भांडवली बाजारात जेव्हा मंदी येते तेव्हा सामान्य माणूस नेहमी घाबरून जातो. परंतु सामान्यांपेक्षा त्याचा बाउ करतो तो डावा विचार. वास्तविक पाहता भांडवली बाजारात किंवा शेअर मार्केटमध्ये असलेली मंदी ही गुंतवणुकीची संधी असते. परंतु मंदी म्हणजे खूप वाईट परिस्थिती असा भ्रम सवर्र्त्र करून दिला जातो. अगदी तोच प्रकार राजकीय वातावरणात झालेला दिसून येतो. म्हणजे राजकारणात आज सरकारची मंदी आहे, नाराजी असताना त्याचा फायदा उठवण्याऐवजी डावे पक्ष गप्प बसून आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. हातात आलेली संधी साधता येत नसेल, सरकार विरोधी वातावरण निर्माण करता येत नसेल तर डावे पक्ष या देशातून हद्दपार झाले असे समजण्यास हरकत नाही. एकेकाळी जनतेच्या प्रश्नांवर हजारोंचे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करुन टाकणार्या डाव्या शक्तींपैकी आज एकही पक्ष अथवा नेता शिल्लक राहिलेला नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. वाढती महागाई, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ यावरून आज रान उठवणे आवश्यक असताना डावे पक्ष हे गतप्राण झाल्यासारखे झाले आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत डाव्या पक्षांचा लाल बावटा हद्दापार झाला. भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी तसेच शेतकरी कामगार पक्षांनी उमेदवार उभे केले होते व ते सर्वच पडले. हा डाव्या पक्षांवरचा उडालेला विश्वास आहे काय? कोल्हापूर आणि आसपासच्या परिसराला डाव्या पक्षांची, पुरोगामी पक्षांची फार मोठी परंपरा होती. डाव्या विचारांचे विचारवंत या भागात होते. परंतु पानसरे यांच्या हत्येनंतरही कोल्हापूरात डाव्या पक्षांना आपली ताकद उभी करता आली नाही यासारखे दुर्दैव ते काय? डावे पक्ष निष्क्रिय झाले असेच म्हणावे लागेल. कोल्हापुरात समाजवादाची आहे, बहुजनवादाची आहे, सत्यशोधकी परंपरा आहे. त्याबरोबरच पर्यायी राजकारण करणारी विधायक नेतृत्वाचीदेखील मोठी परंपरा आहे. समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी, लाल निशाण, कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार आदी मोठमोठी वैचारिक भूमिका घेणारे पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात होते ते वैभव आता इतिहासजमा झाले काय? क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापासून शेकापचे प्रा. त्र्यं. सी. कारखानीस, एन. डी. पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, लाल निशाण पक्षाचे संतराम पाटील, जीवनराव सावंत, वसंतराव सावंत, डाव्या पक्षांचे एस. के. पाटील, गोविंदराव पानसरे, के. एल. मलाबादे, सातारचे व्ही. एन. पाटील, डी व्ही पाटील, प्रभाकर महाबळेश्वरकर, समाजवादी पक्षाचे रवींद्र सबनीस, शंकर धोंडी पाटील, प्रा. शरद पाटील, श्रीपतराव शिंदे, शेकापचे गोविंदराव कालिकते, कर्हाडचे केशवराव पवार, अशी फार मोठी परंपरा पश्चिम महाराष्ट्राला डाव्या पक्षाच्या नेत्यांची आहे. कोकणात रायगड जिल्हा हा तर शेकापचा बालेकिल्ला म्हणून सहा दशके मिरवतो आहे. असे असताना सरकारच्या अपयशाचे भांडवल करण्यात या पक्षांना अपयश का येते हा न सुटलेला प्रश्न आहे. सरकारवरची नाराजी कॅश करण्याची हीच संधी असताना डावे पक्ष गर्भगळीत का झाले आहेत हे समजेनासे झाले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात कॉंग्रेस आणि विशेषत: डावे यांच्यात संघर्ष सुरु झाला. कॉंग्रेसेतर नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात जादाचे योगदान दिले असले तरी स्वातंत्र्योत्तर काळात कष्टकरी वर्गासाठी डावे पक्ष उभे राहिले आहेत. सतत संघर्ष करतानाच संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवा मुक्ती लढ्यातही त्यांचा मोठा सहभाग राहिला. महागाई विरुद्धची आंदोलने किंवा नवी धरणे उभी करताना शेतकर्यांना न्याय द्यावा, यासाठीचा संघर्ष त्यांनी निकराने लढविला. हे करीत असताना निवडणुकांचे राजकारणही केले. अनेक निवडणुका लढविल्या आणि जिंकल्यादेखील. पण हा उत्साह कुठे गेला? भांडवलदारांनी डाव्या शक्तींना, डाव्या विचाराला संपवले असे म्हणायचे काय?आज डाव्या पक्षांना त्यांच्यावरचा विश्वास निर्माण करण्याची ही एक फार मोठी सुवर्णसंधी आहे. असे असतानाही डावे पक्ष मूग गिळून गप्प का आहेत? महागाई, डाळींची दरवाढ, कांद्याची भाववाढ, सरकारचे अपयश या विरोधात डावे रस्त्यावर येण्यास का तयार होत नाहीत याचा विचार करावा लागेल. भांडवलदारांना किंवा उजव्यांना पर्याय उजवेच ठरणार काय? मोठ्या पक्षांमधील कुरघोड्या, राजकीय फूट आणि देशभरात उसळलेला असंतोष याचा राजकीय लाभही यापूर्वी डाव्या पक्षांनी उठवला होता. असे असताना आपली ताकद ओळखण्यात आता डावे पक्ष का कमी पडत आहेत? १९७७, १९८९ साली डावे आणि उजवे एकत्र येवून प्रस्थापितांना धडा शिकवला होता. पण आता डावे हे विश्वासास पात्र राहिलेेले नाहीत असा संदेश सर्वत्र जात आहे. डावे पक्ष कालबाह्य झाले आहेत हा विचार रूजतो आहे. तेव्हा वेळीच त्यांनी आपली ताकद पणाला लावली पाहिजे. एकेकाळी कोल्हापूरची आमदारकी सलग १९९०पर्यंत शेकापकडे होती. कोल्हापूर नगरपालिकेत शेकापचा नगराध्यक्ष व्हायचा. शेती, पाणी, रस्ते, कारखाने आदींवर हजारोंचे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करून टाकणारे हेच डाव्या पक्षांचे नेते होते. त्यातील एकही पक्ष किंवा नेता शिल्लक राहिला नाही. त्यामुळे आता जनतेच्या प्रश्नांवर लढा देणारी कोणतीही ताकद नाही हेच यातून दिसते आहे.
शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५
डावे गर्भगळीत झाले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा