ये भाजपाला आपल्या जागा वाढवून घेण्यामध्ये यश आले. त्याचा फटका शिवसेनेला बसला आहे. शिवसेनेला केवळ तीन जागांवरच समाधान मानावे लागले आहे. मात्र शिवसेनेने कल्याणचा गड राखून ठाणे जिल्हा, कोकण, मुंबई हा अजूनही शिवसेनेवर विश्वास ठेवतो आहे हे दाखवून दिले. कल्याण डोंबिवली महापालिका शिवसेनेकडे गेल्यामुळे या निवडणुकीत आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपली इज्जत राखली आहे. भाजप आणि शिवसेनेचे खासदार, मंत्री असे प्रचंड सैन्य या निवडणुकीत प्रचारासाठी उतरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कलगीतुरा हा अखेरच्या टप्प्यात गाजला. परंतु भाजपचे वादळ निर्माण करून महापालिकेची सत्ता मिळवणे सोपे नाही हे भाजपला आता चांगलेच लक्षात आले असेल. त्यामुळे अजून दोन वर्षांनी होणार्या मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाइंदर महापालिकेत शिवसेनेशी टक्कर देणे सोपे नाही हे भाजपला समजले असेल. कल्याण डोंबिवली महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसलेला जोरदार फटका हाही राज ठाकरे यांना विचार करायला लावणारा असेल. ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत गेल्यावर्षी मनसेला जोरदार फटका बसला तसाच तो इथेही बसला आहे. त्यामुळे पक्षाची पुनर्बांधणी करणे आणि स्वप्न दाखवण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवणे गरजेचे आहे हे मनसे नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. विशेषत: आमच्या हातात एक मॉडेल आहे, विकासाचे मॉडेल आहे हे महाराष्ट्र नवनिर्माणासाठी आम्ही वापरू या केवळ बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. याचे कारण मागच्या निवडणुकीत चांगला कौल मिळूनही मनसेने फारचा प्रभाव पाडला नाही. तोच प्रकार नाशिक महापालिकेतही झाला होता. त्यामुळे गर्जेल तो पडेल काय अशी अवस्था भाजप आणि मनसे यांची या निवडणुकीत झालेली दिसते. कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्वात चिंतेची बाब म्हणजे एमआयएम या पक्षाचा महापालिकेत झालेला शिरकाव. अशोक चव्हाणांनी नांदेडमार्गे घुसवलेला हा साप ठेचण्याबाबत ठाकरे बंधू तावातावाने बोलत होते. पण गतवर्षी विधानसभेत घुसलेल्या एमआयएमने आता स्थानिक पातळीवर पाय पसरायला सुरूवात केली आहे ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. यापासून सेना, भाजप, मनसे काही बोध घेणार आहेत काय? मुंंब्रामार्गे ठाणे महापालिकेत जर एमआयएम घुसला तर महाराष्ट्राला जातीयवाद, दंगली यांना तोंड द्यावे लागेल हे निश्चित. त्यामुळे कॉंग्रेसला मुस्लिम मतांचा गठ्ठा मिळू नये म्हणून एमआयएमला घुसखोरी करायला देण्याचा कुटील डाव कोणी खेळला आहे हे समजणे आवश्यक आहे.
सोमवार, २ नोव्हेंबर, २०१५
लाट सपाट होवू लागली आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा